Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 “९ एप्रिल १९३० काळाराम मंदिर सत्याग्रहादरम्यान सवर्ण व सत्याग्रही अस्पृश्यांत समझोता झाला की, रामनवमीला (९-४-३०) रामाचा रथ स्पृश्य- अस्पृश्यांनी एकत्रितपणे ओढायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह त्यावेळेस हजर होते. पण अस्पृश्यांनी रथाला हात लागण्यापूर्वीच पूर्व नियोजित कटानुसार स्पृश्य हिंदूंनी तो रथ दुसरीकडून पळविला. डॉ. आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक सुरु झाली. खुद्द डॉ. आंबेडकर, भा. र. कद्रेकर, पां. ना. राजभोज अनेक सत्याग्रही जखमी झाले.”- धनंजय कीर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पृष्ठ क्रमांक: ५९९-६००, १९६६)

अधिक वाचा: रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेमका संबंध काय?

Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election
डॉ. आंबेडकरांचा पराभव काँग्रेसने केलेला नाही…
Dr. Babasaheb Ambedkar, London School of Economics
रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेमका संबंध काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक हालअपेष्टा सोसून दलित समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले. हे एका वाक्यातील वर्णन त्या थोर प्रभृतीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्रोटक आहे. आई आपल्या पोटच्या गोळ्याची ज्या प्रकारे काळजी घेते, प्रसंगी त्या बाळावर होणारे घावही झेलते, त्याच प्रमाणे बाबासाहेबांनी भारतीय अस्पृश्य समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला आणि वेळप्रसंगी दगडाचे घावही झेलले. बाबासाहेबांच्या याच कार्याची प्रचिती घेण्यासाठी १९३० साली त्या दिवशी नेमके काय घडले हे समजून घ्यावे लागते.

१९३० भारतीय इतिहासाला कलाटणी देणारे वर्ष!

भारतीय इतिहासात १९३० हे साल अनेकार्थाने गाजले. याच वर्षी महात्मा गांधींनी दांडी यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्य युद्धातील सत्याग्रहाच्या पर्वाला सुरुवात केली होती. आणि याच वर्षी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ मार्च १९३० या दिवशी दलित हिंदूंच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नाशिक येथे मंदिर प्रवेशाचा लढा सुरु केला. या सत्याग्रहासाठी नाशिकची निवड करण्यात आली. नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशकरून हा सत्याग्रह सिद्धीस जाणार होणार होता. सत्याग्रहाचा दिवस ठरला, परंतु त्यापूर्वी सत्याग्रहींनी काळाराम मंदिराच्या व्यवस्थापकांना विशिष्ट अवधीपर्यंत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या हिंदूंना राम मंदिर खुले न झाल्यास मंदिर प्रवेशार्थ आपण सत्याग्रह करणार आहोत, अशी रीतसर लेखी सूचना दिली. बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी म्हटल्याप्रमाणे या सत्याग्रहासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकातून सुमारे १५ हजार सत्याग्रही नाशिकमध्ये जमा झाले. सत्याग्रहाचे प्रवर्तक, प्रसारकर्ते आणि कार्यकर्ते जवकजवळ सर्वच दलित समाजाचे होते.

सत्याग्रहाची पूर्वतयारी..

रविवार, २ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठी परिषद भरवली गेली. या परिषदेत राम मंदिराच्या दिशेने मिरवणूक काढण्याचे निश्चित झाले. ठरल्याप्रमाणे तीन वाजता सुमारे १५ हजार सत्याग्रहींची मिरवणूक राम मंदिराकडे शिस्तीत आणि शांततेत निघाली. नाशिकच्या इतिहासातील एक अभूतपूर्व मिरवणूक म्हणून या मिरवणुकीचे वर्णन धनंजय कीर यांनी केले आहे. या मिरवणुकीची आघाडी गोदावरी पुलावर, तर पिछाडी देवळाच्या नाक्यावर होती. अग्रभागी लष्करी धर्तीचा बँड, बासरी, सनई, तुतारी यांचा घोष होत होता. वादकांच्या तुकडीमागून बालवीर पथक चालले होते. त्यांच्यामागून स्त्रियांचा समूह गाणे गात चालला होता. तर त्यांच्यामागून बैरागी आणि वारकरी श्री राम जय राम जयजय राम असे एक स्वरात नामस्मरण करत चालले होते. मिरवणूक राम मंदिराजवळ येताच जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुख, जिल्हा न्यायाधीश हे मंदिराच्या दरवाजाजवळ गेले. मंदिराचे सर्व दरवाजे बंद असल्याने मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली. तिथे या मिरवणुकीचे रूपांतर भव्य सभेत झाले. एकूणच या दिवशी मिरवणुकीतील मंडळींना मंदिरात प्रवेश मिळाला नाही.

