सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा एक स्वतंत्र वर्ग सध्या निर्माण झाला आहे. वेगवेगळे व्हिडीओ, रील्स किंवा पोस्टच्या माध्यमातून कधी हजारो, कधी लाखो तर कधी कोट्यवधी लोकांवर प्रभाव पाडणाऱ्यांचा समावेश या वर्गात होतो. अनेक इन्फ्लुएन्सर अनेक सामाजिक प्रश्नांवरही जनमत तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं. तर काही इन्फ्लुएन्सर्स नवनवीन गोष्टींची माहिती आपल्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचवत असतात. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतीच अशा एका इन्फ्लुएन्सरला अटक केलीये, जो त्याच्या भल्या मोठ्या ‘कुटुंबा’साठी गुन्हेगार बनला होता. त्याच्या या कुटुंबात आहेत त्याच्या दोन पत्नी, सहा प्रेयसी आणि तब्बल ९ मुलं! न्यूज १८ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं घडलं काय?

बुधवारी लखनौच्या सरोजिनी नगर भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अजित मौर्य नावाचा हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्याच्या पत्नीसमवेत जेवण करत होता. यावेळी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदेशात जाऊन तिथे सेलिब्रेशन करण्याचं नियोजन हे पती-पत्नी करत होते. त्याचवेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिथे हजर होत या महाभागाला अटक केली. यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.

कोण आहे अजित मौर्य?

४१ वर्षांच्या अजित मौर्यनं सहावीतच शाळा सोडली. सोशल मीडिया साईट्सवर अजित वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स पोस्ट करतो. यातून मोर्यला रीलस्टार बनण्यापेक्षाही त्याचे सावज टिपण्यात जास्त रस होता. त्यासाठी तो सोशल मीडियाचा मोठ्या खुबीनं वापर करून घ्यायचा. त्यानं आत्तापर्यंत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे.

काय आहे हे प्रकरण?

अजित मौर्याला अटक केल्यानंतर आपण आपल्या दोन पत्नी, सहा गर्लफ्रेंड आणि नऊ मुलांचा सांभाळ करण्यासाठी गुन्हेगारी मार्गावर आल्याचं त्यानं सांगितलं. अर्थात, पोलिसांचा त्याच्यावर विश्वास बसणं कठीण असलं, तरी पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करून यातलं सत्य शोधून काढलं. त्यानुसार, अजित मौर्य चिटफंडसारख्या स्कीम्स, बनावट नोटा, इन्शुरन्स स्कीम अशा माध्यमातून लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अजितच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये ९ गुन्हे दाखल आहेत. पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार धर्मेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने केली आणि त्यातून अजितचा पर्दाफाश झाला.

पाकिस्तानात जाऊन फेसबुक मित्रासोबत लग्न करणारी ‘अंजू’ भारतात परतली; भारतीय सीमेत येताच…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी जगताकडे वळण्याआधी अजित मौर्य मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिसचे सीलिंग तयार करत होता. काम बंद झाल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. मुंबईत २००० साली अजितनं ४० वर्षीय संगीताशी लग्न केलं. तिच्यापासून अजितला तब्बल ७ मुलं झाली. २०१०मध्ये अजितचं काम सुटलं आणि तो त्याच्या गावी परतला. २०१६ साली त्याच्याविरोधात पहिला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

दोन वर्षांपूर्वी अजित ३० वर्षीय सुशीलाच्या संपर्कात आला आणि त्यानं बनावट नोटांचा व्यवसाय सुरू केला. चिटफंडसारख्या योजनांद्वारे लोकांना फसवायला सुरुवात केली. २०१९मध्ये अजितनं सुशीलाशी लग्न केलं. त्यांना पुढे दोन मुलं झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघींसाठी दोन स्वतंत्र घरं!

संगीता आणि सुशीला या दोघींसाठी अजितनं दोन स्वतंत्र घरं बांधली आहेत. या दोघीही आलिशान पद्धतीचं आयुष्य जगत असून आपली कमाई दोघींमध्ये एकसारखी वाटून देत असल्याचंही अजित मौर्यनं तपासात सांगितलं. त्याच्या मोबाईलची छाननी केल्यानंतर त्याच्या आयुष्यात ६ इतर महिलाही येऊन गेल्याचं पोलिसांना समजलं. या महिलांना घेऊन तो विदेशात ट्रिपसाठीही जाऊन आल्याचं उघड झालं.