ठाणे शहरातील त्यातही घोडबंदर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. तो सोडविण्यासाठी आता राज्य सरकारने नवीन प्रकल्पाचा उतारा आणला आहे. भुयारी मार्ग आणि उन्नत रस्ता असे दोन्ही पर्याय असलेल्या एका प्रकल्पाची आखणी केली जात आहे. साधारण १५.५ किमीचा हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास घोडबंदर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असा दावा केला जात आहे. हा प्रकल्प नेमका कोणता, तो कसा आहे याचा आढावा…

घोडबंदर मार्गावर कोंडी का?

ठाण्यातील घोडबंदर मार्ग हा ठाणे आणि मुंबई-अहमदाबाद मार्गाला जोडतो. उरण येथील जेएनपीटी येथून जाणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वसई वा गुजरातच्या दिशेने ये-जा करतात. त्यामुळे तेथे कायम वाहतूक कोंडी असते. या मार्गाचा काही भाग घाट स्वरूपाचा आहे. अशा वेळी येथे अवजड वाहने आली तर वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. फक्त गर्दीच्या वेळी नाही तर २४ तास तेथे वाहनांची मोठ्या संख्येने ये-जा असते. त्यातही गायमुख ते फाऊंटन हाॅटेल, वसई दरम्यानच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याची मागणी सातत्याने प्रवाशांकडून होताना दिसते आहे. घोडबंदरवरील वाहतूक कोडींची दखल घेत आता राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक नवीन प्रकल्प आणला आहे.

हेही वाचा >>> सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता चहाही महागणार? कारण काय?

ठाणे ते भाईंदर प्रकल्पाची उभारणी?

ठाणे ते वसई आणि वसई ते भाईंदर प्रवासाचा वेग वाढण्यासाठी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गायमुख, ठाणे ते फाऊंटन हाॅटेल नाका असा भुयारी मार्ग अर्थात बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय फाऊंटन हाॅटेल नाका ते भाईंदर असा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गायमुख ते वसई बोगदा ५.५ किमीचा असेल. त्यातील ३.५ किमी बोगदा असेल. हा प्रकल्प प्रत्येकी तीन-तीन मार्गिकांचा असेल. वसई ते भाईंदर उन्नत रस्ता १० किमीचा असून तो प्रत्येकी चार-चार मार्गिकांचा असेल. या दोन्ही प्रकल्पासाठी एकूण २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर गायमुख ते भाईंदर अंतर त्वरित आणि सुरळीत पार करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

बोगद्याचा पर्याय का?

ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करून ठाणे शहराला थेट मुंबईतील पश्चिम उपनगरांशी जोडण्यासाठी ठाणे-बोरिवली दुहेरा बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. असे असताना आता ठाण्यातून आणखी एक बोगदा जाणार आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोगद्याचाच पर्याय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. पण एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर तर दुसऱ्या बाजूला ठाणे खाडी असल्याने रुंदीकरण शक्य होताना दिसत नाही. त्यामुळेच बोगद्याचा पर्याय पुढे आल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. गायमुख ते वसई असा बोगदा तर वसई ते भाईंदर असा उन्नत रस्ता बांधला जाणार आहे.

हेही वाचा >>> रशियाचा झार जेव्हा भारत गिळंकृत करायला निघाला होता!

प्रकल्प प्रत्यक्षात कधी?

गायमुख ते फाऊंटन हाॅटेल नाका बोगदा आणि फाऊंटन हाॅटेल नाका ते भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडून शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प आता प्राथमिक स्तरावर आहे. या प्रस्तावास आता कुठे मान्यता मिळाली आहे. आता प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास होईल, त्यानंतर सविस्तर आराखडा तयार केला जाईल आणि त्यानंतर बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू होईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग बांधकामास सुरुवात होईल. त्यामुळे ठाणे ते भाईंदर असा थेट प्रवास वेगाने एकाच वेळी बोगदा आणि उन्नत रस्ता मार्गे करण्यासाठी प्रवाशांनी बरीच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.