एनडीएतून बाहेर पडलेल्या टीडीपीने अर्थात तेलगु देसम पार्टीने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. आम्ही भाजपासोबत जाण्याची घोडचूक केली नसती तर आमच्या १५ जागा आणखी निवडून आल्या असत्या असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. तेलगु देसम पार्टीच्या ३७ व्या स्थापना दिवशी ते बोलत होते.

तेलंगणपासून वेगळे झालो तेव्हा टीडीपीने भाजपासोबत युती केली. युती करण्यामागे आमचा उद्देश राजकीय फायदा नसून विकास एवढाच होता. मात्र विकासाकडे भाजपाने सपशेल दुर्लक्ष केले. आम्ही त्यांच्यासोबत हातमिळवणी केली नसती तर १५ जागा आणखी जिंकल्या असत्या. महिनाभरापूर्वीच टीडीपीने एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर भाजपावर टीकेची एकही संधी चंद्रबाबू नायडू सोडत नाहीयेत.

आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा न दिला गेल्याने आणि आंध्र प्रदेशच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे कारण देत चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जर आंध्र पद्रेशला विशेष राज्याचा दर्जा दिला तर बिहार, झारखंड, ओदिशा अशी सगळीच राज्ये विशेष राज्याचा दर्जा मागतील असे म्हणत ही मागणी अर्थमंत्री अरूण जेटलींनी फेटाळली होती. त्यानंतरच चंद्राबाबू नाराज झाले होते. आता त्यांनी भाजपासोबत युती करून घोडचूक केल्याचे म्हटले आहे.