सध्या जागतिक तणाव वाढताना दिसत आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. पाकिस्तानला तुर्कियेचा पाठिंबा मिळत असल्याने भारत आणि पाकिस्तानमधील तणावही सध्या कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत भारत आपल्या संरक्षण प्रणालींचे आधुनिकीकरण करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवत आहे आणि संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे. भारताकडे सध्या प्रगत अशी ब्रह्मोस, अग्नि-५ आणि आकाशसारखी क्षेपणास्त्रे आहेत. आता संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) प्रकल्प विष्णू अंतर्गत पुढील पिढीच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत आहे.
हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसपेक्षाही शक्तिशाली असेल असे सांगण्यात येत आहे. या नवीन क्षेपणास्त्रामुळे भारताला हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या निवडक देशांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित केलेले एक्स्टेंडेड ट्रॅजेक्टोरी लाँग ड्युरेशन हायपरसोनिक क्षेपणास्त्रामुळे (ET-LDHCM) भारत धोरणात्मकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. विशेष म्हणजे पाकिस्तानचा सामना करण्यासाठी आणि चीनचा वाढता प्रभाव नियंत्रित करण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे ठरणार आहे. काय आहे डीआरडीओचा प्रकल्प विष्णू? ET-LDHCM हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र किती शक्तिशाली आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

ब्रह्मोसशी नव्या क्षेपणास्त्राची तुलना
संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या ET-LDHCM ची हायपरसोनिक वेग, विस्तारित श्रेणी आणि अचूक लक्ष्य भेद ही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे नवनिर्मित क्षेपणास्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक प्राणघातक ठरते. या क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक स्क्रॅमजेट इंजिन आहे. हे क्षेपणास्त्र फिरत्या कोम्प्रेसरऐवजी वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करते आणि त्यामुळेच त्याचा इतर क्षेपणास्त्राच्या तुलनेत वेग वाढतो. या क्षेपणास्त्राचा वेग अंदाजे ११,००० किलोमीटर प्रतितास आहे, त्यामुळे ET-LDHCM काही मिनिटांत दूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. त्या तुलनेत ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचा वेग सुमारे ३,६७५ किलोमीटर प्रतितास आहे.
या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय?
ET-LDHCM हे क्षेपणास्त्र वेग आणि पल्ला गाठण्यात सध्याच्या ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रापेक्षा पुढे आहे. सुरुवातीला ब्रह्मोसची श्रेणी २९० किलोमीटर होती, ही श्रेणी नंतर ४०० ते ४५० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली. त्या तुलनेत ET-LDHCM ची श्रेणी १,५०० किलोमीटर आहे, त्यामुळे ब्रम्होसच्या तुलनेत ही श्रेणी तिप्पट आहे. ET-LDHCM क्षेपणास्त्र १,००० ते २००० किलोग्राम वजनाचे वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे. हे प्रगत क्षेपणास्त्र पारंपरिक आणि आण्विक वॉरहेड दोन्हीसह लक्ष्यांना भेदू शकते. हे क्षेपणास्त्र कमी उंचीवर उडू शकेल, अशा पद्धतीने डीआरडीओने याला डिझाईन केले आहे. कमी उंचीवर उडू शकत असल्याने हे क्षेपणास्त्र रडार प्रणालीमध्ये दिसू शकत नाही.
जमिनीवरून, हवेतून आणि समुद्रातून मारा करण्यास सक्षम
ET-LDHCM चे प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, हवेतून आणि समुद्रातून मारा करण्यास सक्षम आहे. पारंपरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांप्रमाणे ET-LDHCM क्षेत्राच्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. तसेच हे क्षेपणास्त्र उड्डाणादरम्यान त्याचा मार्गदेखील बदलू शकते. या क्षमतेमुळे ते शत्रूच्या तळांना अचूकपणे लक्ष्य करते आणि या तळांना नष्ट करून खोलवर नुकसान पोहोचवू शकते. या क्षेपणास्त्राचा वेग ११,००० किलोमीटर असल्याने व त्याचा पल्ला १,५०० किलोमीटर असल्याने ET-LDHCM आणखी शक्तिशाली शस्त्र ठरते.
२००० अंश सेल्सिअस तापमानातही कार्यरत
ET-LDHCM क्षेपणास्त्रामध्ये पल्ला आणि वेगाव्यतिरिक्त अत्यंत उच्च तापमानाचा सामना करण्याचीही क्षमता आहे. हा क्षेपणास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ET-LDHCM हे तीव्र उष्ण परिस्थितीतही कामगिरी करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. २००० अंश सेल्सिअस तापमानातही हे क्षेपणास्त्र सामान्यपणे कार्य करण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत फक्त रशिया, अमेरिका आणि चीननेच असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ET-LDHCM ची यशस्वी चाचणी भारताला या राष्ट्रांच्या गटात स्थान देईल हे निश्चित.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वेग २.८ मॅक म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. क्षेपणास्त्राचे ८३ टक्के भाग भारतात विकसित होतात, असे ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. मुख्य म्हणजे भारतीय हवाई दलाने सुखोई लढाऊ विमानातून ब्राह्मोसच्या विस्तारित श्रेणीची यशस्वीरीत्या चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटरहून अधिक अंतरावरून लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. अनेक देश भारताकडून हे क्षेपणास्त्र खरेदी करण्यास इच्छुक आहेत. फिलिपिन्स आणि व्हिएतनामबरोबर भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसाठी करारदेखील केला आहे. दिवसेंदिवस भारताची संरक्षण प्रणाली विकसित होत आहे आणि जगभरात त्याला ओळख मिळत आहे.