1984 Lok Sabha Election History: “अब की बार, ४०० पार” असा नारा भारतीय जनता पक्षानं २०२४ च्या निवडणुकांसाठी दिला आहे. यामध्ये भाजपाला स्वबळावर जवळपास ३७० जागा जिंकण्याचा विश्वास असून भाजपाप्रणीत एनडीएला ४०० हून जास्त जागा मिळवण्याचं लक्ष्य भाजपानं निश्चित केलं आहे. मात्र, भारताच्या इतिहासात आजतागायत फक्त एकदाच एखाद्या पक्षाला ४००हून जास्त जागा मिळवता आल्या आहेत. तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि ती लोकसभा निवडणूक होती १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेली. बरोबर ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत ४०० जागांचा आकडा चर्चेला आला आहे. पण ३० वर्षांपूर्वी प्रस्थापित झालेला ४०० जागांचा विक्रम नेमका कसा झाला होता? काय होती त्यावेळची नेमकी परिस्थिती?

१९८४ सालची निवडणूक काँग्रेसला तेव्हा मिळालेल्या अतिभव्य अशा विजयामुळे इतिहासांत नोंद झाली. या निवडणुकीत एकट्या काँग्रेसला ४१४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला इतकं प्रचंड बहुमत मिळालं होतं की, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला मिळाल्या होत्या, अवघ्या ३० जागा! हा पक्षही एक प्रादेशिक पक्ष होता. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या प्रादेशिक पक्षाला देशाच्या संसदेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली होती. ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘चार सौ पार’चा आकडा चर्चेत आलेला असताना १९८४ च्या निवडणुकीआधी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर काय घडामोडी घडल्या, हे जाणून घेणं संयुक्तिक ठरेल!

Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Rohini Khadse Raksha Khadse
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या…

१९८० च्या निवडणुकीत काय घडलं?

खरंतर ९०च्या दशकाच्या उत्तरार्धात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत एनडीएचं सरकार सत्तेत येईपर्यंत जवळपास साडेचार दशकं पूर्णपणे काँग्रेसचाच वरचष्मा राहिला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत काँग्रेसला निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळत गेलं. अपवाद फक्त १९७६च्या आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांचा! या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता दलाचं सरकार स्थापन झालं. पण दोनच वर्षांत सरकारमधले हेवेदावे चव्हाट्यावर आले आणि देसाई सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ १९८० साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं ३५३ जागा जिंकत जोरदार कमबॅक केलं! यावेळी जनता पार्टीला फक्त ३१ जागा मिळाल्या होत्या.

ऑपरेशन ब्लू स्टार आणि इंदिरा गांधींची हत्या!

खलिस्तानी चळवळीचा प्रमुख जर्नेल भिंद्रनवालेनं अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता. पंजाबमध्ये हिंसक घटना वाढतच होत्या. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला हिरवा कंदील दिला आणि ५ जून १९८४ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सुवर्ण मंदिरातील खलिस्तानी दहशतवाद्यांवर पहिला हल्ला चढवण्यात आला. १० जून १९८४ रोजी दुपारी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ अधिकृतरीत्या संपल्याचं जाहीर करण्यात आलं. यात लष्कराचे ८३ जवान शहीद झाले तर २४९ जखमी झाले. भिंद्रनवाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कारवाईत पूर्ण खात्मा करण्यात आला.

भाजपाच्या दोन उमेदवारांनी मिळालेलं तिकीट नाकारलं; इतरांची चढाओढ चालू असताना विरुद्ध निर्णय घेणारे ‘ते’ दोन नेते कोण?

ऑपरेशन ब्लू स्टारमुळे शीख समुदायासाठी सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या सुवर्ण मंदिरातील अकाली तख्तचं मोठं नुकसान झालं. याची संतप्त प्रतिक्रिया शीख समुदायात उमटली. चार महिन्यांनंतर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींची यांची त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या काळात दिल्ली, पंजाब, हरियाणा व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर दंगली व हिंसाचार झाला.

ऐतिहासिक निवडणुका आणि ऐतिहासिक विजय!

