अनिकेत साठे

चीनलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक सावध राहण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर उत्तर भारत (यूबी) मुख्यालयाचे पूर्ण क्षमतेच्या लष्करी तळात रूपांतर करत आहे…

उत्तर भारत मुख्यालय काय आहे?

लष्कराचे उत्तर भारत (यूबी) मुख्यालय बरेलीस्थित आहे. प्रामुख्याने प्रशासकीय स्वरूपाच्या या मुख्यालयावर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला लागून असणारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, उत्तराखंड व वायव्य प्रदेशातील शांतता क्षेत्र तसेच लष्करी प्रशिक्षण संस्थांची जबाबदारी आहे. या क्षेत्रात पूर्वी केवळ एक ब्रिगेड आणि काही स्काउट बटालियन्स होत्या; परंतु मध्यंतरीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील काही वादग्रस्त ठिकाणांवर चिनी सैन्यांशी वारंवार चकमक होऊ लागल्याने सीमेवर वर्चस्व राखण्यासाठी बदल करावे लागले. वर्षभरापूर्वी नव्याने नियोजन करण्यात आले.

हेही वाचा >>> Farmers Protest: आंदोलनात जीव गमावलेला २२ वर्षीय तरुण कोण होता? पोलिसांनी मृत्यूचा दावा का फेटाळला?

बदलाची प्रक्रिया कशी?

उत्तराखंडमध्ये तीन स्वतंत्र ब्रिगेड आणि पायदळ विभाग (डिव्हिजन) ठेवून मुख्यालयाची लढाऊ क्षमता वाढविण्यात आली. ही रचना ‘कॉम्बॅटाइज्ड यूबी एरिया’ म्हणून ओळखली जाते. नव्या कोअर मुख्यालयासाठी जादा मनुष्यबळ आणि अतिरिक्त निधीची गरज भासली असती. त्यामुळे सध्याच्या यूबी मुख्यालयाचे कोअर मुख्यालयात रूपांतर केले जाणार आहे. १८ कोअर म्हणून ते ओळखले जाईल. मुख्यालयात तोफखाना ब्रिगेड, इंजिनीअरिंग ब्रिगेड, अन्य साहाय्यक दल व रसद पुरवठा विभागांचा समावेश असतो. नव्या कोअरच्या स्थापनेने त्यात अन्य शस्त्रास्त्रांसह अभियंता व लष्करी हवाई दलही समाविष्ट होईल. नव्या कोअरवर या क्षेत्रातील तीन डिव्हिजनची जबाबदारी असेल. प्रत्येक डिव्हिजनमध्ये १५ ते १८ हजार सैनिक असतात.

नव्या कोअरने काय साध्य होईल?

यूबी क्षेत्र १८ कोअर होणार असल्यामुळे सीमेवरील पायाभूत सुविधांचा विकास होऊन लढाऊ व दळणवळण सुविधांना चालना मिळेल, असा लष्करी अधिकाऱ्यांना विश्वास आहे. या प्रदेशातील सर्व धोक्यांसाठी कोअर मुख्यालय हे मध्यवर्ती प्रतिसाद केंद्र असेल. यूबी मुख्यालय पूर्वी प्रशासकीय स्वरूपाचे होते. त्याची स्थिर रचना कार्यात्मक कोअरमध्ये परिवर्तित झाल्यामुळे मुख्यालयाचा दृष्टिकोन बदलणार आहे. सैन्याची कुमक वाढून अतिरिक्त लष्करी जबाबदारी पार पाडता येईल. या क्षेत्रातील प्रशिक्षण संस्था व अन्य घटकांना नियमित पारंपरिक कामाबरोबर सीमा भागात सक्रिय राहावे लागेल. जेणेकरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.

भारत-चीन सीमेवर सज्जतेची गरज का?

भारत-चीनदरम्यान तब्बल चार हजार किलोमीटरची सीमारेषा आहे. तिची पश्चिम लडाख, मध्य (उत्तराखंड, हिमालय) आणि पूर्व (सिक्कीम, अरुणाचल प्रदेश) या तीन भागांत विभागणी होते. मॅकमोहन सीमारेषा चीन मानत नाही. यातील बहुतांश क्षेत्र सीमांकन नसणारे आहे. त्याचा लाभ चिनी तुकड्या घेतात. भारतीय प्रदेशात घुसखोरी करून तो आपलाच असल्याचा दावा करतात. मागील काही वर्षांत चीनने विशिष्ट ठिकाणे हेरून सीमेवर नव्या कुरापती काढण्याचा मार्ग अवलंबला. एखाद्या क्षेत्रात चीन दहा पावले आतमध्ये शिरतो आणि चर्चेवेळी पाच पावले मागे घेतो. म्हणजे तो काही भाग एक तर गिळंकृत करतो किंवा तो वादग्रस्त ठरवून भारतीय सैन्याला दूर ठेवतो. गलवान खोरे हे त्याचेच उदाहरण. चिनी सैन्याच्या कारवाया रोखण्यासाठी लष्करी सज्जता राखणे अपरिहार्य ठरते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनलगतच्या तैनाती कशी वाढत आहे?

गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराची उपस्थिती वाढवली. पूर्व लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य आणि संबंधित उपकरणे पाठविली गेली आहेत. मध्यवर्ती क्षेत्रात व पूर्व कमांडमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याची तैनाती वाढविली जात आहे. यातून चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपत्कालीन सैन्य नेमणे शक्य होईल. नव्या कोअरच्या समावेशाने चीनलगतच्या सीमेच्या संरक्षणासाठी लष्कराकडे एकूण सात कोअर झाल्या आहेत. ज्या पूर्वी पाच होत्या. मोठ्या बदलाचा भाग म्हणून या क्षेत्रात मध्यंतरी मथुरास्थित एक स्ट्राइक कोअर पुनर्स्थापित करण्यात आले. आधी हा कोअर पाकिस्तानलगतच्या सीमेवर कार्यरत होता.