केरळमधील कलमस्मेरी येथील ख्रिश्चन समाजाच्या ‘झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले. या सेंटरमध्ये ‘यहोवाचे साक्षीदार’ (Jehovah’s Witnesses) या पंथाची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, त्या ठिकाणी राज्यभरातून २,५०० लोक प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. ‘यहोवाचे साक्षीदार’ या पंथाचा माजी सदस्य असलेल्या डॉमिनिक मार्टिन याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करून सदर गुन्ह्याची जबाबदारी घेतली असून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ख्रिश्चन धर्मातीलच एक पंथ असणारा पण ख्रिश्चन रुढी-परंपरा यांना न मानणारा ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथ नेमका कोण आहे? हे लोक कोणत्या धर्माला मानतात किंवा देवाबाबतच्या त्यांच्या संकल्पना काय आहेत? हे लोक राष्ट्रगीत गाताना सहभागी का होत नाहीत? लष्करात जाण्यासाठी त्यांचा विरोध का आहे? जगाचा अंत होणार, असे या लोकांना का वाटते? अशा या सर्व प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न ….

डॉमिनिक मार्टिन याने या हल्ल्याची जबाबदारी घेताना म्हटले, “मी १६ वर्षांपासून ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथाचा सदस्य आहे. पंथाची राष्ट्रद्रोही भूमिका असल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर त्यात मी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण, ते लोक यासाठी तयार नाहीत. ही चुकीची विचारधारा आहे, असे मला कुठेतरी वाटत होते. ते मुलांच्या डोक्यात विष पेरत आहेत. मुलांनी कुणाकडूनही खाऊ स्वीकारू नये, असे लहान मुलांना शिकवले जाते. लोकांनी राष्ट्रगीत म्हणू नये किंवा सैन्य दलात भरती होऊ नये, असेही ते सांगतात. जगात प्रलय येऊन सर्व लोकांचा नाश होणार आहे आणि फक्त ‘यहोवाचे साक्षीदार’ या प्रलयातून जिवंत राहतील, असेही ते म्हणतात. जगातील सर्व लोकांचा नाश होणार असे बोलणाऱ्या लोकांसह काय केले पाहिजे? मला काही उपाय सापडला नाही.”

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..

हे वाचा >> Kerala Blast : “हमासला पाठिंबा दिल्यामुळे केरळमध्ये बॉम्बस्फोट”, भाजपाचा आरोप; काँग्रेस-डाव्या पक्षांवर शरसंधान

कोण आहेत ‘यहोवाचे साक्षीदार’?

‘यहोवाचे साक्षीदार’ हा ख्रिश्चनांमधीलच एक पंथ आहे, पण ते ख्रिश्चनांच्या पवित्र त्रक्याला (Holy Trinity) (पवित्र त्रक्याच्या सिद्धांतानुसार, पिता, पुत्र (ख्रिस्त) आणि पवित्र आत्मा यामध्ये तीन लोकांमध्ये देव समप्रमाणात वसलेला आहे). हा पंथ फक्त यहोवा या एकाच देवाला मानतो. केवळ यहोवाच एकमात्र खरा, सर्वशक्तिमान देव आणि जगाचा निर्माता असल्याचे त्यांचे मानणे आहे. अब्राहम, मोसेस आणि ख्रिस्त यांचाही तोच देव असल्याचे यहोवा सांगतात. यहोवा पंथाच्या मते, येशू ख्रिस्त हा स्वर्गातील देवांच्या राज्याचा राजा आहे, पण तो सर्वशक्तिमान देव नाही. बायबलमधील काही मजकुराला यहोवाचे साक्षीदार प्रमाण मानतात आणि त्यालाच देवाचे वचन म्हणून पाळतात. यहोवाचे साक्षीदार नाताळ, इस्टर असे ख्रिस्ती सण साजरे करत नाहीत. त्यांच्या मते हे सण मूर्तिपूजक संस्कृतीतून पुढे आलेले आहेत.

‘यहोवाचे साक्षीदार’ त्यांच्या देवावरील गाढ श्रद्धेसाठी ओळखले जातात. घरोघरी जाऊन ‘सत्य’ (The Truth) म्हणजेच यहोवाचा प्रचार या पंथाकडून केला जातो. यहोवाच्या साक्षीदारांचे असे मानणे आहे की, या जगाचा लवकरच अंत होणार आहे आणि देवाचे राज्य जगातील मानवी सरकारे उलथवून पुन्हा एकदा दैवी हेतू साध्य करणार आहे. या पंथाचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.

