भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दृष्टीने तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही दोन मोठी राज्ये आव्हानात्मक आहेत. त्यातही तमिळनाडूत अण्णा द्रमुकशी आघाडीनंतर राज्यात सत्तारूढ द्रमुकला कडवी लढत देता येईल असे पक्षाचे गणित दिसते. पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळी विधानसभेला भाजपने तीन जागांवरून ७७ जागांवर मुसंडी मारली. आता पुढील वर्षी मे महिन्यात तेथे विधानसभा निवडणूक होईल. तृणमूल काँग्रेसला सत्तेतून पायउतार करणे भाजपला शक्य होईल असे चित्र आज तरी नाही. कारण गेल्या विधानसभा (२०२१) निवडणुकीनंतर झालेल्या सर्व ११ पोटनिवडणुका तृणमूल काँग्रेसने जिंकल्या.
ममतांचा जनाधार
काँग्रेसमधून फुटून ममता बॅनर्जी यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. नंतर १३ वर्षांनी म्हणजेच २०११ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांची ३४ वर्षांची राजवट संपुष्टात आणण्याचे श्रेय त्यांना जाते. सलग तीनदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सत्तेत आहे. आजही ममतांची लोकप्रियता कमी झालेली नाही हे नुकत्याच झालेल्या कालीगंज विधानसभा निवडणुकीतील पोटनिवडणुकीतून दिसून आले. सरकारवर आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे तसेच हिंसाचाराचे अनेक आरोप झाले. यातून काही नेत्यांना धक्का बसला असेल, पण बंगाली जनतेच्या ममतांबाबतची सहानुभूती कायम आहे. संघर्ष करत त्यांनी राजकारणात स्थान निर्माण केले. याखेरीज २७ टक्के मुस्लीम समुदाय ममतांच्या मागे ठामपणे उभा राहिला. अगदी यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असल्याचे चित्र असताना देखील तृणमूल काँग्रेसने जागांमध्ये वाढ केली. बंगाली अस्मितेच्या जोरावर भाजपला त्यांनी रोखून धरले. प्रामुख्याने बंगालच्या उत्तर भागात भाजपचा प्रभाव जाणवतो. कोलकाता शहर व परिसरात तृणमूल काँग्रेसचे विरोधक निष्प्रभ ठरलेत.
भाजपमध्ये गटबाजी?
डाव्या आघाडीची राज्यातील सत्ता जाऊन १४ वर्षे झाली. या कालावधीत या आघाडीचा प्रमुख घटक असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (आरएसपी) तसेच फॉरवर्ड ब्लॉक यांची ताकद क्षीण झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांना एकही जागा जिंकता आली नाही यावरून स्थिती ध्यानात येते. ममतांच्या विरोधातील मते भाजपच्या मागे आली. याखेरीज तृणमूल काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी भाजपची वाट धरली. यातून भाजपची संख्यात्मक वाढ झाली तरी नवे विरुद्ध जुने असा सुप्त संघर्ष सुरू झाला. माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना ममता बॅनर्जी यांनी दिघा येथील जगन्नाथ मंदिराच्या उद्घाटनाला निमंत्रित केले होते. त्यावरून आरोप झाले. गेल्या महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. त्यालाही घोष उपस्थित नव्हते. यावरून पक्षात सारे कारी आलबेल नाही हेच दिसते. पक्ष आम्ही उभा केला आहे, त्यामुळे अन्यत्र जाण्याचा मुद्दाच नाही असे स्पष्टीकरण दिलीप घोष यांनी दिले. सर्वात यशस्वी प्रदेशाध्यक्ष अशी घोष यांची ओळख आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते काहीसे बाजूला फेकले गेले. या साऱ्यातून भाजपकडे ममतांना टक्कर देईल असा राज्यव्यापी चेहरा नाही.
अभिषेक यांचे भाकीत…
तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढाई पुढील वर्षी होण्याची चिन्हे आहेत. भाजप या निवडणुकीत ५० जागांच्या पुढे जाणार नाही असे भाकीतच ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी वर्तवले. राज्यात विधानसभेच्या २९४ जागा आहेत. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या विधानाला बळ देण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात भाजपच्या जागा कमी होतील या अंदाजाचा दाखला दिला. रथयात्रेच्या वार्षिक उत्सवावरून भाजप-तृणमूल यांच्यात आरोपांच्या फैरी झडल्या. या उत्सवाच्या उद्घाटनाला ममता बॅनर्जी या दिघा येथे गेल्या होत्या. राज्यातील जनतेला प्रसाद पाठविण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. यातून हिंदू मतदार आकर्षित होतील अशी तृणमूल काँग्रेसची खेळी असल्याचा भाजपचा आरोप आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी स्वतंत्र रथयात्रेचे नियोजन केले असून, पुरी येथून थेट प्रसाद मागवला जाईल. या घडामोडी पाहता रथयात्रेचा मुद्दा राज्यातील प्रमुख ठरल्याचे दिसते.
प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न
भाजप नेत्यांना शह देण्यासाठी ममता बॅनर्जी या पद्धतशीर प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक म्हणून ममतांची एक प्रतिमा तयार झाली आहे. तृणमूल काँग्रेस जरी इंडिया आघाडीत असला तरी, राज्यात काँग्रेस तसेच डाव्या पक्षांशी त्यांना दोन हात करावे लागतात. डावे पक्ष त्यांच्याशी जुळवून घेण्याची शक्यता नाही. राज्यात माल्दा, मुर्शिदाबाद जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. मात्र डाव्यांची मैत्री सोडून काही जागा मिळाल्या तर काँग्रेस ममतांच्या पक्षाशी युती करेल का, हा मुद्दा आहे. राज्यात ममता समर्थक आणि विरोधक अशी सरळसोट मतविभागणी आहे. याखेरीज भाजप हिंदुत्वाच्या आधारे वातावरण निर्मिती करेल. यात दोन्ही बाजूने ध्रुवीकरण होणार असल्याने ममतांच्या पक्षालाही लाभ होईल. मतांच्या टक्केवारीचा विचार करता गेल्या वेळी विधानसभेला तृणमूल काँग्रेसला ४८ टक्के तर भाजपला ३८ टक्के मते मिळाली होती. तर २०२४ च्या लोकसभेला २९ जागांसह तृणमूल काँग्रेसला ४३ टक्के व भाजपला ४० टक्के मतांसह १२ जागा होत्या. भाजपला लोकसभेच्या सहा जागा गमवाव्या लागल्या. हे पाहता मतांच्या टक्केवारीचा विचार करता, ४० टक्क्यांच्या आत तृणमूल काँग्रेसला भाजपने रोखले तरच विधानसभेला सत्तांतर होऊ शकते.