पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ या धाडसी कारवाईचा अवलंब केला. ही कारवाई तसेच त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान भारताने ब्रह्मोस या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर केल्याचे समोर येत आहे. या क्षेपणास्त्राला थोपवणारी यंत्रणाच पाकिस्तानकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच या क्षेपणास्त्राचा धसका घेऊन पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी आग्रह धरला, असेही स्पष्ट होत आहे. 

‘ऑपरेशन सिंदूर’पेक्षाही विध्वंसक!

ऑपरेशन सिंदूरच्या मूळ कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या दोन ठिकाणी मिळून नऊ तळांवर हल्ले केले आणि दहशतवादी तळ, मुख्यालये, प्रशिक्षण केंद्रे यांना लक्ष्य केले. ७ मे च्या पहाटेपर्यंत याविषयीची माहिती प्रसृत झाल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने त्याच रात्री ड्रोन आणि हलक्या क्षेपणास्त्रांच्या साह्याने भारतावर हल्ले सुरू केले. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानची लष्करी आस्थापने लक्ष्य केली होती. पण पाकिस्तानने मात्र भारताच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले. ९ मेच्या रात्री पाकिस्तानी हल्ल्यांची तीव्रता वाढली आणि लष्करी आस्थापनांबरोबरच प्रार्थनास्थळांना लक्ष्य करून भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. तेव्हा मात्र पाकिस्तानच्या लष्करी आणि हवाई दल तळांवर हल्ले करण्याचा निर्णय भारतीय सैन्यदलांनी घेतला. असे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सैन्यदलांना भारत सरकारने यापूर्वीच बहाल केले होते. हा संघर्ष प्राधान्याने हवाई स्वरूपाचा होता. त्यामुळे हवाई तळांना लक्ष्य करून, पाकिस्तानच्या हवाई मारक क्षमतेवर प्रहार करण्याचा प्रयत्न भारताने केला. भारताचे हे अभियान मूळ ऑपरेशन सिंदूर कारवाईपेक्षाही अधिक तीव्र आणि विध्वंसक ठरले, असे आता स्पष्ट झाले आहे. 

कोणत्या हवाई तळांवर हल्ले?

एकूण दहा पाकिस्तानी हवाई तळांवर भारताकडून हॅमर आणि स्काल्प ही इस्रायली क्षेपणास्त्रे, तसेच ब्रह्मोस हे भारत व रशिया यांच्या संयुक्त बनावटीचे क्षेपणास्त्र वापरण्यात आले. नूर खान, रफिकी, मुरीद, सुक्कूर, सियालकोट, पसरूर, चुनियान, सरगोधा, जकोबाबाद येथील रडार यंत्रणा, धावपट्ट्या, लढाऊ विमाने ठेवण्याचे हँगर यांना लक्ष्य करण्यात आल्या. त्याच्या आदल्या दिवशी भारताने लाहोर हवाई संरक्षण यंत्रणा, रहीम खान हवाई तळ यांना लक्ष्य केले होते. पण त्यांचे स्वरूप मर्यादित होते. दहा हवाई तळांवर भारताने हल्ले केल्याचे वृत्त प्रसृत झाल्यानंतर मात्र अमेरिकेला दखल घ्यावी लागली. 

ब्रह्मोस क्षेपणास्त्र

भारताप्रमाणे पाकिस्तानकडेही लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन अशी सुसज्ज यंत्रणा आहे. पण त्यांच्याकडे ब्रह्मोससारखे स्वनातीत (सुपरसॉनिक) क्रूझ क्षेपणास्त्र नाही. हे जगातील एकमेव सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. भारत आणि रशियाने ते संयुक्तपणे विकसित केले आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मस्कावा या मोठ्या नद्यांच्या नावावरून ‘ब्रह्मोस’ हे नाव या क्षेपणास्त्राला दिले गेले. जमिनीवरून, हवेतून आणि युद्धनौका तसे पाणबुडीवरूनही ते डागता येते. आता या क्षेपणास्त्राची निर्मिती ब्रह्मोस एअरस्पेस याच नावाच्या कंपनीकडून केली जाते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियाची एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया या दोन संस्था या संयुक्त कंपनीत सहभागी आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा पल्ला ३०० किलोमीटर आहे. ते २०० ते ३०० किलोपर्यंत स्फोटके वाहून नेऊ शकते. त्याचा वेग २.८ ‘माक’ म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास तिप्पट आहे.

ब्रह्मोस ठरले ‘गेमचेंजर’?

भारताच्या भात्यात आंतरखंडीय आणि दीर्घ पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. पण त्यांच्यापेक्षाही ब्रह्मोस अत्यंत महत्त्वाचे ठरते. ऑपरेशन सिंदूरमध्ये तर ते निर्णायक ठरले. काही दहशतवादी तळांचा वेध तर या क्षेपणास्त्राने घेतलाच. पण संघर्ष तीव्र झाल्यानंतर मोक्याच्या पाकिस्तानी हवाई तळांवरही ते डागण्यात आले. सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रापासून बचाव  करण्याची यंत्रणा फारच थोड्या देशांकडे आहे. पाकिस्तान अशा देशांमध्ये येत नाही. ब्रह्मोस १५ किलोमीटर उंचीवरून उडू शकते आणि गरज पडेल तेव्हा अगदी १० मीटरवरूनही उडू शकते. इतके वैविध्य असलेल्या या क्षेपणास्त्राची विध्वंसक क्षमता त्यामुळेच वाढते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातच निर्मिती

भारताच्या दृष्टीने विशेष समाधानाची बाब म्हणजे, ८३ टक्के क्षेपणास्त्राची निर्मिती सर्वस्वी भारतीय सुट्या भागांतून होऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये ब्रह्मोस निर्मिती कारखान्याचे उद्घाटन नुकतेच झाले. नवीन ब्रह्मोस क्षेपणास्त्र अधिक हलके बनवले जात असून, त्याचा पल्लाही ४०० किलोमीटरपर्यंत विस्तारला जाईल. त्यामुळे भविष्यातील प्रत्येक संघर्षात वा लढाईत ते भारताचे सर्वाधिक महत्त्वाचे क्षेपणास्त्र ठरेल.