World Cup 2019 : शहीद जवानांच्या हौतात्म्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान हे अत्यंत मोलाचे आहे. त्या शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचंय, असं विधान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने केले. यंदाची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया मंगळवारी रात्री इंग्लंडला रवाना झाली. त्या आधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

“तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी प्रेरणा ही सर्वात महत्वाची असते. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात. त्यामळे त्यांच्यापेक्षा मोठं प्रेरणास्थान इतर कोणतं असूच शकत नाही . जेव्हा भारतीय जवानांचा विषय निघतो किंवा देशासाठी त्यांची भूमिका याबाबत चर्चा घडते, तेव्हा त्यांच्या कर्तव्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही”, असेही तो म्हणाला.

World Cup २०१९ हा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक विश्वचषक असेल. कारण हा एकदिवसीय विश्वचषक आहे. आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे, असे वक्तव्यही त्याने यावेळी केले.

आमचा संघ हा अत्यंत समतोल आहे. त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे हेच यंदाच्या विश्वचषकातील आमचे उद्देश्य आहे. जो संघ दडपणाचा चांगला सामना करू शकेल, तोच संघ विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकेल असा मला विश्वास आहे. इंग्लंडमधील वातावरणापेक्षाही सामन्याचा आणि स्पर्धेचा दबाव पेलणे, हे महत्वाचे असणार आहे. आमचे सगळे गोलंदाज हे ताजेतवाने आहेत. कोणीही गोलंदाज थकलेले नाहीत. चार षटके फेकल्यानंतर कोणताही गोलंदाज थकलेला दिसला नाही. ५० षटकांच्या सामन्यातही गोलंदाजांना ताजेतवाने ठेवणे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणे हे आमचे ध्येय असणार आहे, असेही विराटने स्पष्ट केले.