मध्य प्रदेशमध्ये २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी तब्बल १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे यावेळी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये सत्ताविरोधी भावना असल्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळेच भाजपानेही मध्य प्रदेशमध्ये आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. तसेच शिवराज सिंह यांना सुरुवातीलाच तिकीट जाहीर न करता उशिरा तिकीट देण्यात आलं. एग्झिट पोलनेही मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला अनुकुल अंदाज वर्तवले होते. मात्र, प्रत्यक्षात रविवारी (३ डिसेंबर) मतमोजणीच्या दिवशी सर्व अंदाज चुकीचे ठरले. मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिलं. यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची निवड होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत विद्यमान मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहान यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (३ डिसेंबर) माध्यमांशी बोलत होते.

कार्तिकेय चौहान म्हणाले, “मध्य प्रदेशमधील विजयाचं श्रेय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं. भाजपाच्या सर्व नेत्यांना जातं. या विजयाचं सर्वाधिक श्रेय मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिणींना, माझ्या आत्यांना जातं. निकालाचं चित्र जसजसं स्पष्ट होईल, तसं दिसेल की, भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे.”

शिवराज सिंह पाचव्यांदा मुख्यमंत्री होणार याबाबतच्या घोषणाबाजीविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता कार्तिकेय चौहान म्हणाले, “यावर पक्ष अंतिम निर्णय घेईल.”

निकालावर शिवराज सिंह यांची प्रतिक्रिया

निकालावर प्रतिक्रिया देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले, “नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या जनतेच्या मनात आहेत. मोदींच्या मनातही मध्य प्रदेश आहे. त्यांनी मध्य प्रदेशात ज्या सभा घेतल्या, जनतेला आवाहन केलं ते जनतेच्या मनाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच हा निवडणूक निकालाचा कल समोर येत आहे. हेच या निकालाचं प्रमुख कारण आहे.”

“आमच्या कामाने जनतेची मनं जिंकली”

“दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या कामाची आम्ही मध्य प्रदेशमध्ये योग्यरीत्या अंमलबजावणी केली. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मीपासून लाडली बेहना अशा योजना आणल्या. त्यामुळे गरिबांसाठी, भाचे-भाच्यांसाठी काम झालं. या कामानेही जनतेची मनं जिंकली. तसेच मध्य प्रदेश एक कुटुंब बनला,” असं मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Madhya Pradesh Election Result 2023 Live : भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अमित शाह यांची अचूक रणनीती आणि…”; मध्य प्रदेश निकालावर शिवराज चौहान यांची प्रतिक्रिया

“अमित शाह यांची अचूक रणनीती, त्याला मिळालेला प्रतिसाद, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं मिळालेलं मार्गदर्शन, संघटनेचं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे निवडणुकीला वेग आला. त्यामुळेच मी आधीही म्हटलं होतं की, आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. कारण जनतेचं प्रेम सगळीकडे दिसत होतं,” असंही शिवराज सिंह यांनी नमूद केलं.