ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने शानदार विजयी सलामी दिली. पराभवाच्या गर्तेतून पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेचून आणलेला विजय हे या सलामीचे खास वैशिष्ट्य. विराट कोहलीने पुन्हा एकदा आपले महत्त्व सिद्ध करताना उत्कृष्ट खेळी केली. अर्शदीप सिंगने गोलंदाजीत चमक दाखवली, तर हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळ केला. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्याचा आढावा.

खेळपट्टी आणि परिस्थितीचा अचूक अभ्यास, तसेच नाणेफेकीचा कौल निर्णायक?

ऑस्ट्रेलियात विशेषतः मेलबर्नमध्ये शुक्रवारपर्यंत पावसाचे सावट होते. कधी मुसळधार, तर कधी रिमझिम यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट राहणार असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतली. रविवारी सामना सुरू झाला, तेव्हादेखील हवामान काहीसे ढगाळ होते. मेलबर्नच्या खेळपट्टीवर हिरवळ दिसून येत होती. त्यामुळे या ताज्या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार होता. हा कौल भारताच्या बाजूने पडला आणि रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू

अर्शदीप सिंगने पाकिस्तानी गोटात पसरवली चिंता?

रोहितने नवा चेंडू भुवनेश्वर आणि दुसऱ्या बाजूने अर्शदीपच्या हाती सोपवला. मोहम्मद शमी संघात असताना हा निर्णय जरा आश्चर्यकारक होता; पण अर्शदीपने कर्णधाराच्या हाकेला अचूक साद दिली. पहिल्याच चेंडूवर त्याने बाबर आझमला पायचीत केले. त्यानंतर मोहम्मद रिझवानला उसळत्या चेंडूवर मोहात पाडून बाद केले. पाकिस्तानच्या फलंदाजीचा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कणा राहिलेले फलंदाज चौथ्या षटकातच तंबूत परतल्याने पाकिस्तानी फलंदाजीवर दडपण आले ते निश्चितच निर्णायक ठरले.

हेही वाचा >>> IND vs PAK Highlight: किंग कोहली इज बॅक! भारत विरुद्ध पाकिस्तानच्या शेवटच्या षटकात ‘असा’ रंगला थरार

दोन्ही डावांतील १२व्या षटकाने दिले सामन्याला वळण?

पाकिस्तान आणि भारत दोघांच्याही डावातील १२वे षटक निर्णायक ठरले. भारतीय वेगवान गोलंदाज यशस्वी ठरत असताना रोहितने अचानक अक्षर पटेलचा वापर केला. अक्षरच्या हातात चेंडू सोपविला, तेव्हा ते १२वे षटक होते. या षटकात इफ्तिकार अहमदने स्वातंत्र्य घेतले आणि तीन षटकारांसह २१ धावा कुटल्या. या फटकेबाजीने पाकिस्तानच्या डावाने वेग घेतला. भारताच्या डावातही तेच झाले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताचे चार फलंदाज तंबूत परत पाठवले; पण १२वे षटक टाकण्याची वेळ जेव्हा मोहम्मद नवाजवर आली, तेव्हा हार्दिक पंड्या आणि विराट कोहली यांनी तीन षटकारांसह २० धावा कुटल्या. या षटकाने कोहली-पंड्याला आत्मविश्वास मिळाला आणि दोघांनी नंतर भारताच्या डावात विजयाचे रंग भरले.

हेही वाचा >>> IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवताच विराट कोहलीला झाले अश्रू अनावर

कोहलीला गवसलेला सूर ठरला निर्णायक…

आशिया चषकापासून विराट कोहलीला आपल्या फलंदाजीचा हरवलेला सूर गवसला होता. विश्वचषक स्पर्धेत कोहलीने तो कायम राखला. मेलबर्नच्या मोठ्या मैदानावर मोठ्या फटक्यांना आवर घालून कोहलीने एकेरी, दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. या दरम्यान हार्दिक पंड्याच्या तंदुरुस्तीची कसोटी लागली; पण त्याने कोहलीला सुरेख साथ दिली. या जोडीची शतकी भागीदारी आणि त्यातील कोहलीचा सिंहाचा वाटा महत्त्वाचा ठरला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोहली अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला.

हार्दिक का ठरतोय भारताचे राखीव अस्त्र?

तंदुरुस्तीशी झुंजणारा हार्दिक पंड्या ‘आयपीएल’मध्ये कर्णधार बनल्यापासून वेगळ्याच आत्मविश्वासाने खेळू लागला आहे. याचा प्रत्यय या सामन्यातही पुन्हा एकदा आला. पंड्या चार षटके पूर्ण टाकू शकणार का, अशी शंका उपस्थित केली जात होती; पण आशिया चषक स्पर्धेत त्याने या चर्चेला पूर्णविराम दिला. पाकिस्तानविरुद्धही त्याने उपयुक्त गोलंदाजी केली. अन्य गोलंदाजांपेक्षा त्याने खेळपट्टीवरील उसळीचा चांगला फायदा घेऊन पाकिस्तानी फलंदाजांना कोंडीत पकडले. महत्त्वाच्या क्षणी त्याने तीन फलंदाज गारद केले. त्यानंतर फलंदाजीत गरज असताना त्याने ३७ चेंडूंतील ४० धावांची जबाबदारीपूर्वक खेळी केली. या स्पर्धेत पंड्या भारतासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरणार याची एक झलकच या सामन्यात पाहायला मिळाली.

हेही वाचा >>>“माझ्या आयुष्यातील…” भारताच्या अभूतपूर्व विजयानंतर अनुष्का शर्माची विराटसाठी खास पोस्ट

अनुभवाची शिदोरी मोलाची?

भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंचा भरणा निर्णायक ठरू शकतो, असे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने बजावले होते. त्याची प्रचीती या सामन्याद्वारे मिळाली. सहाव्या षटकात ४ बाद ३१ अशा बिकट अवस्थेनंतरही विराट आणि हार्दिक या अनुभवी क्रिकेटपटूंच्या भागीदारीमुळे भारताचे आव्हान जिवंत राहिले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा विजयासाठी हव्या असताना आणि विराट कोहली नॉन-स्ट्रायकर एंडला असतानाही आर. अश्विन विचलित झाला नाही. त्याचे पुनरागमन हे भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकते. या विजयामुळे टॉनिक मिळालेल्या भारतीय संघाचे सलामीवीर रोहित आणि राहुल यांना सूर गवसला, तर भारतीय संघ अजिंक्य ठरू शकतो. विश्वचषकासारख्या सामन्यांमध्ये विद्यमान फॉर्मपेक्षा मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव निर्णायक ठरू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup india vs pakistan will virat kohli comeback beneficial for indian team print exp prd
First published on: 23-10-2022 at 20:10 IST