ऑपरेशन ब्लू स्टारमुळे देशभरात काँग्रेसविरोधात निर्माण झालेलं वातावरण इंदिरा गांधींच्या हत्येमुळे त्याहून अधिक वेगाने काँग्रेसच्या बाजूने झालं. १९८४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसनं न भूतो, न भविष्यती असा विजय संपादन केला. पंजाब व आसाम वगळता उर्वरित भारतात झालेल्या मतदानात काँग्रेसला तब्बल ४०४ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर वर्षभरात पंजाब व आसाममध्येही परिस्थिती शांत झाल्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या. यातही काँग्रेसला २७ पैकी १० जागांवर विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेसला मिळालेल्या एकूण जागांचा आकडा ४१४ इतका प्रचंड झाला. त्याआधी किंवा त्यानंतर आजतागायत कोणत्याही पक्षाला एकहाती इतक्या जागा जिंकता आलेल्या नाहीत.

इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेचा भावनिक पाठिंबा राजीव गांधींच्या पाठिशी असेल हे स्पष्ट दिसत होतं. या काळात भाजपाचे तत्कालीन प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांनी “ही लोकसभा नव्हे, शोकसभा निवडणूक” अशा आशयाची टिप्पणीही केली.

आकड्यांचा अविश्वसनीय खेळ!

१९८४ च्या लोकसभा निवडणुकांचे आकडे आश्चर्यचकित करणारे होते. जिथे एकीकडे काँग्रेसला ४१४ जागांइतकं प्रचंड बहुमत मिळालं, तिथे काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठललेल्या एन. टी. रामाराव यांच्या तेलगु देसम पार्टीला अवघ्या ३० जागा मिळाल्या होत्या. टीडीपीच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्यामुळे लोकसभेत काँग्रेससमोर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून रामाराव यांचा पक्ष बसला. एखाद्या प्रादेशिक पक्षाला लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कामगिरी पार पाडण्याची संधी मिळण्याची ती देशाच्या इतिहासातली एकमेवाद्वितीय स्थिती होती!

सर्वाधिक मतांची टक्केवारी!

सर्वाधिक जागांबरोबरच १९८४ च्या निवडणुकांनी काँग्रेसला सर्वाधिक मतंही दिली. काँग्रेसला या निवडणुकीत तब्बल ४९.१० टक्के मतं मिळाली. आजतागायत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं कोणत्याही पक्षाला मिळालेली नाहीत. १९८० च्या तुलनेत तब्बल ६१ जागा काँग्रेसच्या पारड्यात वाढल्या. तेव्हाचा आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाम वगळता देशभरातल्या सर्व राज्यांमधल्या बहुतांश जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या.

गोव्यात पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत पल्लवी डेम्पो?

भाजपाला फक्त २ जागा!

दरम्यान, काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालेलं असताना भारतीय जनता पक्षाला तेव्हा देशभरात फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला होता. प्रत्यक्ष लालकृष्ण आडवाणी व अटल बिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. आंध्र प्रदेशच्या हनामकोंडा मतदारसंघातून चंदूपाटला जंगा रेड्डी व गुजरातच्या मेहसाणामधून ए. के. पटेल हे दोन भाजपा उमेदवार फक्त काँग्रेसच्या प्रचंड मोठ्या लाटेसमोर विजयी झाले होते.

१९८४ च्या निवडणुका, त्याआधीच्या सर्व घडामोडी आणि एकट्या काँग्रेसला मिळालेलं अभूतपूर्व यश या गोष्टींना आता जवळपास तीन दशकं उलटली आहेत. आता भारतीय जनता पक्षानं ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. मात्र, यावेळीही भाजपानं स्वबळावर ३७० जागांचंच लक्ष्य ठेवलं आहे. गेल्या तीन दशकांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. बऱ्याच आघाड्या- बिघाड्या, सरकारं, सत्ताबदल झाले आहेत. इंडिया आघाडी, स्थानिक पातळीवर आघाड्या किंवा विरोध, एनडीएमधील भाजपाचा एकछत्री अंमल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींभोवतीचं वलय या सर्व पार्श्वभूमीवर २०२४च्या निवडणुकांना देश सामोरा जात असताना ‘तब की बार ४०० पार’ झालेली ती निवडणूक राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय ठरते हे नक्की!