सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) अधिवेशन सुरू असताना खळबळ उडवून देणारी घटना घडली. मूळचा लखनौचा सागर शर्मा आणि म्हैसूरचा डी. मनोरंजन अशा दोघांनी संसदेच्या व्हिजिटर्स गॅलरीतून थेट सभागृहात उडी घेतली. त्यानंतर या दोघांनी सभागृहात पिवळा धूर पसरवला. या घटनेनंतर संसद भवन, तसेच खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. दरम्यान, सभागृह सुरू असताना घुसखोरी होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी ३० वर्षांपूर्वी साधारण चार महिन्यांच्या अंतराने अशा दोन घटना घडल्या होत्या. आताच्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता, ३० वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते? या प्रकरणात पडकडण्यात आलेल्यांना नेमकी काय शिक्षा झाली होती? हे जाणून घेऊ.

पहिली घटना- ५ मे १९९४

याआधी संसदेत ५ मे १९९४ रोजी अशीच घटना घडली होती. सभागृहाचे कामकाज सुरू असताना प्रेमपाल सिंह सम्राट नावाच्या एका व्यक्तीने व्हिजिटर्स गॅलरीतून थेट सभागृहाच्या दालनात उडी घेतली होती. त्यानंतर सभागृहात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची नोंद पार्लमेंट प्रिव्हिलेजेस : डायजेस्ट ऑफ केसेस (१९५०-२०००), खंड दुसरा यामध्ये करण्यात आलेली आहे. सभागृहाचे तत्कालीन उपसभापती मल्लिकार्जुनैया यांनी तेव्हा याबाबत माहिती दिली होती. लोकसभा सचिवालयाने २००१ साली ही माहिती संकलित केलेली आहे.

समज देऊन सोडण्यात यावे, असा ठराव

तत्कालीन उपसभापती मल्लिकार्जुनैया यांच्या म्हणण्यानुसार ही घटना ५ मे १९९४ रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी घडली होती. प्रेमपाल सिंह सम्राट या व्यक्तीने सभागृहात उडी घेतल्यानंतर त्याला तत्काळ सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीची चौकशी केली होती. सम्राट या व्यक्तीने त्याने केलेल्या कृत्याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे, असे तेव्हा मल्लिकार्जुनैया यांनी सभागृहाला सांगितले होते. तसेच तत्कालीन संसदीय कार्यमंत्री मुकुल वासनिक यांनी सभागृहात एक ठराव सादर केला होता. “प्रेमलाल सिंह या व्यक्तीने गंभीर गुन्हा केला आहे. त्याने सदनाचा अवमान केला आहे,” असे या ठरावात नमूद करण्यात आले होते. तसेच त्याला हा गुन्हा केल्यामुळे कठोर शब्दांत समज देऊन सोडण्यात यावे, असेही या ठरावात म्हटले होते.

दुसरी घटना- २४ ऑगस्ट १९९४

या पहिल्या घटनेनंतर साधारण चार महिन्यांनी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजून ६ मिनिटांनी अशीच आणखी एक घटना घडली होती. या घटनेत मोहन पाठक नावाच्या व्यक्तीने व्हिजिटर्स गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारली होती. विशेष म्हणजे सभागृहात उडी घेऊन या व्यक्तीने घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर लगेच मनमोहन सिंह तिवारी नावाच्या आणखी एका व्यक्तीने व्हिजिटर्स गॅलरीतून उडी घेतली होती. या व्यक्तीनेदेखील मोहन पाठकला साथ देत घोषणाबाजी केली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना तत्काळ अटक केली होती. या घटनेविषयी तत्कालीन उपसभापती मल्लिकार्जुनैया यांनी सभागृहाला माहिती दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलगिरी व्यक्त करण्यास नकार

सभागृहात उडी घेणाऱ्यांनी आपल्या कृत्याबद्दल भाष्य केले आहे; पण त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली नाही, असे त्यांनी सभागृहाला सांगितले होते. त्यानंतर तत्कालीन संसदीय कार्यमंत्री वासनिक यांनी सभागृहासमोर एक ठराव ठेवला होता. त्यात “पाठक आणि तिवारी या दोन व्यक्तींनी गंभीर गुन्हा केला असून, सभागृहाचा अवमान केला आहे. त्यांना २६ ऑगस्ट १९९४ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात यावी,” असा प्रस्ताव या ठरावात मांडण्यात आला होता. या ठरावानंतर अध्यक्षांनी तिहार येथील तुरुंगाच्या अधीक्षकांना तसे निर्देश दिले होते.