Vice Presidential Election : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एकीकडे एनडीएच्या आणि दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू असल्यामुळे घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीएकडून रविवारी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा उमेदवार कोण असेल? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांवर बैठका सुरू आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज (१८ ऑगस्ट) संध्याकाळी महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधक कोणाला संधी देतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे की या संदर्भातील निर्णयाबाबत आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर विरोधकांची भूमिका समोर येईल. तसेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी काय भूमिका घेतात हे देखील महत्वाचं असणार आहे. कारण सत्ताधारी पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, “जर महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती झाले तर आम्हाला आनंद होईल. मात्र, निवडणूक होईल. इंडिया आघाडी जो निर्णय घेईल, तो निर्णय काय असेल? हे मी सांगू शकत नाही. पण आज आम्ही त्यावर चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर निर्णय घेऊ. देशात उपराष्ट्रपती पदापेक्षाही गंभीर मुद्दे आहेत. मत चोरीचा मुद्दा आणि त्या मुद्यापासून आम्हाला लक्ष हटवायचं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

सीपी राधाकृष्णन यांना एनडीएकडून उमेदवारी

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे गेल्या तीन दशकांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते भाजपाच्या तिकीटावर दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक कसं आहे?

-नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२५ असेल.

-नामांकन अर्ज छाननीची तारीख २२ ऑगस्ट २०२५ असेल.

-उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असेल.

-मतदानाची तारीख ९ सप्टेंबर २०२५ असेल आणि त्यानंतर मतमोजणी होईल.