मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये आजवर २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठय़ा असामींसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली आहे.
पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे, सरकारी नोकरीमध्ये नियुक्त्या करणे अशा गैरप्रकारांना २००९ पासून सुरुवात झाली. २०१३ पर्यंत जवळपास १०२० विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र या सर्वाच्या अर्जाची छाननी केली असता एकाचाही अर्ज आढळून आला नाही, तर याच काळात १०८७ अपात्र उमेदवारांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. यामुळे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. तसेच कंत्राटी शिक्षक, अन्ननिरीक्षक, पोलीस हवालदार आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गैरव्यवहार करण्यात आले. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारांबाबत तक्रारी वाढल्यानंतर या घोटाळ्याला २०१३ मध्ये वाचा फुटली. इंदोरमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. आनंद राय यांनी हा घोटाळा उजेडात आणला.
चौकशी..
इंदोर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद राय यांनी हा घोटाळा प्रकाशात आणला. त्यांनी यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील काही घोटाळे उघड केले आहेत. राय यांच्या म्हणण्यानुसार व्यापम घोटाळ्याची सुरुवात २००४ मध्ये झाली. इंदोर शहराजवळील खांडवामध्ये पहिला प्रकार घडल्याचा दावा त्यानी केला आहे. व्यापमची चौकशी मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाकडून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आली. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने यामध्ये हस्तक्षेप करत ७२० पालक व उमेदवार आणि १२९ राजकीय नेते, अधिकारी व दलालांना अशा २००० लोकांना अटक केली. या सर्वावर विविध कलमांखाली आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
घोटाळ्याचे स्वरूप..
* व्यापमंच्या अधिकाऱ्यांसह अनेक रॅकेट यासाठी कार्यरत होती. परीक्षा खोलीमध्ये बनावट उमेदवार बसविणे, उत्तरपत्रिका देणे, दोन उमेदवारांमध्ये उत्तरे सांगणाऱ्यास बसविणे आदी गैरप्रकार करण्यात आले. नोकरीसाठी १५ लाख व वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ५० लाख रुपये उकळण्यात येत होते.
* नकली उमेदवार- या घोटाळ्यामध्ये सर्वाधिक वापर प्रवेश ओळखपत्राचा करण्यात आला. परीक्षेचे ओळखपत्रावर बनावट उमेदवाराचे छायाचित्र छापण्यात येत होते. परीक्षा झाल्यानंतर त्या जागी खऱ्या म्हणजेच ज्याला प्रवेश द्यायचा आहे. त्याचे छायाचित्र बदलण्यात येत होते. याला अर्थातच व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा होता.
* इंजिन आणि बोगी यंत्रणा- परीक्षेला बसलेल्या दोन उमेदवारांच्या मध्ये व्यक्ती बसविली जायची. तिच्याकडून या उमेदवारांना उत्तरे पुरविली जायची. याला पर्यवेक्षकही मदत करत असे.
* कोरी उत्तर पत्रिका- या उमेदवारांना उत्तर पत्रिका कोरी सोडण्यास सांगितले जायचे. त्यांना निकालामध्ये दिलेल्या गुणांप्रमाणे ओएमआर पुस्तकानुसार गुण दिले जात होते.
घोटाळ्यातील रथी-महारथी
मध्य प्रदेशचे माजी शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत शर्मा, त्यांचा खास अधिकारी ओ. पी. शुक्ला, स्वीय साहाय्यक सुधीर शर्मा यांना शिक्षक भरतीमध्ये गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली. राज्यपाल राम नरेश यादव यांनी पाच जणांकडून वनरक्षकपदासाठी लाच घेतल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या पदाच्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव वगळले. राज्यपालांचे सुरक्षा अधिकारी धनराज यादव, आयपीएस अधिकारी आर. के. शुक्ला यांनाही विविध अधिकारी भरतीप्रकरणी अटक करण्यात आली. व्यापम परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदी, अधिकारी नितीन महेंद्रा, अजय सेन आणि पीएमटी परीक्षेचे मुख्याधिकारी सी. के. शर्मा यांना अटक करण्यात आली.
संकलन : हेमंत बावकर