खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या मागावर पंजाब पोलीस आहेत. मागच्या १२ दिवसांपासून अमृतपाल सिंगचा पोलिसांशी लंपडाव सुरू आहे. अशातच अमृतपालने एक व्हिडीओ प्रसारित करून काही मागण्या मांडल्या आहेत. अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी बैसाखीच्या दिवशी (दि. १४ एप्रिल) तलवंडी साबो येथील तख्त श्री दमदम साहिब येथे ‘सरबत खालसा’ सभा बोलवावी, असे आवाहन अमृतपालने केले आहे. १८ मार्चपासून अमृतपाल सिंग फरार आहे, त्याला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस त्याच्या मागावर आहेत. यानिमित्ताने सरबत खालसा म्हणजे काय? या सभेतून अमृतपाल सिंगला काय साध्य करायचे आहे? तसेच ही सभा आयोजित करण्यासाठी बैसाखीचा दिवस का निवडला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सरबत खालसा म्हणजे काय?

सरबत या शब्दाचा अर्थ होतो ‘सर्व’ आणि खालसा म्हणजे शीख समुदाय. सरबत खालसाचा अर्थ होतो, ‘शीख समुदायातील सर्व जण’. शीख समुदायाला एकत्र करण्याची ही पद्धत १८ व्या शतकात सुरू करण्यात आली होती. या संकल्पनेमागे मोठा इतिहास आहे. शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर शीख मिस्ल (सैन्याची तुकडी) यांनी शीख समुदायातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विषयांची चर्चा करण्यासाठी सरबत खालसा या सभेची सुरुवात केली होती. मुघलांशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या सभांचे आयोजन करण्यात येत होते.

west bengal teacher recruitment scam in marathi
विश्लेषण: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा नेमका काय? शिक्षकांवरच वेतन परत करण्याची वेळ का आली?
Health Insurance Plans For Senior Citizens
विश्लेषण : ज्येष्ठांनाही आता आरोग्य विम्याचे कवच?
loksatta analysis heavy obligations reason behind elon musk delaying tesla in india
विश्लेषण: टेस्लाचे भारत आगमन लांबणीवर? ‘ईव्ही वॉर’मध्ये टाटा-महिंद्रासमोर किती संधी?
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?

सरबत खालसाचे आयोजन वर्षातून दोनदा बैसाखी आणि दिवाळीच्या वेळेस केले जात असे. मानव रूपातील गुरूची परंपरा संपुष्टात आल्यानंतर सरबत खालसा ही पहिली संस्था होती, जिने शिखांना एक दिशा देण्याचे काम केले. मिस्लांमध्ये आपापसात होणारे संघर्ष थांबविण्यासाठी सरबत खालसाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला शिखांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार हेन्री प्रिन्सेप यांनी सरबत खालसाचे वर्णन करताना लिहिले की, अनेक शीख मिस्ल आपसातले वाद बाजूला ठेवून या सरबत खालसा सभेत एकत्र बसून चर्चा करत असत.

हे वाचा >> अमृतपाल सिंगचा नवा ऑडिओ समोर, आत्मसमर्पण करण्याबाबत केली भूमिका स्पष्ट; म्हणाला…

खालसा लष्कराचे कमांडर बाबा बंदा सिंग बहादुर यांची १७१६ मध्ये मुघलांनी हत्या केली. या हत्येनंतर शिखांनी गनिमीकाव्याच्या माध्यमातून मुघलांना जेरीस आणले. ज्यामुळे मुघलांनी अखेर शिखांवरील हल्ले थांबविले. लाहोर येथील मुघल सरदार झाकरिया खान यांनी शिखांना नवाब हे पद देण्याचा प्रस्ताव देऊन हा संघर्ष थांबविण्याचा प्रयत्न केला. सरबत खालसाच्या सभेत मुघलांच्या या प्रस्तावाबाबत विचारविनिमय करण्यात आला. अनेक शीख या प्रस्तावाच्या विरोधात होते, मात्र सरबत खालसामध्ये विचारविमर्श झाल्यानंतर अखेर मुघलांचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

प्रस्ताव स्वीकारल्यानंतर एखाद्या सैन्यातील मोठ्या नेत्याकडे पद देण्यापेक्षा तटस्थ व्यक्तिमत्त्व कपूर सिंग यांना हे पद देण्यात आले. यातून झाकरिया खान यांना संदेश द्यायचा होता की, नवाब पद हे शिखांसाठी फार महत्त्वाचे नाही. नवाब कपूर सिंग यांनी मात्र स्वतःला या पदासाठी पात्र असल्याचे सिद्ध केले. त्यांनी अनेक शीख गटांना एकत्र करून खालसा दलाची स्थापना केली. पुढे सरबत खालसाने सरदार जस्सा सिंग यांची खालसा दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली.

१७९९ साली महाराज रणजीत सिंह यांनी शीख राज्याची स्थापना करून शीख मिस्लची पद्धत संपुष्टात आणली. त्यामुळे सरबत खालसासारख्या प्रथेची गरज शीख राज्याला उरली नसल्यामुळे त्यातही खंड पडला. शीख राज्याच्या स्थापनेमुळे शीख समुदाय पहिल्यांदाच स्वातंत्र्याचा आनंद घेत होता. ज्यामुळे शिखांचे अनेक प्रश्न सुटले. २० व्या शतकात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची (Shiromani Gurdwara Parbandhak Committee – SGPC) स्थापना करून सरबत खालसासारख्या यंत्रणेची पोकळी भरून काढण्यात आली. अनेक वर्षांपासून एसजीपीसी ही शीख समुदायाशी संबंधित अनेक विषयांवर समन्वयाद्वारे निर्णय घेत आली आहे. या समितीला शीख समुदायानेदेखील स्वीकारले.

हे वाचा >> अमृतपाल हरेलच, पंजाब जिंकला पाहिजे!

मागच्या शतकात कितीवेळा सरबत खालसाच्या सभा झाल्या?

१९२० मध्ये, गुरुद्वारांचे नियंत्रण करण्यासाठी सरबत खालसाची सभा बोलाविण्यात आली होती, त्यानंतर एसजीपीसी समितीचा जन्म झाला. त्यानंतर १९८४ मध्ये सुवर्णमंदिरात लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा सरबत खालसाची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी झालेल्या सभेत एसजीपीसी आणि इतर महत्त्वाच्या संघटनांनी या बैठकीत सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. २६ जानेवारी १९८६ रोजी एसजीपीसी वगळता इतर शीख संघटनांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्यामध्ये कट्टरपंथीयांनी अकाल तख्तची कार सेवा करण्यावर चर्चा केली. इंदिरा गांधी यांनी राबविलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमुळे अकाल तख्त म्हणजेच सुवर्णमंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने निधी देण्याचे मान्य केले होते. मात्र शीख कट्टरपंथीयांनी सरकारची मदत न घेता कार सेवा करून सुवर्णमंदिर पुन्हा उभे करण्याचा निर्णय घेतला. तसेच या बैठकीत खलिस्तान या संघटनेचा जन्म झाला, शिखांचे भवितव्य ठरविण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.

शिरोमणी अकाली दल (बादल) यांनी १० नोव्हेंबर २०१५ रोजी सरबत खालसा सभा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र शीख समुदायाने हा प्रस्ताव फेटाळून लावला.