जागतिक निसर्ग संवर्धन दिन हा निरोगी वातावरण हा स्थिर आणि निरोगी मानवी समाजाचा पाया आहे हे दाखवून देण्यासाठी साजरा केला जातो. तसेच हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जसे कि प्राणी आणि झाडे हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे संरक्षण करणे हा आहे. दरवर्षी २८ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. आजची जागतिक स्तिथी बघता तरी मानव जातीने नैसर्गिक संसाधने जपून वापरायलाच हवीत. आज आपण ही संसाधने जपून वापरली नाहीत किंवा त्यांचे योग्यरित्या संवर्धन केले नाही तर आपल्याच पुढच्या पिढीला याचा वापर करता येणार नाही.

निसर्गातील गोष्टींच्या चुकीच्या वापरामुळे आणि मानव करत असलेल्या प्रगतीमुळे निसर्गाला खूप मोठा धोका निर्माण होत आहे. म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंग, एखाद्या प्राण्याची पूर्ण जातच नष्ट होणे यासारखे प्रकार घडत आहेत. हे सगळ थांबण्यासाठी आणि निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

इतिहास –

जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचा इतिहास आणि मूळ माहित नाही. परंतु २८ जुलै रोजी हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे आपण मानव प्रजाती कसे निसर्गाचे शोषण करीत आहोत यावर आत्मपरीक्षण करणे आणि निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलणे हे आहे. नैसर्गिक संपत्ती वापराबाबतच्या अतिरेकीपणामुळे ग्लोबल वार्मिंग, विविध रोग, नैसर्गिक आपत्ती, तापमानात वाढ इत्यादीं समस्या मानवाला भेडसावत आहे.

महत्त्व –

पृथ्वी जिला आपण आईचा दर्जा देतो. तिच्या संरक्षणासाठी संसाधनांचे संवर्धन करणे ही आपली महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाणी, हवा, माती, ऊर्जा, वनस्पती, खनिजे, जीवजंतू इ. निसर्गाचे विविध घटक जपून पृथ्वीच्या नैसर्गिक सौंदर्यात संतुलन राखता येते. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाची ओळख ही निरोगी वातावरण ही आहे. हे वातावरण स्थिर आणि उत्पादक समाजाचा पाया आहे. वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी भाग घेतला पाहिजे.