Dr. Babasaheb Ambedkar and Manusmriti on Manual Scavenging in India: भारतात आजही हाताने मैला साफ केला जातो, हे एक भीषण आणि कठोर असे वास्तव आहे. या संदर्भातील एक अनुभव २०१४ साली प्रकाशित झालेल्या ‘राईट वॉच’च्या अहवालात देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कैलास नावाच्या व्यक्तीने स्वानुभव कथन केला आहे, “मी वाणिज्य आणि बँकिंगचे शिक्षण घेतले आहे. परंतु, मला काम मिळाले नाही. मी साक्षर असूनही पंचायतीने मला शौचालये साफ करण्यासाठी ठेवले, कारण मी ‘या’ विशिष्ट समुदायाचा आहे.”

कैलासचा जन्म वर्षानुवर्षे हाताने मैला साफ करण्याचेच काम करणाऱ्या जातीत झाला. त्याची पत्नी विमला सांगते,

“आम्ही शेतीची आणि मजुरीची काम करू शकतो. परंतु, मी ज्यावेळी शेतीची कामं करण्यासाठी जाते, त्यावेळी मला पंचायतीकडून धमक्या येतात… मला माझं घर गमावण्याची भीती वाटते.”

पंचायतीकडून येणाऱ्या धमक्यांमुळे काही जातींना पोटापाण्यासाठी कुप्रथांचे पालन करण्यासच भाग पाडले जाते. पोलिसांकडूनही तक्रारी नोंदवण्यास नकार दिला जातो.

कायदा काय सांगतो?

Employment of Manual Scavengers and Construction of Dry Latrines (Prohibition) Act, 1993 या कायद्याप्रमाणे, हाताने मैला उचलणाऱ्यांना रोजगार देणे आणि कोरडी शौचालये बांधणे हा दंडनीय गुन्हा आहे. Manual Scavengers and their Rehabilitation Act, 2013 हा कायदा या समुदायांनी भोगलेला ऐतिहासिक अन्याय आणि अपमानाची याची दखल घेतो. तसेच त्यांना पर्यायी उपजीविका आणि सर्वांगीण पाठबळ देण्याचे आश्वासन देतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एकुणातच कामानुसार होणारी वर्गवारी भयावह आहे. त्याच पार्श्वभूमीवर सफाई कामगारांचे भवितव्य कोण ठरवते आणि प्राचीन भारतीय साहित्य आपल्याला हाताने सफाई करण्याच्या प्रथेबद्दल काय सांगते? याचाच घेतलेला हा आढावा.

कामगारांमध्ये बहुतांश दलित आणि महिला

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगची व्याख्या ‘सेप्टिक टँक, गटारे आणि सांडपाण्याच्या पाईप्सची स्वच्छता आणि सार्वजनिक रस्त्यांवरून आणि कोरड्या शौचालयांमधून मानवी मैला साफ करण्याची क्रिया म्हणून केली आहे. निहाल राज, मनीष तिवारी आणि सुयशा सिंग इस्सर (२०२४) यांनी त्यांच्या ‘फ्रॉम शॅडोज टू स्पॉटलाइट: अनव्हेलिंग द सागा ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग इन इंडिया’ या शोधनिबंधात म्हटले आहे की, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगमध्ये म्हणजेच हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांमध्ये बहुतेक दलित आहेत आणि त्यापैकी ९५-९८ टक्के महिला आहेत.

मैला साफ करण्याची सुरुवात कधी झाली?

  • हाताने मैला साफ करण्याची सुरुवात इ.स.पूर्व ६०० पासून झाली असे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.
  • याविषयीचे सर्वात जुने संदर्भ नारदसंहितेत आढळतात.
  • नारदसंहितेत गुलामांसाठीच्या १५ कर्तव्यांपैकी एक म्हणून मानवी मलमूत्र साफ करण्याची नोंद आहे. वाजसनेयी संहितेत चांडाळ आणि पौलकस यांना मानवी मूलमूत्राची विल्हेवाट लावणारे गुलाम म्हणून संबोधले गेले आहे.

मनुस्मृतीतील संदर्भ काय सांगतात?

