राज्यसभेनंतर आता विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र भाजपाकडे पाचव्या जागेसाठी पुरेशी मते नसतानाही त्यांना एकूण १३४ मते मिळाली आहेत. तर या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या दहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. पण चंद्रकांत हंडोरे यांचा पसंती क्रमांक पहिला असतानाही ते पराभूत झाले आणि भाई जगताप यांचा विजय झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा रणनीती आणख विधान परिषदेची निवडणूक जिंकली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे पाचही उमेदवार निवडून आले आहे. तर शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची मते फुटली आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला १२३ मतं मिळाली होती तर विधान परिषद निवडणुकीत भाजपला १३४ मते मिळाली. याआधी भाजपाने राज्यसभेत तीन जागा बिनविरोध निवडून द्या, विधान परिषदेत महाविकास आघाडीला सहा जागा देऊ, असा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला होता. मात्र महाविकास आघाडीने तो फेटाळला आणि एका उमेदवाराचा पराभव झाला आहे.

“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रचंड नाराजी, असंतोष उघड झाला असून त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. भाजपाच्या उमेदवारांना राज्यसभा निवडणुकीत १२३ मते मिळाली होती. तर विधानपरिषद निवडणुकीत १३४ मते भाजपाच्या उमेदवारांना मिळाली आहेत. भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपाकडे एकही मत नसताना काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा अधिक मते लाड यांना मिळाली. महाविकास आघाडी सरकारवर आमदारांचा विश्वास राहिलेला नाही. महाविकास आघाडीबरोबर असलेल्या काही आमदारांनी सद्सद्वविवेक बुध्दीला स्मरून आमच्या उमेदवारांना मते दिली व ते निवडून आले, ही आनंदाची बाब आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोणाची मते फुटली?

शिवसेना

विधान परिषद निवडणुकीत सचिन अहिर व आमश्या पडवी हे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. मात्र पक्षाचे ५५ आमदार असताना या दोघांना पहिल्या पसंतीची ५२ मते मिळाल्याने शिवसेनेची तीन मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय सेनेच्या  सहयोगी आमदारांच्या मतांचे काय असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

पहिल्या पसंतीची २६ मते मिळाल्याने सचिन अहिर व आमश्या पडवी हे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून आले आहेत. शिवसेनेचे ५६ आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेकडे विधान परिषद निवडणुकीसाठी ५५ आमदारांची मते होती. याशिवाय राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांचा पक्षाचा एक आमदार, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर असे थेट शिवसेनेच्या कोटयातील आणखी चार आमदार होते. असा शिवसेनेला थेट ५९ आमदारांचा पाठिंबा होता.

सचिन अहिर व आमश्या पडवी यांना फक्त शिवसेनेची मते मिळाली असती तर पहिल्या पसंतीची ५५ मते मिळणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात या दोघांना मिळून ५२ मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेची तीन मते फुटली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसाला अतिरिक्त ६ मते

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला एकूण ६ मतं जास्तीची मिळाली. ही मते महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची की भाजपाची आहेत अशी चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी ही मते भाजपाकडून मिळाली आहेत असे म्हटले आहे.

काँग्रेस दोन मते फुटली

काँग्रेसकडे ४४ आमदारांचं संख्याबळ आहे त्यात भाई जगताप यांना २० तर चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं मिळाली. काँग्रेसला एकूण ४२ मतं मिळाली त्यामुळे काँग्रेसमधली दोन मतं फुटली.

भाजपाची ११ मते वाढली

भाजपचे १०६ आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपाला ११ मते अधिक मिळाली आहेत. शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपाला यश आले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले.