US Embassy Travel Advisory amid Air India Plane Crash : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या विमानातून १२ क्रू सदस्यांसह २४२ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये १६९ भारतीय नागरिक होते. तर ५३ ब्रिटिश नागरिक होते. शिवाय हे विमान निवासी भागात कोसळलं असल्यामुळे स्थानिक इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, अमेरिकेने या घटनेची दखल घेतली आहे. अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने कामानिमित्त, पर्यटनासाठी अथवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी भारतात आलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे.
अमेरिकन दूतावासाचा नागरिकांना सल्ला
अमेरिकेच्या दूतावासाने म्हटलं आहे की “आज (१२ जून) अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही प्रभावित भागातील (अहमदाबाद) अमेरिकन नागरिकांना बातम्यांवर लक्ष ठेवण्याचं, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आपत्कालीन सूचनांचे पालन करण्याचं, महत्त्वाची आपत्कालीन माहिती मिळवण्यासाठी step.state.gov, स्मार्ट ट्रॅव्हलरवर नोंदणी करण्यास व इतर अतिरिक्त अपडेट्ससाठी अमेरिकेच्या पर्यटन विभागाच्या, परराष्ट्र विभागाच्या सोशल मीडिया हँडल्सवरून माहिती घेण्याचा सल्ला देत आहोत”.
अमेरिकेने नागरिकांना सल्ला दिला आहे की “जे नागरिक प्रभावित भागात आहेत, सुरक्षित आहेत त्यांना आमच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहण्याचं आवाहन करत आहोत. तु्म्ही जर प्रभावित भागात असाल आणि तुम्हाला तात्काळ आपत्कालीन सेवेची आवश्यकता असेल तर कृपया स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. आम्ही अमेरिकन नागरिकांना प्रभावित भागात जाणं टाळण्याचं आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करतो. परदेशात असलेल्या अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता ही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. वेगवेगळे अलर्ट, भारतातील दूतावास व वाणिज्य दूतावासाच्या संकेतस्थळाद्वारे अमेरिकन नागरिकांना आम्ही माहिती देत राहू”.
नेमकी घटना काय?
एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं. तसेच यामध्ये दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते मेघानी नगरमधील रहिवासी भागात कोसळलं.