शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांच्यामधील आरोप प्रत्यारोप गेले काही महिने अवघा महाराष्ट्र बघत आहे. विविध राजकीय आरोप दोन्ही नेते एकमेकांवर करत असतांना आता यामध्ये नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेचा मुद्दाही समोर आला आहे. १९७१ च्या युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेवर युद्धस्मारक बनवण्याच्या नावाखाली जमा केलेल्या ५८ कोटींच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे काही वर्षांपूर्वी भंगारात काढलेली ‘आयएनएस विक्रांत’ ( INS Vikrant ) ही विमानवाहू युद्धनौका अचानक चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

आयएनएस विक्रांत काय होती ?

Adolf Hitler
Adolf Hitler: नरेंद्र मोदी सरकारने मान्य केलेल्या ‘आर्यां’चे हिटलरलाही आकर्षण होते, नेमकं कारण काय?
bjp manifesto sankalp patra
भाजपची विकास, विरासत, ‘विस्तारा’ची संकल्पपत्रात ‘गॅरंटी’
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Hamas Israel conflict
१३००० बालकांसह ३४५०० नागरिक मृत्यू,लाखो बेघर, संपूर्ण प्रदेश बेचिराख; गाझा युद्धाचे रक्तलांच्छित सहा महिने!

आयएनएस विक्रांतचे मूळ नाव एचएमएस हर्क्युलस ( HMS Hercules ). दुसरे महायुद्ध ऐन भरात असतांना ऑक्टोबर १९४३ ला ब्रिटीशांनी या युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात केली. १९४५ ला महायुद्ध संपल्याने सुमारे १९,५०० टन वजनाच्या या विमानवाहू युद्धनौकेचे बांधकाम अपूर्ण राहीले. १९५७ ला ही एचएमएस हर्क्युलस विमानवाहू युद्धनौका भारताने विकत घेतली आणि डागडुजी नंतर १९६१ मध्ये नौदलात दाखल झाली.

तेव्हा एचएमएस हर्क्युलसचे आयएनएस विक्रांत असे नामकरण करण्यात आले, विक्रांत ही युद्धनौका नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका ( aircraft carrier ) ठरली. सी हॉकसारखी लढाऊ विमाने, Breguet Alize सारखी पाणबुडीविरोधी विमाने, हेलिकॉप्टर अशी एकुण २०-२२ विमाने आणि हेलिकॉप्टर या विमानवाहू युद्धनौकेवर राहू शकत होती. त्या काळातील म्हणजे १९८७ पर्यंत आयएनएस विराट ही दुसरी विमानवाहू युद्धनौका दाखल होईपर्यंत विक्रांत ही नौदलातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची युद्धनौका ठरली होती.

१९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धात नौदलाचा वापर करण्याची वेळ आली नाही. तर १९६५ च्या युद्धात आयएनएस विक्रांतने समुद्रावर वर्चस्व ठेवत पाकिस्तान नौदलावर जरब ठेवली. असं असलं तरी प्रत्यक्ष युद्द करण्याचा प्रसंग विक्रांतवर काही आला नाही.

मात्र विक्रांतची खरी परीक्षा १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धाने घेतली. विक्रांतमुळे बंगलाच्या उपसागारात नौदलाला निर्विवाद वर्चस्व ठेवता आले. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानची समुद्राच्या बाजूने नाकेबंदी करण्यात विक्रांतने महत्त्वाची भुमिका बजावली. १९७१ च्या बांगला देश मुक्तीमध्ये – पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत लष्कर, वायू दलाबरोबर नौदलाचा आणि त्यामध्ये आयएनएस विक्रांतने सिंहाचा वाटा उचलला.

विक्रांत निवृत्त झाल्यावर…

सततचे नुतनीकरण करुन युद्धनौका नंतर वापरणे केवळ अशक्य झाल्याने जानेवारी १९९७ ला आयएनएस विक्रांतला मुंबईच्या नौदल तळावर निरोप देण्यात आला आणि नौदलातून सन्मानाने निवृत्त करण्यात आले. निवृत्तीनंतर विक्रांतचे आयएमएस म्हणजेच इंडियन म्युझियम शिप विक्रांत असे नामकरण करण्यात आले. तत्कालीन युती सरकराने या युद्धनौकेचे मोठे युद्ध संग्रहालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तात्पुरती का होईना विक्रांतला नौदलाच्या तळामध्ये उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. युद्धनौका निवृत्त झाल्याने संग्रहालयाची, त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी नौदलाबरोबर राज्य सरकारने उचलली खरी. मात्र दुरुस्तीसाठी किंवा युद्धनौका तरंगण्यासाठी आवश्यक डागडुजीसाठी पैसे देण्याव्यतिरिक्त राज्य सरकारने काहीही केले नाही. १९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने या युद्धनौकेचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही, ना केंद्र सरकारने उत्सुकता दाखवली. युद्धनौकेच्या कायमस्वरुपी स्मारकासाठी मुंबईजवळ, कोकण किनारपट्टीवर विविध जागेचा शोधही सुरु केला. मात्र ना जागा नक्की करण्यात आली ना संभाव्य जागेसाठी कंत्राटदार नक्की करण्यात आला. विक्रांतच्या युद्ध संग्रहालयचा आराखडा हा कागदावरच राहीला आहे.

