संदीप नलावडे 
७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झालेल्या इस्रायल- हमास युद्धाला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. जगातील अनेक देशांनी हे युद्ध समाप्त व्हावे यासाठी वाटाघाटी केल्या. मात्र त्यास यश आले नाही. या युद्धात दोन्ही देशांतील जवळपास ३४,५०० नागरिक मृत्युमुखी पडले, त्यात १३,००० पेक्षा अधिक बालकांचा समावेश आहे. गाझा पट्टीचा बराचसा भाग बेचिराख झाला. युद्धामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि शांततेच्या वाटाघाटींवर एक नजर…

युद्ध कसे सुरू झाले? 

गाझा पट्टीवरून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलच्या भूमीवर क्षेपणास्त्र हल्ले केले आणि सीमेलगतच्या शहरांमध्ये घुसून घातपाती कारवाया घडवून आणल्या. या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिक व सैनिक ठार झाले. हल्लेखोरांनी लहान मुलांसह २५३ जणांना ओलीस ठेवले आणि गाझाला आणले.  ओलिसांना गाझाला परत आणले. त्यानंतर इस्रायलने केलेल्या अव्याहत प्रतिहल्ल्यात रोजच्या रोज हजारोंनी पॅलेस्टिनी नागरिक ठार होत आहेत. हमासच्या हल्ल्याविरोधात आम्ही युद्ध पुकारत असल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

इस्रायलच्या हल्ल्यांनंतर गाझा पट्टीत काय घडले?

इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागांत आधी जमिनीवरून हल्ले सुरू केले आणि हजारो नागरिकांना दक्षिणेकडे स्थलांतर करण्याचे आणि पलायन करण्याचे आदेश देण्यात आले. नोव्हेंबरच्या शेवटी आठवडाभराच्या युद्धविरामानंतर, इस्रायली सैन्याने आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले आणि लोकांना पुन्हा स्थलांतर करण्याचे आदेश दिले. फेब्रुवारीपासून इस्रायली सैन्याने जवळजवळ संपूर्ण गाझा बेचिराख केला आहे. मध्यभागी एक लहान क्षेत्र आणि दक्षिणेकडील रफाह शहर मात्र सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या शहरातच गाझाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आता आश्रय घेत आहे. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सुमारे ३३, ०९१  पॅलेस्टिनी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे, त्यापैकी सुमारे ४० टक्के म्हणजे १३,५०० पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले शेकडो मृतदेह सापडले नाहीत. त्याशिवाय उपासमार, अस्वच्छ परिस्थिती आणि आरोग्य सेवा कोलमडल्यामुळे होणारे मृत्यू यांची नोंद करण्यात आली नाही. जवळपास ७५,७५० नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या म्हण्यानुसार त्यांनी १३,००० हमास दहशतवादी आणि हस्तक ठार केले आहेत. पॅलेस्टिनींच्या हानीला हमास दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!

गाझापर्यंत मदत पोहोचली का? 

युद्धाच्या सुरुवातीला इस्रायलने संपूर्ण नाकेबंदी केली. त्यामुळे गाझामध्ये मदत पोहोचण्यास वाव नव्हता. त्यानंतर इजिप्तमधील पादचारी चेकपॉइंटद्वारे आणि नंतर इस्रायलच्या जवळच्या रस्त्याच्या चेकपॉइंटरद्वारे मदत करण्यास परवानगी देण्यात आली. इस्रायलचे म्हणणे आहे की ते अन्न आणि मानवतावादी पुरवठ्यावर कोणतीही मर्यादा घालत नाहीत. मात्र मदत संस्था आणि मदत साहाय्य पाठविणाऱ्या देशांचे म्हणणे आहे की, इस्रायली तपासणी मोहीम कठोर व त्रासदायक असून जहाजे अनेक आठवडे रोखून धरली जात आहेत. गाझामध्ये दररोज ५०० ट्रक जाण्यास परवानगी आहे. त्यामुळे गाझामध्ये मदत वितरित करणे किंवा वाहतूक करणे कठीण आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की ते आता अतिरिक्त चेकपॉइंट उघडत आहेत आणि हवाई व सागरी मदत वितरणास परवानगी देत आहेत. मात्र गाझामध्ये योग्य बंदर नाही आणि हवाई मदत वितरित करणे कठीण व धोकादायक असल्याचे मदत संस्थांचे म्हणणे आहे. 

