कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-भाजपा मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. दरम्यान काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पीएफआय, बजरंग दल अशा संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. ‘बजरंग बली की जय’ असे म्हणणाऱ्यांना काँग्रेस तुरुंगात टाकणार आहे, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत बजरंग दल ही संघटना केंद्रस्थानी का आली? हे जाणून घेऊ या.

मोदी यांची काँग्रेसवर टीका

सत्तेत आल्यास बजरंग दल या संघटनेवर कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने आश्वासन दिले आहे. हाच मुद्दा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. जे लोक भगवान हनुमानाची उपासना करतात, त्यांना तुरुंगात टाकण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यांनी अगोदर प्रभु राम यांनाही बंद (बाबरी मशिदीचा संदर्भ) केले होते, अशी टीका मोदी यांनी केली. विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) तसेच भाजपाने याच मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

Congress, Vanchit, Muslims, Akola,
अकोल्यात मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेस व वंचितचा डोळा
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

बजरंग दल संघटना विश्व हिंदू परिषदेची शाखा

बजरंग दल या युवकांच्या संघटनेची स्थापना रामजन्मभूमी आंदोलनापासून झाली. रामजन्मभूमीच्या आंदोलनाला चालना मिळावी म्हणून विश्व हिंदू परिषद संघटना तरुणांच्या शोधात होती. त्यानंतर बजरंग दल या संघटनेची स्थापना झाली. विश्व हिंदू परिषद, भाजपा संघ परिवाराचा भाग आहेत. तर बजरंग दल ही संघटना तांत्रिकदृष्ट्या विश्व हिंदू परिषदेची एक शाखा आहे.

भाजपाची काँग्रेसवर सडकून टीका

काँग्रेसच्या या आश्वासनानंतर दिल्लीमध्ये भाजपाने पत्रकार परिषद घेतली. बजरंग दल सारख्या संघटनेवर कारवाई करणे म्हणजे पीएफआय सारख्या संघटनांचा बचाव करणे होय, अशी भूमिका भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मांडली.

मोदी यांनी जनतेची माफी मागावी- काँग्रेस

भाजपाच्या या आरोपानंतर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान हनुमान यांची बजरंग दल अशा संघटनेशी तुलना करणे चुकीचे आहे. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मोदी यांनी जनतेची माफी मागायला हवी. भगवान हनुमान यांचा अपमान करण्याचा मोदी यांना कोणीही अधिकार दिलेला नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले.

बजरंग दलाची भूमिका काय?

विनायक कटियार हे बजरंग दल संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी काँग्रेसने केलेल्या आश्वासनावर प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्यावर बंदी घालण्याइतपत काँग्रेसकडे ताकद नाही. ते कर्नाटकमध्ये सत्तेतही येणार नाहीत. मात्र काँग्रेसला संपूर्ण देशातून हद्दपार करण्याऐवढी आमच्यात ताकद आहे,” असे विनायक कटियार म्हणाले.

…अन् संघटनेचे नाव बजरंग दल असे ठेवण्यात आले

१९८४ साली लखनौ येथे विश्व हिंदू परिषदेची एक बैठक झाली होती. या बैठकीला अशोक सिंघल आणि विनायक कटियार तसेच अन्य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कटियार यांनी अशोक सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदेची एक युवकांची संघटना असायला हवी, असे सुचवले. त्यानंतर सिंघल यांनी अशी संघटना स्थापन करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. या संघटनेमध्ये राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख व्हायला हवा, असे मत मांडण्यात आले. त्यानंतर प्रभु राम यांचे निस्सिम भक्त असलेल्या भगवान हनुमानाच्या नावावरून या संघटनेचे नाव ‘बजरंग दल’ असे ठेवण्यात आले.

बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना भाजपाकडून तिकीट

बजरंग दल संघटनेच्या संयोजकपदी विनायक कटियार यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेचा विस्तार अन्य राज्यांत झाल्यानंतर कटियार यांची राष्ट्रीय संयोजक म्हणून नेमणूक करण्यात आली. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा फक्त दोन जागांवर विजय झाला. या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा संघटनांची साथ लाभली. या निवडणुकीत भाजपाने अनेक धार्मिक व्यक्तींना तिकीट दिले होते. बजरंग दलाचे पदाधिकारी कटियार यांचा भाजपाशी संबंध राहिलेला आहे. १९९१, १९९८, १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना अयोध्या येथून तिकीट दिले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत कटियार यांचा विजय झाला होता. कटियार यांची दोन वेळा राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे भाजपा उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. बजरंग दलातील कटियार यांचे उत्तराधिकारी जयभान सिंह पावैया यांनादेखील भाजपाने ग्वालियर येथून तिकीट दिले होते.

बाबरी मशिदीच्या खटल्यात कटियार आरोपी

ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९० आणि ६ डिसेंबर १९९२ या दोन्ही प्रसंगांत बजरंग दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच या संघनेने राम जन्मभूमी आंदोलनात कारसेवकांना अयोध्येत जमा करण्याचे काम केले होते. बाबरी मशिदीच्या खटल्यात कटियार आरोपी होते. राम मंदिराच्या आंदोलनामुळे भाजपाचा राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल यासारख्या संघटनांनी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र या आंदोलनानंतर भाजपाने या संघटनांना स्वत:पासून दूर केले. याच कारणामुळे या दोन्ही संघटनांच्या नेत्यांनी अनेकवेळा भाजपाविरोधी भूमिका घेतलेली आहे.

बजरंग दल संघटना कशी काम करते?

दरम्यान बजरंग दल या संघटनेची सक्रियता कमी झाली आहे. या संघटनेचा सध्या कोणताही मुख्य नेता नाही. सध्या या संघटनेचे आग्रा येथील नीरज डोनेरिया हे राष्ट्रीय संयोजक आहेत. ही संघटना अलिकडे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. सध्या या संघटनेकडून गोरक्षण, धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार, हुंडा, अस्पृश्यताविरोधी आंदोलन, हिंदू धर्मांच्या प्रतिकांचे रक्षण करणे, परंपरा, प्रथा, श्रद्धा यांचे संरक्षण करणे, टीव्हीवरील अश्लिलता रोखणे अशा प्रकारची कामे केली जातात. प्रत्येक वर्षाच्या १४ ऑगस्ट या दिवशी बजरंग दलाकडून ‘अखंड भारत संकल्प दिवस’ पाळला जातो. तसेच या संघटनेकडून हनुमान जयंती, हुतात्मा स्मृती दिवस आणि शौर्य दिवस (६ डिसेंबर-या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली होती.) पाळले जातात.

कर्नाटकमध्ये बजरंग दल संघटना अनेक कारणांमुळे चर्चेत

बजरंग दल ही संघटना कर्नाटकमधील वेगवेगळ्या धार्मिक वादांच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे. याच वर्षाच्या मार्च महिन्यात मंगळुरू येथे होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेली पार्टी उधळून लावल्यामुळे या संघटनेच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच महिन्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवमोग्गा येथे ‘लेडिज नाईट’चा कार्यक्रम उधळून लावला होता. मागील वर्षाच्या जुलै महिन्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सुलिया येथील १९ वर्षीय मसूद या मुलाच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रविण नेट्टारू याची हत्या करण्यात आली. त्यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.