अमेरिकेमध्ये १८७० च्या दशकात पाद्री चार्ल्स टेझ रसेल यांनी सुरू केलेल्या बायबल विद्यार्थी चळवळीतून या पंथाचा उगम झाला असल्याचे सांगितले जाते. यहोवाच्या साक्षीदारांचे नियामक मंडळ वॉर्विक, न्यूयॉर्क येथे आहे. पंथाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणारी मुख्य संस्था ज्याचे नाव “वॉच टॉवर बायबल अँड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेनसिल्व्हेनिया” असून त्याचेही मुख्यालय वॉर्विकमध्ये आहे.

‘यहोवाचे साक्षीदार’ शक्यतो इतर धर्मीय गटापासून अंतर राखून राहतात. या पंथाचे अधिकृत संकेतस्थळ “जेडब्लू डॉट ऑर्ग” यावर नमूद केल्याप्रमाणे, “आम्ही राजकीय व्यवहारापासून शक्यतो काटेकोरपणे तटस्थता बाळगतो आणि इतर धर्मांशी कोणतीही संलग्नता टाळतो. तथापि, आम्ही अशा प्रकरणांमध्ये इतरांच्या निवडीचा आदर करतो.”

भारतात ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथाच्या अनुयायांची संख्या किती?

अधिकृत संकेतस्थळ “जेडब्लू डॉट ऑर्ग” च्या माहितीनुसार, भारतात बायबलची शिकवण देणारे पंथाचे ५६,७४७ सदस्य आहेत. १९०५ पासून ‘यहोवाचे साक्षीदार’ भारतात आहेत. मुंबईमध्ये त्यांनी १९२६ मध्ये आपले कार्यालय सुरू केले, ज्याची कायदेशीर नोंदणी १९७८ मध्ये करण्यात आली. भारतीय राज्यघटनेने धर्माच्या आचरणाचे आणि धार्मिक श्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळे या तरतुदींचा लाभ यहोवाच्या साक्षीदारांना होत असल्याचेही या संकेतस्थळावर म्हटले आहे.

बिजोय इमॅन्युएल (Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors) प्रकरण

‘यहोवाचे साक्षीदार’ पंथाशी निगडित ‘बिजोय इमॅन्युएल आणि इतर विरुद्ध केरळ राज्य आणि इतर’ या प्रकरणावर नजर टाकणे यानिमित्ताने महत्त्वाचे ठरेल. १९८६ साली केरळमधील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत न बोलल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकले गेले होते. या तीनही विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या धार्मिक परंपरेचा हवाला देऊन राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. हे तीन विद्यार्थी भावंडे असून, त्यातील मोठ्या भावाचे नाव बिजोय इमॅन्युएल होते. त्यामुळे या प्रकरणाला त्याचेच नाव पडले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, विद्यार्थ्यांना बळजबरीने राष्ट्रगीत गायला लावणे म्हणजे घटनेने कलम २५ मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे हनन होण्यासारखे आहे.

हे वाचा >> जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीताचा अवमान; सर्वोच्च न्यायालयाचे याबाबत काय निर्देश आहेत?

बिजोय इमॅन्युएल दहावीत आणि बिनू व बिंदू या बहिणी अनुक्रमे ९ वी आणि ५ वीत शिकत होत्या. हे तिघेही राष्ट्रगीतासाठी उभे राहिले होते; पण ते राष्ट्रगीत गात नव्हते, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. एनएसएस हायस्कूल ही शाळा नायर सर्व्हिस सोसायटी या हिंदू संस्थेकडून चालवली जात होती. या शाळेने २६ जुलै १९८५ रोजी तिन्ही भावंडांना शाळेतून काढून टाकले.

बिजोयच्या पालकांनी शाळेच्या या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. बिजोयचे कुटुंबीय यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे ते फक्त यहोवाला मानत होते. हाच मुद्दा त्यांनी उच्च न्यायालयात मांडला. ‘यहोवा’चे साक्षीदार फक्त त्याचीच प्रार्थना करू शकतात. राष्ट्रगीत ही प्रार्थना असल्यामुळे आमची मुले त्याच्या सन्मानार्थ उभे राहू शकतात; पण राष्ट्रगीत गाऊ शकत नाहीत, अशी भूमिका पालकांनी मांडली.

११ ऑगस्ट १९८६ साली सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. संविधानाच्या कलम २५ च्या माध्यमातून ‘सदसद्विवेकबुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार’ करण्याचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. संविधानातील या तरतुदीमुळे लोकशाही देशातील छोट्यातल्या छोट्या अल्पसंख्याकांनाही त्यांची ओळख जपण्याचा अधिकार मिळतो. राष्ट्रगीत सुरू असताना त्याच्या सन्मानार्थ उभे राहायला हवे; जे की या विद्यार्थ्यांनी आधीच केले आहे. पण एखाद्याने राष्ट्रगीत न गायल्यामुळे इतरांना राष्ट्रगीत गाण्यापासून प्रतिबंध करता येत नाही किंवा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत नाही, असे विधान राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंध कायदा, १९७१ (The Prevention of Insults to National Honour Act) या कायद्याचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने केले.