इस्रायल रफाहवर हल्ला करणार का? 

सध्या गाझा पट्टीतील रफाह शहरामध्येच पॅलेस्टाईन रहिवासी सुरक्षित आहेत. आता पळून जाण्यासाठी जागा उरली नसल्याचे या रहिवाशांचे म्हणणे आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की हमासचे मुख्य सशस्त्र विभाग आणि दहशतवादी रफाह शहरामध्येच आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जमिनीवर हल्ला करणे आवश्यक आहे. इस्रायलने इजिप्तशी समन्वय साधण्याचे आणि रफाहमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेनेही रफाहवर हल्ला झाल्यास ती इस्रालयची चूक असेल, असे म्हटले आहे. इस्रायल दहशतवाद्यांना युक्तीने लक्ष्य करू शकते, ज्यामुळे नागिरकांना कमी नुकसान होईल. संयुक्त राष्ट्रांनीही रफाहवरील हल्ल्यामुळे मानवतावादी आपत्ती हाईल, असे म्हटले आहे. 

हेही वाचा >>>विश्लेषण: सत्ताधारी आणि विरोधकांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ; ‘वातावरण बदला’वर मौन; नेमके काय घडत आहे?

युद्धविराम आणि चर्चेची स्थिती काय आहे? 

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आतापर्यंतचा एकमेव युद्धविराम करण्यात आला. त्या वेळी हमासने निम्म्या ओलिसांची सुटका केली. कतार आणि इजिप्त या शेजारील राष्ट्रांच्या मध्यस्थीने पुढील युद्धबंदीवर चर्चा करण्यात आली. शेकडो पॅलेस्टिनी बंदिवानांच्या बदल्यात सुमारे ४० ओलिसांच्या सुटकेसह दोन्ही बाजूंनी सुमारे ४० दिवसांच्या नवीन युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र प्रत्येकाने एकमेकांचे प्रस्ताव नाकारले. इस्रायलचे म्हणणे आहे की युद्धातील तात्पुरत्या विरामावर चर्चा झाली, तरी हमासचा नायनाट होईपर्यंत युद्ध संपणार नाही. हमासचे म्हणणे आहे की ते युद्धाचा अंत आणि इस्रायलच्या माघारा कराराशिवाय ओलिसांना मुक्त करणार नाहीत.

अमेरिका, इस्रायल संबंधांवर काय परिणाम?

अमेरिका आणि इस्रायल यांच्यात ७५ वर्षांची मैत्री आहे. मात्र या युद्धाने त्यांच्या मैत्रीत बाधा आणली असून उभय देशांत तीव्र मतभेद निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने प्रतिहल्ला केल्यारनंतर अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलच्या या कृतीचे जोरदार समर्थन केले होते. मात्र तेल अवीवमधील एका भाषणात इस्रायली नागरिकांनी रागाचा कडेलोट करू नये, असे आवाहन बायडेन यांनी केले. युद्धाला सामोरे जात असलेल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी पावले उचलण्याचेही आवाहन केले. इस्रायलच्या रफाहवर हल्ला करण्याच्या योजनेवर अमेरिकेकडून जोरदार टीका करण्यात आली. युद्धविरामाची मागणी करणारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव रोखण्यासाठी नकाराधिकार वापरण्यापासून इस्रायलला अमेरिकेने परावृत्त केले. त्यानंतर नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायली शिष्टमंडळाने अमेरिकेचा नियोजित दौरा रद्द करून प्रत्युत्तर दिले. उभय देशांतील या तीव्र संघर्षानंतरही अमेरिकेने इस्रायलला शस्त्रास्त्रे आणि युद्धसामग्रीचा पुरवठा सुरूच ठेवला आहे. 

sandeep.nalawade@expressindia.com