सत्याग्रहाचा निर्णय

मंदिरात प्रवेश न मिळाल्यामुळे २ मार्च रोजी रात्री अकरा वाजता कार्यकर्ते आणि पुढारी यांच्या बैठकीत सत्याग्रह करण्याचा निश्चय झाला. या ऐतिहासिक सत्याग्रहाला दिनांक ३ मार्च रोजी सकाळी सुरुवात झाली. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया होत्या. ते मंदिराच्या चार दरवाज्यांजवळ बैठक मारून बसले. तर शिबिरात इतर ८००० सत्याग्रही पुढल्या आदेशाची वाट पाहत बसले होते. ब्रिटिश जिल्हाधिकारी गॉर्डन आणि दोन दंडाधिकारी हे वातावरण शांत राहावे म्हणून काळजी घेत होते. बंदूकधारी शिपाई मंदिराभोवती कडेकोट पहारा देत होते. देवळाच्या भिंतीपासून तीनशे यार्डच्या आत दगड, लाठीकाठी, हत्यार वगैरे काही आणता कामा नये असा हुकूम सरकारने काढला होता. पोलीस अधिक्षक रेनॉल्डस यांनी देवळाजवळ आपला तंबू ठोकला होता. पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे स्पृश्यांनाही रामाचे दर्शन दुर्लभ झाले होते. प्रभू राम रायाला कडीकुलुपात बंद केले होते. त्यानंतर शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सभा भरवण्यात आली होती.

मध्यम मार्ग.. परंतु,…

९ एप्रिलपर्यंत सत्याग्रह सुरूच होता. रामनवमीच्या दिवशी श्रीरामचंद्रांचा रथ बाहेर पडणार होता (१९३० साली रामनवमी ७ एप्रिल रोजी होती). स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही बाजूच्या दणकट लोकांनी श्रीरामाचा रथ ओढावा असे ठरवण्यात आले होते. हा अभूतपूर्व संगम पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला. आपल्याकडचे दणकट तालीमबाज निवडक लोक घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंदिराजवळ येऊन उभे ठाकले. परंतु रथाला स्पर्श करण्यापूर्वीच स्पृश्य हिंदूंनी रथ दुसरीकडून बाहेर काढला. हा रस्ता रुंद आणि काटेरी कुंपणे असलेला होता. अस्पृश्य कार्यकर्ते रथामागे धावू लागले. त्याच बरोबर त्यांच्यावर दगड धोंड्यांचा वर्षाव होऊ लागला. तर बाबासाहेबांचे सहकारी त्यांच्या डोक्यावर छत्री धरून त्यांचे दगडांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होते. भास्करराव कद्रेकर या भंडारी तरुणाने पोलिसांचे कडे तोडून रथाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो थोड्या वेळाने रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनाही अनेक बारीक सारीक जखमा झाल्या होत्या. या सर्वांची परिणती स्पृश्य-अस्पृश्य यांच्या हाणामारीत झाली.

अधिक वाचा: Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?

यानंतर पुढे काय?

मंदिर प्रवेश सत्याग्रहामुळे नाशिक जिल्ह्यात अस्पृश्य हिंदूंना भयंकर छळ सोसावा लागला होता. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या, रस्ते बंद झाले, रोजच्या व्यवहारातील जिन्नस मिळेनासे झाले. अनेक त्रास सहन करूनही बाबासाहेबांच्या अनुयायांनी सत्याग्रह चालूच ठेवला. संतापाच्या भरात काही अनुयायी इस्लाम धर्म स्वीकारण्याविषयी बोलू लागले. त्यावर बाबासाहेबांनी तसं न करण्याचा सल्ला दिला. यानंतर नाशिकच्या अस्पृश्य नेत्यांनी काही काळ हा सत्याग्रह मागे घेतला होता, परंतु हा लढा परत सुरु झाला, जो थेट १९३५ च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालला. या सत्याग्रहाच्या अनुभवानंतर बाबासाहेबांनी इतर कोणत्याही मंदिर प्रवेश आंदोलनात भाग घेतला नाही. मंदिरात प्रवेश करून जातींचे प्रश्न सुटणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले होते.