  • मनुस्मृती देखील या प्रथेला मान्यता देते, असं विद्वान मान्य करतात.
  • मनुस्मृतीत अस्पृश्य जातीतील लोकांनी उच्च वर्णांतील लोकांची सेवा करणे, ही त्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांना तक्रार करण्याचा कोणताही अधिकार नाही असा उल्लेख आहे, असे राज, तिवारी आणि इस्सर यांनी लेखात म्हटले आहे.
  • ते असेही नमूद करतात की, मैला उचलणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सेवांच्या मोबदल्यात घर बांधण्यासाठी जमीन दिली जात असे; मात्र जर त्यांनी ही सेवा पुरवली नाही, तर ही जमीन काढून घेण्याचा अधिकारही समाजाकडे असे. ही प्रथा वर्षानुवर्षे टिकून होती.
  • मौर्य साम्राज्याच्या काळातही तिचे अस्तित्त्व होते. प्राचीन पाटलीपुत्र (सध्याचे बिहारमधील पटणा) या नगरात मैला उचलणाऱ्यांच्या अस्तित्त्वाची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सापडते.

मुस्लिम आक्रमणकर्त्यांची देण

  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मैला हाताने साफ करण्याच्या पद्धतीला मुस्लिम आक्रमणकर्त्यांची देणं असे काही अभ्यासक मानतात.
  • महिलांमधील पडदा पद्धतीमुळे महिलांना एकांतात शौचास जावे लागे. त्यामुळे मैला दूर नेण्यासाठी साफसफाई करणाऱ्यांची गरज निर्माण झाली.
  • यासाठी युद्धबंदी व्यक्तींना वापरले जाई. ते मैला गोळा करून रात्रीच्या वेळेस दूर नेऊन विल्हेवाट लावत असत. या युद्धबंद्यांची मुक्तता झाल्यावर त्यांचा समाजाने स्वीकार केला नाही.
  • त्यामुळे ‘भंगी’ नावाची स्वतंत्र जात निर्माण झाली. त्यांना पुढेही हाताने मैला उचलण्याचे काम करावे लागले.
  • रोड टू फ्रीडम: अ सोशियोलॉजिकल स्टडी ऑन अबॉलिशन ऑफ स्कॅव्हेंजिंग इन इंडिया (१९९९) या समाजशास्त्रज्ञ बिंदेश्वर पाठक लिखित पुस्तकात या जातीस पुढे सम्राट अकबराने ‘मेहतर’ असे नाव दिले, असे नमूद केले आहे.

धर्म बदलतो, पण जात नाही

१९६० साली एन. आर. मलकानी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘मैला उचलणाऱ्यांवरील चौकशी समितीच्या अहवालात एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे. हिंदू समाजातील अस्पृश्य जातीतील कुटुंबांनी इस्लाम स्वीकारल्यानंतरही त्यांनी मैला उचलण्याचे काम सुरूच ठेवले.

ब्रिटीशांनी दिले कुप्रथेस संस्थात्मक रूप

ब्रिटिश प्रशासनाने भारतात मैला उचलण्याच्या कुप्रथेला आणखी संस्थात्मक स्वरूप दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  1. ब्रिटिश साम्राज्याच्या विविध संस्थांमध्ये जसे की, रेल्वे, सैन्य, न्यायालये आणि उद्योगक्षेत्रात हाताने मैला उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची अधिकृत पदे निर्माण करण्यात आली.
  2. औद्योगिकीकरण आणि भूमीच्या व्यापारीकरणामुळे पारंपरिक कारागीर व शेतकरी समाज बेरोजगार झाला आणि यातील अनेकांना मैला उचलण्याचे काम स्वीकारावे लागले.
  3. १९३१ च्या जनगणनेनुसार भारतात एकूण १९,५७,४६० मैला उचलणारे होते, त्यामध्ये १०,३८,६७८ पुरुष आणि ९,१८,७८२ स्त्रिया होत्या.
  4. ब्रिटिशांनी जातिव्यवस्था निर्माण केली नसली तरी त्यांनी त्या व्यवस्थेत हस्तक्षेप करून तिला संस्थात्मक रूप दिले.

आजचा काळ शिक्षण, विज्ञान, आणि संविधानिक हक्कांचा आहे. परंतु, मैला हाताने उचलण्याची अमानवी प्रथा अजूनही भारताच्या काही कोपऱ्यात जिवंत आहे. इतिहासात या व्यवस्थेची बीजे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय सत्तांनी घट्ट रोवलेली असल्याचे स्पष्ट आहे. धर्म बदलला, सत्ताधारी बदलले, कायदे आले, पण सामाजिक वास्तव फारसे बदलले नाही. त्यामुळे केवळ कायदे नव्हे, तर मानसिकतेत बदल हाच खरा ‘स्वच्छ भारता’चा पाया ठरेल. अन्यथा, सफाई कामगारांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य हे सगळं काळवंडलेल्या कुंड्यांत अडकून राहील.