लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिपुरात सर्वाधिक ७७.५३ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच ५२.७४ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच मणिपूरमध्ये ७६.०६ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७१.८४ टक्के, छत्तीसगडमध्ये ७२.१३ टक्के आणि आसाममध्ये ७०.६६ टक्के मतदान झाले.

याशिवाय महाराष्ट्रात ५३.५१ टक्के, बिहारमध्ये ५३.०३ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ५४.८३ टक्के, राजस्थानमध्ये ५९.१९ टक्के, तसेच केरळमध्ये ६३.९७ टक्के, कर्नाटकमध्ये ६३.९० टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये ६७.२२ टक्के मतदान झाल्याचं बघायला मिळालं.

हेही वाचा – NOTAला सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होतं? का पुन्हा निवडणूक होते? जाणून घ्या नकार…

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७ वाजता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात एकूण १२ राज्यातील मिळून ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. महत्त्वाचे म्हणजे उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ६ पर्यंत वाढवण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. यावेळी देशभरातील १०२ मतदारसंघांत ६५.५ टक्के मतदान झाले होते.