मराठा समाजात आज अनेकांना डावलून कुटुंबशाहीचे राजकारण सुरु  आहे. ही कुटुंबशाही संपल्याशिवाय डावलले गेलेल्या वंचित मराठा तरु णांसाठी दारे उघडली जाणार नाहीत, त्यामुळेच आता तरु णांनी सावध व्हायला हवे. सुप्रिया सुळे म्हणतात,लोकसभा निवडणुकीत माझे आठ नातेवाईक उभे आहेत. ह्या कुटुंबशाहीच्या विरोधात आमची लढाई आहे. नगरमध्येही अनेक इच्छुक असतानाही विद्यमान आमदाराला संधी देण्यात आली ‘हे मॅच फिक्सिंग’ आहे. मराठा समाज व आम्हीही वंचित आहोत. काँग्रेसची आता भाजप झाली असून राष्ट्रवादी तर भाजपच्या मांडीवरच जाऊन बसली आहे. दबावाचे राजकारण संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करा, असे आवाहन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे नगरमधील उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची आज, शुक्रवारी शेवगावमध्ये सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आघाडीचे शिर्डीतील उमेदवार संजय सुखराम, समन्वयक प्रा. किसन चव्हाण, अ‍ॅड. अरुण जाधव, प्रकाश भोसले, अशोक सोनवणे, तुकाराम पवार, मच्छिंद्र पवार, भोरू म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंबेडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, केंद्रात सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणा अशी अट आपण काँग्रेसला घातली होती, मात्र ही अट काँग्रेसला मान्य न झाल्याने आपण राज्यात काँग्रेसशी युती केली नाही. काँग्रेसने ही अट मान्य केली असती तर ‘आरएसएस’च्या वाघाची नखे निघाली नसती व त्याला दातही राहिले नसते. हा वाघ खेळण्यातील वाघ राहीला असता, मात्र दरवेळेस आरएसएसची भीती दाखवून मिळणारी मुस्लिमांची मते आपल्याला मिळणार नाहीत ह्या भीतीने काँग्रेसने तसे करण्यास नकार दिला आणि आपण आघाडीला स्वत्रंतपणे रिंगणात उतरवले. मुस्लिमांनी आता विचारपूर्वक मतदान करायला हवे. उद्या जर भाजपला सत्ता स्थापनेसाठी काही खासदारांची गरज लागली तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपला देतील. २००४ मध्ये गोध्रा हत्याकांड झाले त्यावेळी शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते, त्यांनी त्यावेळी मोदींवर दावा का ठोकली नाही? निवडणूक आली की मौलाना राष्ट्रवादीला मते द्या, असे सांगेल मात्र ही मते भाजपला जाणार आहेत याचे भान मुस्लिमांनी ठेवावे. मुस्लिम मतांचा वापर हत्यारासारखा होतो ते ओळखा. असेही आंबेडकर म्हणाले.

ओबीसींचे राजकरण संपवण्यासाठी मुंडेंना संपवले

स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये राहूनही त्यांनी ओबीसींचे नेतृत्व केले, मात्र ओबीसींचे राजकारण संपवण्यासाठी त्यांना संपवण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला व याचा छडा वंजारी समाजाने लावायला हवा असेही आवाहन त्यांनी केले. भाजप सध्या ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण करत आहे. बीडच्या निवडणुकीत आम्हाला संविधान बदलायचे आहे असे, पंकजा मुंडे म्हणाल्या,  मात्र त्यांना हे भाजपनेच म्हणायला लावले आहे. त्या अशा कधीही बोलू शकत नाही. संविधान नसते तर आमच्या भगिनी मंत्री झाल्या नसत्या व गोपीनाथ मुंडेसुद्धा उपमुख्यमंत्री झाले नसते, असेही आंबेडकर म्हणाले.