भंडारा : श्रावणमासाची सांगता झाल्यामुळे हॉटेलची दारे उघडण्यापूर्वी मासे आणण्यासाठी पवनी येथे गेलेल्या उमरेड येथील हॉटेल मालकाची भरधाव कार पुलावरून ५० फुट नदी पात्रात कोसळल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा अपघात रविवार सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील मरूनदी पुलावर झाला. सागर मधूकर वाघमारे (३०) रा. उमरेड असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक सागरचे उमरेड येथे राष्ट्रीय मार्गावर हॉटेल आहे. श्रावणमासाची सांगता झाल्यामुळे रविवारला हॉटलेची दारे उघडण्यापूर्वी सागर हा मासे आणण्यासाठी उमरेड येथून पहाटे ५ वाजताच्या सुमारास आपल्या टाटा हॅरिअर कार क्र. एम.एच. ४० सी.एक्स. ७९२६ ने पवनी येथे आला होता. परतीच्या प्रवासात भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय मार्गावरील वळणावरून ही कार अंदाजे पुलावरून ५० फुट खोल नदीपात्रात शिरली. नदीपात्रात पाणी असल्यामुळे सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच, ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या कारमधून सर्वप्रथम मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जेसीबी व क्रेनच्या मदतीने कारसुध्दा बाहेर काढण्यात आली. मृतदेह शवविच्छेदणाकरीता रूग्णालयात रवाना करण्यात आला आहे.

पुलावरील सुरक्षा कठडे तुटले

ही हॅरियर कार राष्ट्रीय मार्गावरील वळणावर सुरक्षेसाठी ठेवलेले लोखंडी ड्रम व पुलावरील सुरक्षा कठडे तोडून अंदाजे ५० मिटर लांब व ५० फुट खोल नदीपात्रात शिरली. यावरून कारचा वेग किती असावा, याचा अंदाज येतो. नदीपात्रातील पाण्यात बुडालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर सागरच्या डोक्याला एक किरकोळ जखम आढळली. त्यामुळे सागरचा मृत्यू हा पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.