यंदा मोसमी पावसाचे आगमन केरळमध्ये अंदाजित तारखेच्या तुलनेत आठ दिवस आझी, तर महराष्ट्रात १३ दिवस आधीच झाले. मोसमी पाऊस म्हणजे काय, तो केव्हा दाखल होतो , यासाठी शास्त्रज्ञ कोणत्या गोष्टींचा आधार घेतात, यंदा मोसमी पाऊस इतक्या लवकर राज्यात दाखल का झाला याचा आढावा.
मोसमी पाऊस दाखल झाला म्हणजे काय?
भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. मोसमी पाऊस सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर १४ वर्षामापन केंद्रे आहेत. त्यातील ६० टक्के म्हणजे ८ ते १० केंद्रांवर सलग दोन किंवा अधिक दिवस मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर ती मोसमी पावसाची चाहूल असते. मात्र तो मोसमी पाऊसच आहे हे निश्चित करण्यासाठी आणखी काही निकषांची पूर्तता गरजेची असते.
पावसाचे अंदाज कशाच्या आधारे?
हवामान अंदाज वर्तविण्यासाठी अलिकडे विविध मॉडेल तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये समुद्राची स्थिती, वाऱ्यांची दिशा या बाबींचा सतत अभ्यास केला जातो. त्यासाठी हवामान केंद्रासह उपग्रह, रडार यंत्रणा याचा आधार घेतला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, हे मॉडेलच्या आधारे सांगितले जाते आणि यावरून त्या-त्या कालावाधीतील पावसाचे अंदाज हवामान विभाग व्यक्त करतो. या अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून हे अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. याचबरोबर प्रशांत आणि हिंद महासागरात मोसमी पावसाच्या हंगामात असलेली स्थितीही भारताच्या मोसमी पावसावर मोठा परिणाम करू शकते.
मान्सून दाखल झाल्याचे कसे समजते?
मे महिन्याच्या मध्यात दक्षिण गोलार्धामधून मोसमी वारे उत्तर गोलार्धामध्ये प्रवेश करतात. म्हणजेच विषुववृत्त ओलांडतात. सुरुवातीला दक्षिण गोलार्धामध्ये त्यांची दिशा आग्नेयकडून वायव्यकडे अशी असते. मात्र, जेव्हा विषुववृत्त ओलांडतात तेव्हा पृथ्वीच्या परिवलनामुळे या वाऱ्यांची दिशा बदलून ती नैर्ऋत्येकडून होते आणि भारतीय उपखंडावर हे वारे नैर्ऋत्येकडून येण्यास सुरुवात होते. एखाद्या ठिकाणी मोसमी पाऊस दाखल झाला हे जाहीर करायचे असल्यास हवमान विभागाने काही निकष ठेवलेले असतात. या निकषांनुसार, यामध्ये वाऱ्यांची दिशा ही नैर्ऋत्येकडून, पश्चिमेकडून असायला हवी, वाऱ्यांची उंची किती आहे, समुद्रसापाटीपासून साधारण साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत वारे पोहोचले आहेत की नाही वगैरे. अनेक वेळा हे वारे त्या उंचीला पोहोचत नाहीत त्यामुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवाह रेंगाळला आहे असे समजले जाते. म्हणजेच वाऱ्यांची उंची, वाऱ्यांची दिशा ते ठरावीक वेगाने, साधारण ताशी ३० ते ३५ किलोमीटर आणि साधारण ६०० हेक्टोपास्कल दाबाने वाहतात. त्याचबरोबर ठरावीक उर्जा किंवा उष्णता असणे आवश्यक असते. अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या लंबलहरी उष्णता ऊर्जेचे प्रतिचौरस मीटर क्षेत्रफळातील मोजमाप लक्षात घेतले जाते. उपग्रहांच्या आदारे परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो.
यंदा मोसमी पाऊस राज्यात लवकर कसा?
बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाची शाखा सक्रिय झाल्यानंतर केरळमधील शाखाही सक्रिय होत असते आणि केरळमध्ये सर्वसाधारण १ जूनला मोसमी पाऊस दाखल होतो. यंदा २४ मे रोजी संपूर्ण केरळ मोसमी पावसाने व्यापला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तळकोकणात मोसमी पाऊस दाखल आणि लगेचच नंतरच्या दिवशी मुंबई, पुणे आणि सोलापूर या भागात मोसमी पाऊस दाखल झाला. यंदा इतक्या लवकर मोसमी पाऊस दाखल होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मोसमी वाऱ्यांचा प्रवाह लवकर सक्रिय झाला असून त्याची तीव्रता अधिक आहे. तीव्रता अधिक असल्यामुळे तीव्र वाऱ्यांच्या वेगामुळे होणारा पाऊस सर्वदूर असल्याचे दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. केरळ, कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी मोसमी वारे दाखल झाले आहेत त्या ठिकाणी मोसमी पाऊस चांगल्या प्रकारे पडला.
वळवाच्या आणि मोसमी पावसात काय फरक?
मोसमी पाऊस यंदा लवकर दाखल झाल्यामुळे हा नक्की मोसमी पाऊस आहे की वळवाचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वळवाचा पाऊस म्हणजेच पूर्वमोसमी पाऊस. मोसमी पावसाची चाहूल हा पाऊस देतो. मात्र या दोन्ही पावसांत खूप फरक आहे. मोसमी पाऊस मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियेचा परिणाम असतो तर पूर्वमोसमी पावसाला स्थानिक, तात्कालिक परिस्थिती कारणीभूत असते. आर्द्रता आणि वाढती उष्णता हे वळवाच्या पावसाचे संकेत मानले जातात. सोसाट्याचा वादळी वारा, धुळीचे लोट, विजांचा कडकडाट यांसह वळीव हजेरी लावतो. साधारणपणे दुपारनंतर, रात्री वळवाचा पाऊस हजेरी लोवतो. मोसमी पावसात संततधार असते. मात्र वारे तुलनेने संथ, स्थिर होतात. दिवसभरात कोणत्याही वेळी, एकाच वेळी मोठ्या क्षेत्रावर पडतो. दोन्ही पावसाच्या ढगांमध्येही फरक असतो. वळवाचा पाऊस देणाऱ्या ढगांचा आकार सतत बदलतो. मोसमी पावसाचे ढग दाट असतात आणि त्याचे एकसारखे थर असतात.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता?
भारतीय हवामान विभागाकडून मोसमी पावसाच्या सुधारित अंदाजानुसार, यंदा हंगामात (जून ते सप्टेंबर) देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीवर असून, सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ‘ला-निना’ नाही आणि ‘एल-निनो’ही नाही अशी स्थिती आहे. पावसाळी हंगामात ही तटस्थ स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल-आयओडी) सध्या तटस्थ स्थितीत आहे. हंगामातील दुसऱ्या टप्प्यात आयओडी ‘ऋण’ होण्याची शक्यता असली तरी त्याचा प्रभाव राहणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.