‘विक्रांत’ नौदलाचे ठरले अंगावरचे दुखणे

विक्रांतची लांबी होती सुमारे २१३ मीटर आणि रुंदी ३९ मीटर. विक्रांतवर युद्धसामग्री नसल्याने वजन १५ हजार टनच्या खालीच आले होते. असं असलं तरी एवढी मोठी युद्धनौका पश्चिम नौदलाचे मुख्यालय असलेल्या नौदल तळावर मोक्याची जागा व्यापून राहीली. आधीच मुंबईतील नौदलाच्या तळावर अनेक मर्यादा आहेत, विस्ताराला इंचभर देखील वाव नव्हता आणि आजही नाहीये. तिथेच तटरक्षक दलाच्या युद्धनौकांनाही काही जागा द्यावी लागते. नौदल तळाजवळून मासेमारी, खाजगी, प्रवासी, मालवाहु जहाजे यांची वाहतुक सुरु असते, यामुळेच नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सावधगीरी नौदलाला बाळगावी लागते . असं असतांना ज्या युद्धनौकेचा सामरिकदृष्ट्या काहीही उपयोग नाही ती युद्धनौका तळावरची जागा अडवत होती. त्यामुळे जसे युद्ध संग्रहालयाची आशा पुसट व्हायला लागली तशी नौदलाची उत्सुकताही विक्रांतबाबतची संपली. कारण एवढे मोठे संग्रहालय करणे हे काही एकट्या नौदलाची जबाबदारी नाही. त्यामुळे कधी एकदा विक्रांतला बाहेर काढले जाते याकडे नौदलाचेही लक्ष लागले होते.

अखेर भंगारात काढण्याचा निर्णय झाला

१९९७ नंतर नौदल दिनाच्या निमित्ताने विक्रांतला बघणे ही सर्वसामान्यांसाठी एक पर्वणी ठरली होती. १९९७ पासून मुंबईत नौदलाच्या तळावर उभी असलेल्या विक्रांतचा तळ हा मोठ्या प्रमाणात दुरुस्ती पलीकडे गेल्याने अखेर ऑगस्ट २०१३ मध्ये विक्रांतला नौदल तळावर उभे करणे धोकादायक असल्याचं नौदलाने जाहीर केलं. त्यानंतर डिसेंबर २०१३ ला नौदल सप्ताहाच्या निमित्ताने युद्धस्मारकासाठी कोणीही पुढे न आल्याने विक्रांतला भंगारात काढणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केले.

१९९७ पासून विक्रांतचे युद्धसंग्रहालय करण्याची मागणी केली जात होती खरी पण भंगारात काढणार असल्याची घोषणा झाल्यावर अचानक काही राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था यांनी विक्रांतच्या युद्ध संग्रहालयाचा मुद्दा उचलून धरला. विक्रांत वाचवण्यासाठी निधी गोळा करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे, सह्यांची मोहिम राबवणे अशी पावले काहींनी उचलली. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि जानेवारी २०१४ ला मुंबईत जहाज तोडणीचे काम चालणाऱ्या दारुखाना इथे विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका सुमारे ६० कोटी रुपयात भंगार म्हणून विकण्यात आली. अर्थात याआधी युद्धनौकेवरील आवश्यक वस्तू या सुरक्षित ठेवण्यात आल्या. नोव्हेंबर २०१४ मध्ये देशाची पहिली विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्याचे काम हे प्रत्यक्षात सुरुही झाले.

नौदलात दाखल झाल्यापासून निवृत्त होईपर्यंत आणि त्यानंतर भंगारात काढली जाईपर्यंत विक्रांत ही सतत चर्चेत राहीली. आता भंगारात काढल्यानंतर आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा विक्रांत ही चर्चेचा विषय ठरली आहे.