केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतीच महाराष्ट्रात तीन स्वच्छ रोप प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली आहे. स्वच्छ रोप प्रकल्प किंवा क्लीन प्लान्ट प्रोजेक्ट नेमका काय आहे, त्याचा शेतकऱ्यांना काय उपयोग होईल, या विषयी…
स्वच्छ रोप कार्यक्रम नेमका काय आहे?
शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होणारी साधनसामग्री आणि सर्व प्रकारची रोपे कीडमुक्त, रोगमुक्त स्वच्छ, सशक्त आणि दर्जेदार असावीत, हा या योजने मागील मूळ उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या स्वच्छ रोप कार्यक्रमाला (सीपीपी) मंजुरी दिली. त्यासाठी १७६५.६७ कोटी रुपयांची भरीव तरतूदही करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या कार्यक्रमाची घोषणा केली होती. हा कार्यक्रम देशभरातील फळपिकांचा दर्जा आणि उत्पादकता वाढवण्याच्या दिशेने एक मोठी झेप ठरेल, असा आशावाद व्यक्त केला होता.
स्वच्छ रोप कार्यक्रमाचे फायदे काय?
शेतकऱ्यांना स्वच्छ रोप कार्यक्रमाच्या माध्यमातून विषाणूमुक्त, कीडमुक्त, रोगमुक्त, बुरशीमुक्त लागवड, पेरणी सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. त्याद्वारे उच्च दर्जाची रोपे निर्माण होतील. प्रामुख्याने रोपवाटिकांना मदत करण्यात येईल. त्यासाठी प्रमाणीकरण प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांचे पाठबळ रोपवाटिकांना देण्यात येईल. स्वच्छ पेरणी, लागवड सामग्रीचा कार्यक्षम पद्धतीने प्रसार करण्यात येईल. त्याचा परिणाम म्हणून लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना, ग्राहक विषाणूमुक्त असलेल्या उच्च दर्जाच्या, उत्तम चवीच्या, चांगले दिसणाऱ्या आणि पोषणमूल्ये असलेल्या फळांचे, अन्नधान्य, भाजीपाल्यांचे उत्पादन होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना मिळेल. तसेच उच्च-गुणवत्तेच्या, रोगमुक्त फळांचे उत्पादन करून, भारतातून निर्यात वृद्धीला चालना मिळेल आणि भारत एक अग्रगण्य जागतिक निर्यातदार म्हणून आपले स्थान मजबूत करेल. आंतरराष्ट्रीय फळ व्यापारात भारताचा वाटा वाढेल.
हवामान बदलानुकूल रोप निर्मिती होईल?
स्वच्छ रोप कार्यक्रमातून निर्माण होणारी रोपे सर्व शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची जमीनधारणा किंवा सामाजिक, आर्थिक दर्जा विचारात न घेता स्वच्छ रोपे आणि सामग्री परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनात आणि अंमलबजावणीमध्ये महिला शेतकऱ्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येणार आहे. महिलांना साधनसामग्री, प्रशिक्षण दिले जाणार आहे. अति तापमान, अति थंडी, दुष्काळ, अतिवृष्टी सारख्या टोकाच्या हवामान बदलांना अनुकूल रोपांची निर्मिती करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. भारतातील विविधतापूर्ण कृषी – हवामानाच्या स्थितीला आणि समस्येला अनुकूल स्वच्छ रोपांची वाणे आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय फायदा?
महाराष्ट्रात ३०० कोटी रुपये खर्चून द्राक्षासाठी पुण्यात, संत्र्यासाठी नागपूरमध्ये आणि डाळिंबासाठी सोलापूरमध्ये तीन स्वच्छ रोप प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. महाराष्ट्र हे देशाचे फलोत्पादन केंद्र म्हणून उदयाला आले आहे. द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी, पपई आणि चिकूसह विविध भाज्यांचे दर्जेदार उत्पादन राज्यात होते. पण, या फळांच्या, भाजीपाल्याच्या लागवडीसाठी मिळणारी रोपे रोगमुक्त, उत्पादनक्षम आणि दर्जेदार असतात की नाही याची शेतकऱ्यांना शाश्वती नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे मिळावीत यासाठी स्वच्छ रोप कार्यक्रम महत्त्वाचा आहे. या प्रकल्पांसोबतच, अत्याधुनिक रोपवाटिकाही तयार केल्या जाणार आहेत. त्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना आठ कोटी रोगमुक्त रोपे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. हा कार्यक्रम राबवण्यासाठी इस्रायल आणि नेदरलँड्ससारख्या देशांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
dattatray.jadhav@expressindia.com