-भक्ती बिसुरे

तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग हा गेल्या काही वर्षांत परवलीचा शब्द झाला आहे. वेळीअवेळी पडणारा पाऊस, गारपीट, पिकांची गुणवत्ता, बदलते वेळापत्रक अशा अनेक गोष्टींचा संबंध तापमान वाढीशी असल्याचे गेल्या काही वर्षांत सातत्याने बोलले जात आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारे संशोधनही जगभर होत आहे. मात्र, माणसाच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित एका बाबीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसत असल्याचे आता दिसत आहे. ही बाब म्हणजे झोप. तापमान वाढीमुळे माणसांची झोप कमी होत असल्याचा निष्कर्ष संशोधनाअंती काढण्यात आला आहे. ‘वन अर्थ’ या नियतकालिकाने याबाबतचा शोधनिबंध प्रकाशित केला आहे. (Climate Change Causing People To Sleep Less Claims Study)

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

शोधनिबंध काय सांगतो? 

‘वन अर्थ’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधातील निष्कर्षांवरून तापमान वाढीमुळे झोपेवर होणारा परिणाम ही जागतिक स्तरावरील समस्या आहे, हे दिसून येते. मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्या झोपेचे चक्र या तापमान वाढीमुळे विस्कळीत झाले आहे. अल्प उत्पन्न देशांमध्ये प्रामुख्याने पंखे, वातानुकूलित यंत्रणा अशा सोयींचा अभाव तसेच घरांवरील पत्रे यांसारखी कारणे झोप कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. तापमानातील वाढीच्या प्रमाणाबरोबरच उष्ण हवामानाच्या भागात राहणाऱ्यांची झोप दिवसेंदिवस कमी कमी होत असल्याचे ‘वन अर्थ’ने आपल्या शोधनिबंधात म्हटले आहे. तापमान वाढ हा जगातील नागरिकांच्या निद्रानाशाला कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडेच मोठ्या प्रमाणात वापरात आलेल्या स्मार्टवॉच प्रकारातील गॅजेट्सवर जगभरामधून नोंदवण्यात आलेल्या माहितीवरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तापमान वाढ केवळ दिवसा नव्हे तर रात्रीही दिसून येत आहे. त्याचाच परिणाम माणसाच्या झोपेवर होत आहे.

झोप किती घटली? 

जगभरातील स्मार्टवॉच वापरकर्त्यांकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीचे विश्लेषण केले असता रात्रीच्या वेळी वाढणारे तापमान हे झोप उडवण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहे. जगातील बहुतांश लोकसंख्येची झोप घटण्याचे कारण तापमान वाढ हे आहे. तब्बल ११ रात्रींची झोप दरवर्षी कमी होत चालल्याचे या माहितीतून समोर येत आहे. दररोज किमान सात तास झोप हे आदर्श प्रमाण मानले असता सद्यःस्थितीत दरवर्षी सुमारे ७० तास झोप कमी होत आहे. तापमान वाढीला प्रामुख्याने कारणीभूत असलेल्या जीवाश्म इंधनाच्या वापरावर नियंत्रण न आणल्यास भविष्यात हे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून २०९९पर्यंत दरडोई दरवर्षी ५८ तासांची झोप कमी होण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. रात्रीचे तापमान हे २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असताना बहुतांश नागरिक सात तास झोप पूर्ण करू शकत नाहीत. तशातच बहुतांश प्रदेशात आता रात्रीचे तापमान हे नियमितपणे ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जात असताना रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये किमान १५ मिनिटांची झोप कमी झाल्याचे दिसून आले आहे.

निद्रानाशाचे गांभीर्य? 

माणसाच्या चांगल्या आरोग्यासाठी किमान सात तास शांत झोप अत्यावश्यक आहे. झोप एखाद्या तासाने कमी होणे हेदेखील त्या व्यक्तीसाठी शारीरिक, मानसिक त्रासांना निमंत्रण देणारे ठरते. तापमान वाढीच्या परिणामामुळे झोपेच्या प्रमाणात मोठी घट ही चिंतेचे कारण असल्याचे शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. झोपेचे गणित एकदा विस्कळीत झाल्यानंतर ते पुन्हा पूर्वपदावर आणणे अवघड आहे. शरीराचे तापमान स्थिर राखण्यासाठी आपले शरीर महत्त्वाची भूमिका निभावत असते. शरीराचे तापमान स्थिर राहणे हे आपल्या निकोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज रात्री आपण झोपल्यानंतर आपले शरीर आपल्या नकळत रक्तवाहिन्या पसरवून आपल्या हात आणि पायांना होणारा रक्तपुरवठा वाढवतात आणि शरीरातील उष्णता बाहेर टाकतात. मात्र, सभोवतालचे वातावरण अधिक उष्ण असल्यास आपले शरीर आतील उष्णता कमी करू शकत नाही. त्याचा स्वाभाविक परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी, विविध शारीरिक आणि मानसिक आजारांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. 

निद्रानाश आणि आरोग्य? 

शांत झोप आणि चांगल्या आरोग्याचा निकटचा संबंध आहे. झोपेच्या आठ तासांच्या कालावधीत मानवी शरीर त्याची झालेली झीज भरून काढण्याचे काम करते. मात्र, गेल्या काही वर्षांत जीवनशैलीतील बदल हे झोपेचे गणित बिघडवण्याचे एक कारण ठरत आहे. यामध्ये प्रामुख्याने कामाच्या बदललेल्या वेळा, ताणतणाव, स्पर्धा, मनोरंजनाची साधने इत्यादींमुळे झोपण्यास होणारा उशीर ही प्रमुख कारणे आहेत. अपूर्ण झोप किंवा अशांत झोप, सतत जाग येणे, सलग झोप न लागणे यांमुळे शरीराच्या अनेक दुखण्यांना निमंत्रण मिळते. मधुमेह, उच्चरक्तदाब, वजन वाढणे यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांचे मूळ अपूऱ्या झोपेमध्ये आहे. सतत चिडचिड, थकवा, मरगळ, उत्साह न वाटणे, दिवसभर झोप येणे किंवा कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित न करता येणे अशा गोष्टीही झोप चांगली नसल्यास होतात. त्यातून मनोविकारांची सुरुवात होण्याची शक्यताही असते.