भारतात इंग्रजांनी टपाल सेवा सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत या टपाल सेवेच्या प्रवासात अनेक आमूलाग्र बदल घडत गेले. आजच्या घडीला भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही खूप मोठी आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून भारतीय डाक विभागाला ओळखले जाते. पण भारतातील पहिले डाकघर कोणते आहे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर घ्या जाणून…
भारताचे पहिले पोस्ट ऑफिस कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) किशनगंगा नदीच्या काठावर आहे. या पोस्ट ऑफिसचा पिन कोड क्रमांक १९३२२४ आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरपासून हे पोस्ट ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तसेच या पोस्ट ऑफिसच्या पलीकडे टपाल साहित्य पोहचवणे शक्य नसल्यामुळे हे पोस्ट ऑफिस भारतातील शेवटचे पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता हे भारताचे पहिले पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जात आहे.
quiziframe id=19 dheight=282px mheight=417px
टपाल विभागाच्या बारामुल्ला सर्कलचे अधीक्षक अब्दुल हमीद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी किंवा पाकिस्तान अस्तित्वात येण्याआधीही पोस्ट ऑफिस कार्यरत होते. १९६५ व १९७१मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धादरम्यान तसेच सीमेपलीकडून वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांदरम्यानही हे पोस्ट ऑफिस आपली सेवा चोख बजावत होते. १९९० मध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवादाच्या हल्ल्यानंतरही या पोस्ट ऑफिसची सेवा बंद झाली नाही.
पोस्टमास्तर शाकीर भट यांनी सांगितले की, या पोस्ट ऑफिसने १९४७ पासून सुरु केलेली आपली सेवा आजपर्यंत थांबवलेली नाही. २०२१मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा करार झाला. तत्पूर्वी बाहेर जाणे, टपाल पोहोचवणे किंवा टपाल जमा करणे खूप जोखमीचे होते’ भट यांची नियुक्ती टपाल विभागात १९९२मध्ये झाली १९९३ साली आलेल्या महापुरात हे पोस्ट ऑफिस वाहून गेले होते. त्यामुळे त्या काळात भट यांच्या घरातून पोस्ट ऑफिसची सेवा देण्यात येत होती. पर्यटकांमध्ये हे पोस्ट ऑफिस खूप प्रसिद्ध आहे. पर्यटक आवर्जून या पोस्ट ऑफिसला भेट देतात.