आगामी लोकसभा निवडणुकीआधी देशातले बहुतांश विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएविरोधात एकत्र आले आहेत. याआधी २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली होती. मोदींविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू असून त्याला आता यश येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींविरोधात आतापर्यंत २६ पक्ष एकत्र आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात विरोधकांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. परंतु या दोन्ही बैठकींच्या वेळी एआयएमआयएम पक्षाला निमंत्रण दिलं नव्हतं. यावर एआयएमआयएम पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी काही वेळापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचित केली. यावेळी पठाण म्हणाले, हे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष काल बंगळुरूत भेटले. ते १७ – १८ पक्ष एकत्र आले आहेत. परंतु त्यांनी आम्हाला बोलावलं नाही. कारण आम्ही त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य (पॉलिटिकल अनटचेबल) आहोत. त्यांच्या त्या बैठकीला नितीश कुमार आले होते, जे पूर्वी भाजपाबरोबर होते. त्या बैठकीला उद्धव ठाकरे आले होते, जे पूर्वी भाजपाबरोबर होते. मेहबुबा मुफ्ती तिथे होत्या, ज्या पूर्वी भाजपाबरोबर होत्या. हे सगळे पक्ष आता अचानक धर्मनिरपेक्ष झाले आहेत.

वारिस पठाण म्हणाले, तिथे अरविंद केजरीवालही उपस्थित होते. जे यापूर्वी गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसला शिव्या देत होते. त्यांच्यामुळे तिथे काँग्रेसचा पराभव झाला. तेही आता धर्मनिरपेक्ष झाले आहेत. हे लोक म्हणत आहेत की, यांना देशाचं संविधान वाचवायचं आहे, लोकशाही टिकवायची आहे, भाजपाला हरवायचं आहे, परंतु आमचंसुद्धा तेच म्हणणं आहे. आम्हालाही तेच करायचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले, संविधान वाचवणं आणि देशात मोदींना हरवणं हेच आमचंही ध्येय आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपाला हरवायचं आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही, हाच आमचाही प्रयत्न असेल. पण तुम्ही (विरोधी पक्ष) आमच्याकडे दुर्लक्ष करत आहात. याआधी आम्ही यूपीए सरकारमध्ये होतो, ते तुम्ही विसरलात. परंतु तुमच्याच पहिल्या (पाटणा येथील) बैठकीत हजर असलेले प्रफुल्ल पटेल मात्र काल एनडीएच्या बैठकीत भाजपाबरोबर गेले.