‘गिल’पर्वाची सुरुवात पराभवाने झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघासमोरील अडचणी वाढताना दिसत असून आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बुमरा या मालिकेत केवळ तीन कसोटी खेळणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर बुमरा आपला विचार बदलेल किंवा संघ व्यवस्थापन त्याला तसे करण्यास भाग पाडू शकेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, तो फोल ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचे २० बळी कसे मिळवायचे हा भारतीय संघासमोरील यक्षप्रश्न आहे.
बुमराबाबत इतकी खबरदारी का?
विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज अशी ख्याती असलेला बुमरा त्याच्या गोलंदाजीच्या निराळ्या शैलीसाठीही ओळखला जातो. मात्र, याच शैलीमुळे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीदरम्यान त्याला विविध दुखापतींचा सामना करावा लागला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत बुमराने पाचही सामने खेळण्याचा प्रयत्न केला. अन्य गोलंदाज अपयशी ठरत असल्याने बुमरावर अतिरिक्त दडपण आले. त्याला सातत्याने षटके टाकणे भाग पडले. परिणामी पाचव्या कसोटीदरम्यान त्याला पाठदुखीने ग्रासले. यानंतर त्याला तीन महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कसोटी कर्णधारपदासाठी बुमराचे नाव चर्चेत होते. मात्र, वैयक्तिक डॉक्टर आणि ‘बीसीसीआय’ फिजिओंच्या सल्ल्यानुसार, बुमरासाठी सातत्याने कसोटी सामने खेळणे धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुमराने स्वत:हून कर्णधारपदासाठी नकार दिला आणि इंग्लंडमध्ये केवळ तीन कसोटी सामने खेळू शकणार असल्याचे ‘बीसीसीआय’ला कळवले. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन बुमराबाबत आता अधिक खबरदारी बाळगली जात आहे.
केवळ एका कसोटीनंतर विश्रांतीची गरज का?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या अन्य गोलंदाजांनी निराशा केली, त्याच वेळी बुमराने पहिल्या डावात अचूक मारा करताना पाच बळी मिळवले होते. त्याच्या गोलंदाजीवर काही झेलही सुटले. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी योजनाबद्ध खेळ करताना बुमराविरुद्ध सावध पवित्रा अवलंबला. त्यामुळे त्याला एकही बळी मिळवता आला नाही. परंतु संपूर्ण सामन्यात मिळून त्याने ४४ षटके टाकली. दुसऱ्या डावात तो काही काळ मैदानाबाहेरही राहिला. त्यातच या मालिकेतील तिसरा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर रंगणार असल्याने बुमरा या सामन्यास मुकण्यास इच्छुक नाही. त्यामुळे तो २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विश्रांती घेणार आहे. दुसऱ्या कसोटीची सांगता आणि तिसऱ्या कसोटीची सुरुवात यात केवळ तीन दिवसांचे अंतर असल्याने बुमराबाबत धोका पत्करणे योग्य नसल्याची संघ व्यवस्थापनाची धारणा आहे.
प्रसिध, शार्दूलचे स्थान धोक्यात?
भारतीय संघात प्रतिभावान गोलंदाजांची कमतरता नसली, तरी बुुमराची जागा घेऊ शकेल अशी गुणवत्ता आणि अनुभव कोणाकडेही नाही. पहिल्या कसोटीत बुमराच्या साथीला मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर हे अन्य तीन वेगवान गोलंदाज होते. मात्र, हे तिघेही विविध कारणांनी अपयशी ठरले. प्रसिधने दोन डावांत मिळून पाच गडी बाद केले, पण त्याला धावांवर नियंत्रण राखता आले नाही. पहिल्या डावात २० षटकांत १२८ धावा, तर दुसऱ्या डावात १५ षटकांत ९२ धावा त्याने खर्ची केल्या. सिराजने पहिल्या डावात सुरुवातीला स्वैर मारा केला. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली, पण त्याला बळी मिळविण्यात यश आले नाही. शार्दूलही अचूक टप्पा राखण्यात अपयशी ठरला. अनुभवाच्या बाबतीत बुमरानंतर सिराजचा क्रमांक लागत असल्याने बर्मिंगहॅम कसोटीसाठी त्याचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे. प्रसिध आणि शार्दूल यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतासमोर कोणते पर्याय?
सलग दुसऱ्या कसोटीत चार वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय झाल्यास भारतासमोर सिराज, प्रसिध, शार्दूल यांच्यासह अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांचा पर्याय आहे. नितीश कुमार रेड्डीच्या रुपात मध्यमगती गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू भारतीय संघात असला, तरी तो प्रामुख्याने फलंदाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत भारताचे तळाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे नितीशला संधी मिळू शकेल. इंग्लंडच्या वातावरणात त्याची गोलंदाजीही उपयुक्त ठरेल असा अंदाज आहे. नितीशला अंतिम ११ खेळाडूंत स्थान द्यायचे झाल्यास शार्दूलला बाहेर बसावे लागेल. तसेच अर्शदीप सिंगचे डावखुरेपण आणि चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची त्याची क्षमता भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल. त्याला इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचाही अनुभव आहे. गतवर्षीच्या कौंटी स्पर्धेत त्याने केंट संघाकडून पाच सामन्यांत १३ बळी मिळवले होते. त्यामुळे त्याला संधी देण्याबाबत भारतीय संघ विचार करू शकेल.
अतिरिक्त फिरकीपटूला संधी?
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवले पाहिजे असा मतप्रवाह माजी खेळाडूंमध्ये आहे. ‘‘संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जर कोणत्या ठिकाणी असेल, तर ते बर्मिंगहॅम आहे. त्यामुळे भारताने कुलदीपला खेळवावे,’’ असे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनीही कुलदीपला पसंती दर्शविली. ‘‘सध्याच्या इंग्लंड संघातील फलंदाज मनगटी फिरकीपटूंविरुद्ध अडचणीत सापडतात. त्यामुळे कुलदीपला खेळविणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल,’’ असे ब्रॉडने नमूद केले. ‘‘वातावरण आणि खेळपट्टी कशीही असो, तुम्ही सर्वोत्तम गोलंदाजांची निवड केली पाहिजे. तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये कुलदीपचा समावेश आहे. त्यामुळे त्याला खेळवा,’’ असा सल्ला मांजरेकर यांनी दिला. माजी खेळाडूंच्या मताशी भारताचे संघ व्यवस्थापन सहमत होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारताचा एजबॅस्टनवर इतिहास काय?
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावरील भारताचा इतिहास अतिशय निराशाजनक आहे. या मैदानावर भारताने आठ कसोटी सामने खेळले असून यापैकी सातमध्ये पराभव पत्करला आहे. केवळ एक सामना भारताला अनिर्णित राखता आला आहे. या इतिहासासह भारतीय संघासमोर अन्यही आव्हाने आहेत. सर्वप्रथम भारताला क्षेत्ररक्षणात मोठी सुधारणा करावी लागणार आहे. गेल्या कसोटीत भारताने सहा झेल सोडले. एकट्या यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात ऑली पोप आणि हॅरी ब्रूक, तर दुसऱ्या डावात बेन डकेटला जीवदान दिले. यापैकी पोप आणि डकेटने शतके साकारली, तर ब्रूकचे शतक केवळ एका धावेने हुकले. ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला किती मोठा फटका बसला हे यावरून स्पष्ट होते. तसेच तळाचे फलंदाज योगदान देण्यात आणि गोलंदाज अचूक टप्पा राखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे भारताला सर्वच आघाड्यांवर मेहनत घ्यावी लागणार आहे.