लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून उद्या (१३ मे) मतदानाचा चौथा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक स्टार प्रचारक त्यांच्या उमेदवारासाठी गावागावात जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचारात एकमेकांना पाडण्याची भाषा केली जात आहे. अजित पवारही प्रत्येक विरोधी उमेदवाराला पाडू असं म्हणत आहेत. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड ठाण्यात बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही मेलो तरी, रक्ताचे पाट वाहिले तरीही या देशाचे संविधान बदलू देणार नाही, या देशाची लोकशाही बदलू देणार नाही. ठाण्यात ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दारी आहे. माझी निष्ठा तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल. मी एकटाच तलवार घेऊन लढत असतो. मजा येते लढायला. आणि समोर दिग्गज अजिदादांसारखा असले तर अजून लढायला आवडतं.”

“ते आता ढोस देत सुटलेत. तुला पाडेन, तुला पाडेन. मग तुझ्या पोराला का निवडून आणला नाही. लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता?” असा सवालही त्यांनी विचारला.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंना संपवून काश्मीर शांत होणार आहे का?”, ठाकरेंचा मोदींना थेट सवाल; म्हणाले “महाराष्ट्राच्या वाऱ्या…”

“ज्या बापाने मला घडवलं, त्या बापाला सोडताना माझ्या हृदयात जराही कालवाकालव नाही झाली? अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखत होतं? त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि लोकसभेत पाठवलं. आणि सातत्याने सत्तेच्या वर्तुळात ठेवलं. त्यांनी संघटनेचं पद घेतलं नाही. तुम्हाला फक्त सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही पवारांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली”, अशीही टीका त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राने दोन गद्दार पाहिलेत

“दुसरीकडे ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, आपलेपणा दाखवला ती मातोश्री फोडण्याचंच काम केलं. हे दोन्ही गद्दाऱ्या या महाराष्ट्राला कधीही आवडणार नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहास दोन गद्दारी ओळखल्या जातात. खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ. यांच्या अवलादींना महाराष्ट्राने कधीही ओळख दिली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत खंडोजी खोपडे आणि सूर्याडी पिसाळ या गद्दार लोकांना कायमचं संपवू टाका”, असंही ते म्हणाले.