हृषिकेश देशपांडे

यात्रांच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क तसेच संवाद साधणे राजकीय नेत्यांना शक्य होते. यातून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य येते. सत्ताबदल किंवा राखणे या दृष्टीने या यात्रांना महत्त्व आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. तर कर्नाटकमध्ये भाजपची जनसंकल्प यात्रा रायचूर येथून २५ डिसेंबरला सुरू झाली होती. या यात्रेत मंड्या जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच हजेरी लावली. राजस्थानमध्ये विरोधी बाकावर असलेल्या भाजपची जन आक्रोश यात्रा सुरू आहे. तेथे या वर्षी निवडणूक आहे. ईशान्येकडील त्रिपुरात भाजप सत्ता असलेल्या राज्यातही जनविश्वास यात्रेची घोषणा पक्षाने केली आहे. ५ जानेवारीपासून ही यात्रा अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरू होत आहे. तर आंध्र प्रदेशात तेलुगु देसमचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश यांनी २७ जानेवारीपासून चार हजार किमी पदयात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा चारशे दिवस चालणार आहे. एकूणच राजकीय यात्रा, पदयात्रांचा हंगाम देशभर सुरू असून, राजकीय नेते जनतेपुढे आपली भूमिका यातून मांडत आहेत.

कर्नाटकवर लक्ष केंद्रित…

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. कर्नाटकचेच मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे काँग्रेसची धुरा आली. कर्नाटकमध्ये भाजप सरकारला पुन्हा सत्तेत येणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे जनसंकल्प यात्रा असो तसेच आरक्षणासाठी इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी नवी श्रेणी निर्माण करण्याची घोषणा असो, पुन्हा सत्तेत येण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटकमध्ये येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. अमित शहा यांच्या कर्नाटक दौऱ्याला यामुळे महत्त्व आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या म्हैसूर विभागात विधानसभेच्या ५५ जागा आहेत. भाजपला येथे फारसे यश मिळत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी या भागाचा दौरा करताना जनता दल तसेच काँग्रेसला लक्ष्य केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे हा भाग प्रभावक्षेत्र. हसन तसेच मंड्या या भागात देवेगौडा यांच्या जनता दलाची प्रामुख्याने ताकद आहे. वोक्कलिंग समुदायाचा येथे प्रभाव आहे. हा धर्मनिरपेक्ष जनता दलाचा प्रामुख्याने पाठीराखा मानला जातो. भाजपने आता येथे लक्ष केंद्रित केले आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने इतर मागासवर्गीयांसाठी नवी श्रेणी जाहीर करत वोक्कलिंग समुदायाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय आदिवासी तसेच मागासवर्गीय आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ केली. आदिवासींसाठीच्या राखीव जागांच्या प्रमाणात तीन टक्क्यांवरून सात तर मागासवर्गियांसाठी सध्याच्या १५ टक्क्यांवरून ते १७ टक्के करण्याचा निर्णय कर्नाटकमधील बसवराज बोम्मई सरकारने गेल्या आठवड्यात घेतला आहे.

चंद्राबाबू पुत्राची पदयात्रा…

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश हे कुप्पम ते ईच्चपुरम अशी चार हजार किमी पदयात्रा २७ जानेवारीपासून काढणार आहेत. ही यात्रा वर्षभराहून अधिक काळ (चारशे दिवस) चालेल. आंध्रमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आहे. निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी आहे. मात्र आंध्रमध्ये अशा यात्रा-पदयात्रांच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन झाल्याचा इतिहास आहे. यात जगनमोहन यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी २००३ काढलेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. पुढे यातून तेलगु देसमचे सरकार सत्तेतून गेले होते. जगनमोहन यांनीही २०१९ मध्ये ३६०० किमी पदयात्रा काढत दोन कोटी लोकांशी संवाद साधला होता. आता चंद्राबाबूंचे पुत्र नारा लोकेश हे युवा गलम या अंतर्गत पदयात्रा काढून युवकांशी प्रामुख्याने संवाद साधणार आहेत. कुप्पम येथून ही पदयात्रा सुरू होईल. यातून जगनमोहन यांच्या सत्तेला आव्हान दिले जाणार आहे.

त्रिपुरात सत्ता राखण्याचा भाजपचा प्रयत्न

त्रिपुरात २०१८ मध्ये भाजपने डाव्या पक्षांची दीर्घकाळाची राजवट संपवून सत्ता मिळवली. ईशान्येकडील या राज्यात सत्ता राखणे भाजपला आव्हानात्मक आहे. कारण सत्ता असताना आतापर्यंत आठ आमदारांनी पक्ष सोडला आहे. विप्लब देव यांना बदलून माणिक सहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा द्यावी लागली. हे पाहता पक्ष संघटनेत सारे आलबेल नाही हेच खरे. त्यामुळे हे राज्य राखण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न आहेत. त्रिपुरात ५ ते १२ जानेवारी या कालावधीत जनविश्वास यात्रेचे आयोजन भाजपने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या यात्रेची सुरुवात होणार आहे. एक हजार किमी अंतर कापून राज्यातील विधानसभेच्या ६० पैकी ५६ मतदारसंघातून प्रवास करून आगरतळा येथे त्याचा समारोप होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात्रांचे पेव कशासाठी?

यात्रा-पदयात्रा दक्षिणेपासून ते ईशान्येपर्यंत सुरू आहे. समाजमाध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधण्याचे नवे तंत्र राजकीय पक्ष आत्मसात करत आहेत. मात्र थेट संवादाला पर्याय नाही हे हेरून वेगवेगळी नावे देऊन अशा यात्रा सर्वच राजकीय पक्ष देशभर काढत आहेत.