याच कायद्याच्या कलम ३ नुसार जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून राष्ट्रगीत गाण्यात अडथळा निर्माण केला किंवा त्याच्या कृतीमुळे सामूहिक राष्ट्रगीत गात असताना अडथळा निर्माण झाला, तर अशा व्यक्तीला तीन वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान झालेला नाही. ते सन्मानपूर्वक उभे होते आणि फक्त त्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे ते राष्ट्रगीत गाऊ शकले नाहीत. मात्र, या कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करणे म्हणजे घटनेने त्यांना दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे हनन होईल. या मुलांना पुन्हा शाळेत घेण्याचे आदेश देण्यात आले.

धर्मांतराचा आरोप

जेडब्लू संकेतस्थळावर असेही नमूद केले आहे की, भारतात ‘यहोवाचे साक्षीदार’ धार्मिक कार्य करत असताना घरोघरी फिरतात, यावेळी त्यांच्यावर धर्मांतर करत असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आलेला आहे. २०२० सालीही ‘यहोवाचे साक्षीदार’ चर्चेत आले होते. बंगळुरु मधील एका खासगी रुग्णालयाने दावा केला होता की, त्यांनी एका यहोवाच्या साक्षीदाराची रक्त किंवा रक्तातील घटक (प्लाझमा, क्रायोप्रेसिपिटेट आणि प्लेटलेट्स इत्यादी) न वापरता यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. यहोवाच्या साक्षीदाराच्या धार्मिक श्रद्धा जपण्यासाठी अशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. ‘यहोवाचे साक्षीदार’ रक्तदान आणि रक्ताची अदलाबदल करण्याच्या विरोधात आहेत.

आणखी वाचा >> काय आहे प्रभू येशूच्या जन्माचे महत्त्व?

बिजोय इमॅन्युएल प्रकरणात न्यायाधीश ओ. चिन्नप्पा रेड्डी यांनी सांगितले की, ‘यहोवाचे साक्षीदार’ आणि त्यांची विलक्षण श्रद्धा भारतात फारशी दिसून आलेली नाही.

बिजोय इमॅन्युएल प्रकरणाच्या निकालात न्यायालयाने आणखी काय म्हटले?

“यहोवाचे साक्षीदार इतर नागरी समाजापासून अंतर बाळगून राहतात, मतदान करण्यास नकार देतात, सार्वजनिक आणि शासकीय पदावर काम करतात, सशस्त्र दलात सेवा देतात, ध्वजवंदन करतात आणि राष्ट्रगीताला उभे राहतात. साक्षीदारांच्या धार्मिक भूमिकांमुळे विविध सरकारांशी संघर्ष झाला आहे. परिणामी त्यांना कायदेशीर खटले, जमावाचा हिंसाचार, तुरुंगवास, छळ आणि हिंसेचा सामना करावा लागला आहे. एकेकाळी ६,००० पेक्षा जास्त यहोवाच्या साक्षीदारांचा नाझी शिबिरात छळ करण्यात आला होता. कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट राज्य वॉच टॉवरच्या कामामध्ये शक्यतो अडथळे आणून त्यांच्या प्रसाराला मनाई करतात. युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयात या पंथाने ४५ प्रकरणे वेळोवेळी दाखल केली असून धर्म आणि भाषण स्वातंत्र्याचा हवाला देऊन या प्रकरणांमध्ये विजय मिळविला आहे. लष्करी सेवेत दाखल होण्याचा दावा साक्षीदारांच्या वतीने करण्यात आलेला असला तरी त्यात त्यांना फारसे यश मिळालेले नाही”, असे निरीक्षण निकालपत्राचे वाचन करताना न्यायाधीशांनी नोंदविले.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करत असताना ऑस्ट्रेलियातील उच्च न्यायालय आणि अमेरिकन न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांचाही हवाला दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करताना म्हटले, “यहोवाचे साक्षीदार ज्या देशात किंवा शहरात राहतात, तिथे ते त्यांच्या श्रद्धा जपतात. ज्या आपल्याला किंवा इतर नागरी समाजाला अतिशय विचित्र वाटू शकतात. परंतु त्यांच्या श्रद्धेवरची त्यांची प्रामाणिकता ही शंकेच्या पलीकडची आहे. त्यांना संविधानानुसार संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे का?”