भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. या ऑपरेशनची दखल संपूर्ण जगाने घेतली. मात्र, पाकिस्तानमधील किराना हिल्स भागामध्ये ‘न्यूक्लिअर रेडिएशन लीक’ अर्थात किरणोत्सर्ग झाल्याचा दावा केला जात असल्याने जगाची चिंता वाढली. पाकिस्तानमध्ये किरणोत्सर्ग झाल्याच्या अफवांमुळे दक्षिण आशियामध्ये चिंता निर्माण झाली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संघर्षानंतर ही अफवा पसरली. त्यानंतर पाकिस्तानातील किराना हिल्स हे ठिकाण चर्चेत आले आहे. या भागात पाकिस्तानचा आण्विक शस्त्रसाठा असल्याची माहिती आहे.
सोशल मीडियावरील या चर्चेमुळे, या ठिकाणी भारताने हल्ला केल्याचे संकेत मिळाल्याचीही चर्चा होऊ लागली. त्यानंतर अमेरिकेचे आण्विक आपत्कालीन विमान या भागाजवळून उडताना दिसले. पाकिस्तानी हवाई हद्दीत इजिप्शियन लष्करी विमान फिरत असल्याच्या चर्चेने किरणोत्सर्गी परिणामांची भीती निर्माण झाली. मात्र, हा किरणोत्सर्ग झाल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. पाकिस्तानातील किराना हिल्स परिसर काय आहे? किरणोत्सर्ग झाल्यास त्याचे परिणाम किती घातक ठरतील? त्याविषयी जाणून घेऊ.
किराना हिल्स काय आहे?
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सरगोधा जिल्ह्यात असणारे किराना हिल्स हा लष्करी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांमध्ये बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय राहिला आहे. किराना हिल्सला ‘पाकिस्तानचे क्षेत्र ५१’ म्हणून ओळखले जाते. या भागात खडकाळ टेकड्या असून, तेथे १९८० च्या दशकात बांधलेले भूमिगत बोगदे आणि अनेक भक्कम खंदक असल्याचे म्हटले जाते. किराना हिल्समध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्र शस्त्रागारातील वॉरहेड्स, डिलिव्हरी सिस्टीम व संवेदनशील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असल्याचेदेखील सांगितले जाते. मात्र, पाकिस्तान या जागेच्या खऱ्या स्वरूपाविषयी कधी बोललेला नाही. परंतु, याच ठिकाणी पाकिस्तानचे अण्वस्त्र भांडार असल्याचे बोलले जाते. किराना हिल्समध्ये १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून अणवस्त्रांचा साठा असल्याचे मानले जाते.
किराना हिल्सविषयी विविध स्वरूपाची माहिती पसरत असताना भारतीय हवाई दलाने यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एअर मार्शल ए. के. भारती यांनी सोमवारी (१२ मे) पत्रकार परिषदेत माहिती देताना स्पष्ट केले आणि म्हटले, “आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही.” पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “पाकिस्तानने किराना हिल्सवर आपली अण्वस्त्रे साठवली आहेत हे आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद! आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही. आम्ही तुम्हाला माहिती दिलेल्या लक्ष्यांच्या यादीत या ठिकाणाचा समावेश नव्हता.”
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने फेटाळले दावे
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) या दाव्यांना त्वरित स्थगिती दिली. ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीत आयएईएच्या प्रेस विभागाचे फ्रेडरिक डहल म्हणाले, “आम्हाला या अहवालांची माहिती आहे. आयएईएकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, पाकिस्तानमधील कोणत्याही आण्विक ऊर्जा केंद्रातून किरणोत्सर्ग किंवा प्रकाशन झालेले नाही.” ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या आण्विक ऊर्जा पायाभूत सुविधांना धोका निर्माण झाला आहे, अशा स्वरूपाचे वृत्त अनेक परदेशी माध्यमांनी दिले होते. परंतु, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने ही माहिती एक अफवा असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेसह भारतीय अधिकाऱ्यांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय हवाई दलाचे हवाई ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी माध्यमांना भारताने किराना हिल्सवर हल्ला न केल्याची माहिती दिली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्रालय काय म्हणाले?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एअर मार्शल ए. के. भारती यांच्या विधानाला दुजोरा दिला. पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले, “आमची लष्करी कारवाई पूर्णपणे पारंपरिक क्षेत्रात होती.” काही बातम्यांमध्ये फ्लाइट ट्रॅकिंग साधनांनी अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे विमान पाकिस्तानजवळ कार्यरत असल्याचे दाखवले आहे. ही विमाने सहसा फुकुशिमासारख्या आण्विक आपत्कालीन परिस्थितीत तैनात केली जातात. याव्यतिरिक्त, इजिप्शियन लष्करी विमान बोरॉन घेऊन उतरल्याच्या अफवेमुळे अधिक गोंधळ निर्माण झाला. परंतु, माजी अधिकाऱ्यांनी हे दावे निराधार असल्याचे सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
किरणोत्सर्गाचे परिणाम किती घातक?
किरणोत्सर्गाची भीती लोकांमध्ये सहाजिक आहे. जगात आधीच अनेक आण्विक चाचण्या होत आहेत, ज्याचे दीर्घकालीन परिणाम पर्यावरणावर होत आहेत. ‘युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी’च्या माहितीनुसार, “आण्विकशस्त्रांच्या चाचणीतून वातावरणात येणारे सूक्ष्म कण मोठ्या प्रमाणात पसरतात. परंतु, असे असले तरी जवळजवळ प्रत्येक जण अत्यंत कमी प्रमाणात प्लुटोनियमच्या संपर्कात येतो.” अण्वस्त्रांमध्ये वापरला जाणारा प्लुटोनियम-२३९ अत्यंत घातक असतो.
‘कॅनेडियन कोलिशन फॉर न्यूक्लियर रिस्पॉन्सिबिलिटी’च्या माहितीनुसार, हवेत सोडण्यात येणारा फक्त एक ग्रॅम प्लुटोनियम-२३९ लाखो लोकांवर परिणाम करू शकतो. प्लुटोनियम-२३९ सह आयोडिन-१३१, सीझियम-१३७, स्ट्रॉन्टियम-९० आणि युरेनियम-२३५ हे इतर किरणोत्सर्गी घटकही तितकेच चिंताजनक आहेत. आयोडीन-१३१ थायरॉईड कर्करोगाला कारणीभूत ठरू शकते. सीझियम-१३७ स्नायूंच्या ऊतींवर परिणाम करते. स्ट्रॉन्टियम-९० हाडे आणि दातांवर परिणाम करते, तर युरेनियम-२३५ फुफ्फुस, यकृत किंवा हाडांसाठी घातक ठरू शकते. या धोक्यांमुळेच स्पष्ट होते की किरणोत्सर्गाची अफवादेखील लोकांमध्ये भीती पासर्वू शकते. विशेषतः संघर्षाच्या क्षेत्रात.
सध्या तरी ही दोन्ही देशातील तणाव शांत झाल्याचे चित्र आहे. परंतु या घटनेवरून दक्षिण आशिया आण्विकभट्टीच्या किती जवळ आहे हे दिसून येते. या प्रदेशातील भूगोल, राजकारण आणि शस्त्रागारांमुळे कोणतीही चुकीची माहिती लाखो लोकांवर परिणाम करू शकते. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये किरणोत्सर्ग होण्याची शक्यता नाकारली आहे. मात्र, या अफवेमुळे पाकिस्तानातील किराना हिल्सकडे जग आता बारकाईने पाहिल, हे नक्की.