लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर दिले. संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. फोडा आणि राज्य करा, असे काँग्रेसचे धोरण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस पक्ष टुकडे टुकडे गँगची लीडर झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्यामुळे टुकडे टुकडे गँगचा उल्लेख पुन्हा झाल्याने हे कोठून आले हे जाऊन घेऊया.
टुकडे टुकडे गँगची लीडर काँग्रेस</strong>
“काँग्रेसचे धोरण ‘फोडा आणि राज्य करा’ आहे. आज काँग्रेस टुकडे टुकडे गँगची लीडर बनली आहे. काँग्रेसने गरीबी हटाओ’ या घोषणेमुळे अनेक निवडणुका जिंकल्या, पण त्यात अपयश आले. त्यानंतर देशातील गरिबांनी त्यांना मतदान केले,” असे पंतप्रधान मोदींनी लोकसभेत म्हटले.
टुकडे टुकडे गँग कुठून आली?
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाशी संबंधित ‘देशविरोधी’ घोषणाबाजी प्रकरणादरम्यान २०१६ साली टुकडे टुकडे गँग हे वाक्य चर्चेत आला होता. जेएनयूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांवर करण्यात आले, ज्यांना नंतर टुकडे टुकडे गँग म्हटले गेले. त्यांना नंतर भाजपा आणि त्यांच्या संघटनांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. काँग्रेसवरही ‘देशविरोधी’ घोषणा देणाऱ्यांच्या बाजूने असण्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, पक्षाने ते साफ फेटाळून लावत भाजपा राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. सध्या जेएनयूमधील ‘देशविरोधी’ घोषणाबाजीचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
टुकडे टुकडे गँगची माहिती नाही – केंद्रीय गृहमंत्रालय
भाजपाने अनेकवेळा आपल्या विरोधकांना टुकडे टुकडे गँगचे सदस्य म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला होता. पण एका आरटीआयला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे देशातील अशा कोणत्याही गॅंगची माहिती नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभांमध्ये या शब्दाचा वापर करून विरोधकांची खरडपट्टी काढली होती. त्यावरून जोरदार वादही झाला होता.
भाजपाच्या नेत्यांकडून अनेकदा भाषणामध्ये टुकडे टुकडे गँगचा देशात विभाजन घडवण्याचा डाव आहे अशी टीका केली होती. जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये २०१६ साली झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर भाजपाच्या नेत्यांकडून ‘टुकडे टुकडे गँग’ हा उल्लेख वरचे वर होऊ लागला. याचसंदर्भात गोखले यांनी महिती अधिकार हक्काअंतर्गत अर्ज करुन ‘टुकडे टुकडे गँग’बद्दल सरकारकडे असणारी माहिती उघड करावी अशी मागणी केली होती. याच अर्जाला आलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत गोखले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशणा साधला होता.
दरम्यान, याआधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “मी जेव्हा जेएनयूमध्ये होतो तेव्हा तिथे तुकडे तुकडे गँग नव्हती,” असं मत व्यक्त केलं होतं. जेएनयूमध्ये मुखवटे घातलेल्या काही गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली येथील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये जयशंकर यांनी हे मत व्यक्त केलं होतं. दिल्लीमधील एका प्रचारसभेमध्ये अमित शाह यांनी “सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशभरात होणाऱ्या आंदोलनासाठी काँग्रेस आणि ‘टुकडे टुकडे गँग’ कारणीभूत आहे,” असं मत व्यक्त केलं होतं.