What is a Regenerative Braking System : केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सोमवारी, २६ मे रोजी गुजरातमधील दाहोद येथे आधुनिक लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचं कौतुक केलं. गुजरातमधील दाहोद येथे उत्पादित भारतातील पहिलं ९ हजार हॉर्सपॉवर लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं. यावरून नेटिझन्सने त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम म्हणजे नेमकं काय हे पाहूयात.

“ओव्हरहेड वायर्समधून इंजिनाला वीजपुरवठा केला जाईल. पण जेव्हा ब्रेक लावले जातील तेव्हा याच इंजिनातून वीज निर्मिती होईल आणि ती परत ओव्हरहेड वायरमध्ये परत पाठवली जाईल. हे आधुनिक तंत्राचं आश्चर्य आहे”, असं आश्विनी वैष्णव म्हणाले होते. वंदे भारत ट्रेनमध्ये ही यंत्रणा वापरण्यात येत आहे. आश्विनी वैष्णव यांच्या या विधानानंतर त्यांची समाज माध्यमातून खिल्ली उडवली गेली. अनेकांना ते काय म्हणाले हे समजलंच नाही. तर काहीजण म्हणले रीलमंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे. पण थोड अभ्यास केला तर असं स्पष्ट होतंय की आश्विनी वैष्णव जे म्हणाले त्यात तथ्य आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयानेही याआधी खुलासा केला होता.

वंदे भारत ट्रेनचे कोच रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमचे सुसज्ज असून इतर ट्रेनच्या तुलेनत वंदे भारत अधिक ऊर्जा कार्यक्षम आहेत, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली म्हणजे काय?

ट्रेनची गतिज ऊर्जा (Kinetic Energy) मंदावताना रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली ही ऊर्जा कॅप्चर करते आणि या ऊर्जेचा पुनर्वापर करते. पारंपरिक ब्रेकिंग सिस्टिममध्ये सामान्य असलेली ही ऊर्जा उष्णता म्हणून वाया घालवण्याऐवजी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग इलेक्ट्रिक मोटर्समधील प्रवाह उलट करते, गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतर करताना प्रभावीपणे ट्रेनची गती कमी करते. ही वीज नंतर पॉवर ग्रीडमध्ये परत पाठवली जाते. ऊर्जेचा वापर आणि यांत्रिक ब्रेक वेअर कमी करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये असल्याने देखभाल खर्चही कमी येतो.