गेल्या आर्थिक वर्षात घडलेल्या जगभरातील घडामोडींचा आयटी कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढीचा सामना करावा लागत आहे, तर काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि काहींच्या जाण्याच्या मार्गावर आहेत. हा जागतिक बाजारपेठ मंदावण्याचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. नक्की या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? त्याचा परिणाम कोणावर आणि कसा होतोय? ते समजून घेऊयात.
या वर्षी वेतन वाढीची अपेक्षा करणे योग्य ठरणार का?
कंपन्यांना वेतन संरचना आणि वेतनवाढीबाबत सल्ला देणाऱ्या सल्लागारांना अशी अपेक्षा आहे की, जूनमध्ये कंपन्या वेतनवाढ जाहीर करतील. ही वेतनवाढ मार्चमध्ये कंपन्यांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी असेल. ‘डेलॉइट’ या आयटी कंपनीने सरासरी ८.८ टक्के वेतनवाढीचा अंदाज वर्तवला होता, तर ‘एओन’ने ९.२ टक्के वेतनवाढीचा अंदाज वर्तवला होता. भू-राजकीय संकटे, व्यापार करावरील वाद आणि ग्राहकांच्या निर्णयांमुळे व्यवसायांमध्ये हे बदल होत आहेत आणि ही परिस्थिती उद्भवली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई जवळजवळ सहा वर्षांच्या नीचांकी म्हणजेच ३.१६ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, परंतु त्यामुळे चिंता कमी होणार नाही. कारण महागाईच्या तुलनेत पगारवाढ नसल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात फारसे अतिरिक्त पैसे येणार नाहीत.
बोनस आणि व्हेरिएबल पे मिळणार का?
कंपन्यांसाठी हादेखील एक अवघड भाग आहे, कारण त्यांना एका मर्यादित बजेटमध्ये किती बोनस आणि व्हेरिएबल पे वितरित करायचे आहे हे ठरवावे लागते. ‘व्हेरिएबल’ म्हणजे तुमच्या/ कंपनीच्या कामगिरीवर/ व्यावसायिक फायद्या-तोट्यावर अवलंबून असणारा पगार. कंपन्या व्हेरिएबल पे ७० ते ९० टक्के वितरित करू शकतात, परंतु पदोन्नतीची शक्यता यंदा कमी आहे. सल्लागार कंपनी डेलॉइटचा अंदाज आहे की, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पदोन्नतींच्या संख्येत २५ टक्के घट होईल. सध्या नोकरीची बाजारपेठ मंदावली आहे, तसेच भरतीची संख्याही जास्त आहे. अमेरिकन बाजारपेठेत सक्रिय असलेल्या कंपन्या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक बदलांमुळे सावध असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा अर्थ असा की, नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत आणि रिक्त पदांसाठी स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.
कर्मचारी कपातीत वाढ
कंपन्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात करत असल्याचे चित्र आहे. काही कंपन्या त्यांच्या टीम आणि त्यांचे स्वरूप बदलत आहेत. काही कंपन्यांमध्ये एआय म्हणजेच कृत्रिम तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांना हटविण्यात येत आहे. जानेवारी २०२५ मध्ये ४९,७९५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले. हा आकडा डिसेंबरच्या तुलनेत २८ टक्के जास्त आहे. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. ॲमेझॉनने २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी केली होती. या कंपनीने जानेवारीमध्येही ही नोकर कपात सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांत कंपनीने २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.
मायक्रोसॉफ्टनेदेखील अशाच प्रकारची नोकर कपात जाहीर केली होती, ज्यामुळे कंपनीच्या कामगिरीच्या मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी झालेल्या अनेक विभागांमधील कामगारांवर परिणाम झाला. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ३,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. झुकरबर्ग म्हणाले की, कार्यप्रदर्शन व्यवस्थापन आणि कामात कमी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मेटाने २०२२ पासून २१ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला ‘मिंट’ने वृत्त दिले होते की, झोमॅटो, कार्स२४ आणि गुपशपसारख्या टेक कंपन्यांनी गेल्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. स्टार्टअप्स व्यतिरिक्त, आयटी, बीएफएसआय आणि ऑटोमोटिव्हसारख्या विविध क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांमधील कर्मचारीदेखील चिंतेत आहेत. खरं तर, पाच वर्षांत पहिल्यांदाच २०२४-२५ मध्ये टाटा मोटर्समधील कर्मचाऱ्यांची संख्या तीन टक्के कमी झाली आहे.
वेगवेगळ्या कंपन्यांनी नोकऱ्या कमी करण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वेक्षणात, जगभरातील सुमारे ४१ टक्के कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीमुळे पुढील पाच वर्षांमध्ये त्यांचे कर्मचारी कमी करण्याची शक्यता वर्तवली आहे. कंपन्यांनी नफा वाढवावा, असा गुंतवणूकदारांचा दबाव आहे. महागाई आणि आर्थिक संकटामुळे कंपन्या आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवत आहेत. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमॉन म्हणाले, “कृत्रिम तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात नाट्यमय सुधारणा करेल,” असे इम्पेरियो कन्सल्टिंगचे सीईओ एरिक ब्राउन यांनी या परिस्थितीविषयी बोलताना सांगितले. “टेक आणि ग्राहककेंद्रित क्षेत्रांना अनेकदा बाजारातील अस्थिरतेचा फटका बसतो,” असेही ते पुढे म्हणाले.