पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेचच सूत्रं हातात घेत पोलीस प्रशासनात मोठे बदल केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी जवळपास २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आधी या अधिकाऱ्यांची बदली केली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा राज्यात आणण्यात आलं आहे त्यामध्ये महासंचालक विरेंद्र, अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जावेद शमीम आणि महासंचालक (सुरक्षा) विवेक सहाय यांचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी यासंबंधी आदेश काढण्यात आले.

दरम्यान ममता बॅनर्जी सरकारकडून कुचबेहरचे पोलीस अधिक्षक देबाशीश धार यांचं निलंबन करण्यात आलं आहे. कुचबिहार जिल्ह्य़ातील सितलकुची भागातील एका केंद्रावर मतदान सुरू असताना औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी नागरिकांच्या कथित हल्ल्यापासून स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले होते. त्याप्रकरणी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी आधीच सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

देबाशीश धार यांच्या जागी के कन्नन यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणुकीच्या काळात त्यांनी रजेवर पाठवण्यात आलं होतं.त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने बदली केलेल्या विरेंद्र यांनाही पुन्हा आपल्या पदावर आणण्यात आलं आहे. विरेंद्र यांच्या जागी नियुक्ती महासंचालकपदी नियुक्ती झालेल्या नीरज पांडे यांची बदली करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांनी अनेक ठिकाणी पोलिसांच्या अकार्यक्षमेतवरुन नाराजी जाहीर केली होती. “गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाचा कारभार माझ्या हातात नव्हता. निवडणूक आयोगाच्या हातात सर्व नियंत्रण होतं. काही ठिकाणी अकार्यक्षमता दिसत असून लवकरच यासंबंधी निर्णय घेऊ,” असं त्या म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जी सरकारने १६ जिल्ह्यांमधील पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.