भांडवली बाजारात ‘टी+०’ व्यवहार प्रणालीकडे संक्रमणाचा म्हणजेच व्यवहार झाल्याच्या त्याच दिवशी हिशेबपूर्तीच्या (सेटलमेंट) गतिमान पर्यायाची अंमलबजावणी गुरुवार, २८ मार्चपासून सुरू झाली. प्रायोगिक तत्त्वावर केवळ २५ कंपन्यांच्या समभागांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. ‘टी+०’ व्यवहार प्रणाली कशी असेल आणि ती स्वीकार केल्याने नेमका काय फायदा होणार आहे हे जाणून घेऊया.

‘टी+०’ प्रणाली म्हणजे काय?

भांडवली बाजारात सध्या टी + १ अर्थात एक कामकाज दिवसाचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे. म्हणजेच समभाग खरेदी केले तर एक कामकाज दिवसानंतर ते ‘डिमॅट’ खात्यात जमा केले जातात आणि समभाग विकले असतील तर व्यवहार केल्याच्या दुसऱ्या दिवशी रोख रक्कम खात्यात जमा होते. आता ‘टी+०’ मुळे या सर्व प्रक्रियेतील एक दिवस कमी झाला आहे. मात्र अद्याप ‘टी+०’ व्यवहार प्रणाली सर्व समभागांसाठी लागू करण्यात आलेली नाही. देशात १९९६ पासून डी-मॅट खात्याची सुविधा सुरू झाली, त्यावेळी ‘टी +५’ व्यवहार प्रणाली अस्तित्वात आली. एप्रिल २००२ पासून ‘टी+३’ आणि एप्रिल २००३ पासून ‘टी +२’ ही पद्धत आणण्यात आली. तर २७ जानेवारी २०२३ पासून ‘टी+१’ प्रणाली लागू करण्यात आली होती. सुमारे २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधींनतर आता ‘टी+१’ व्यवहार प्रणाली लागू आहे. मात्र लवकरच आता सर्व कंपन्यांच्या समभागांच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी ‘टी+०’ व्यवहार प्रणाली लागू केली जाईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ‘बीटा व्हर्जन’ लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?

‘टी+०’ प्रणालीची अंमलबजावणी आपल्याकडे कशी सुरू झाली?

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने समभाग खरेदी-विक्री व्यवहार झाल्याच्या त्याच दिवशी समभाग खरेदी करणाऱ्याच्या डिमॅट खात्यात समभाग तर ते विक्री करणाऱ्याच्या ट्रेडिंग खात्यात त्याच दिवशी पैसे जमा होणार आहे. सध्या ठराविक वेळेतच आणि ठराविक दलालांच्या (ब्रोकर) माध्यमातून हे व्यवहार पार पडणार आहेत. ठराविक कंपन्यांच्या समभागांमध्ये ही प्रणाली लागू झाल्याने अजूनही उर्वरित समभागांसाठी ‘टी+१’ प्रणाली लागू आहे. त्यामध्ये ‘सेबी’ने समभाग खरेदी-विक्री व्यवहार झाला तो दिवस अधिक एका (टी १) दिवसात विकलेल्या समभागांची रोख रक्कम बँक खात्यात अथवा खरेदी केलेले समभाग डिमॅट खात्यात जमा होऊन हिशेबाच्या पूर्ततेच्या पद्धतीचा पर्याय मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेतला होता. त्याची २५ फेब्रुवारी २०२२ पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला तळातील १०० कंपन्यांसाठी सर्वप्रथम ही पद्धत लागू करण्यात आली. त्यांनतर २५ मार्च २०२२ पासून टप्प्याटप्प्याने तळातील ५०० कंपन्यांना ‘टी+१’ पद्धत लागू झाली. त्यापुढील दर महिन्याला अजून ५०० कंपन्यांना या पद्धतीखाली आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या सर्व समभागांसाठी ‘टी+१’ व्यवहार प्रणाली लागू करण्यात आली.

‘टी+०’ प्रणाली सध्या कोणत्या समभागांसाठी?

अंबुजा सिमेंट, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, बिर्लासॉफ्ट, सिप्ला, कोफोर्ज, डिव्हिज लॅब, हिंदाल्को इंडस्ट्रीज, द इंडियन हॉटेल्स कंपनी, जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स, एलटीआयमाईंडट्री, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, एमआरएफ, नेस्ले इंडिया, एनएमडीसी, ओएनजीसी, पेट्रोनेट एलएनजी, स्टेट बँक, टाटा कम्युनिकेशन, ट्रेंट, युनियन बँक आणि वेदांत या कंपन्यांसाठी ‘टी+०’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. सकाळी ९.१५ मिनिटे ते दुपारी १.३० मिनिटांपर्यंत हे व्यवहार पार पडतील आणि दुपारी ४.३० पर्यंत व्यवहारपूर्ती केली जाईल. म्हणजेच समभाग खरेदी करणाऱ्याच्या खात्यात समभाग आणि ते विक्री करणाऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील. मात्र दुपारी १.३० नंतर वरील २५ कंपन्यांच्या समभागात व्यवहार केल्यास ‘टी+१’ प्रणालीच लागू होईल. सध्या सर्व गुंतवणूकदार ‘टी+१’ प्रणालीचा वापर करून व्यवहार करण्यास पात्र असतील.

हेही वाचा : वंचितच्या निर्णयाने लाभ कुणाला? फटका कुणाला? लोकसभा निवडणुकीत समीकरणे बदलणार?

जागतिक भांडवली बाजारातील स्थिती काय?

भारतीय भांडवली बाजारात सध्या ‘टी+१’ प्रणाली कामकाज दिवसांचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे. लवकरच सर्व समभागांसाठी ‘टी+०’ प्रणाली लागू होईल. चीनच्या भांडवली बाजारानंतर ‘टी+०’ व्यवहार प्रणालीची अंमलबजावणी करणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे. २००१ पर्यंत, भारतीय भांडवली बाजारात साप्ताहिक व्यवहार प्रणाली होती. त्यानंतर बाजारात टी + ३ व्यवहार प्रणाली लागू करण्यात आली. पुढे २००३ मध्ये टी + २ व्यवहार प्रणालीवर संक्रमण आले. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांच्या विरोधाला न जुमानता टी + १ व्यवहार प्रणाली लागू करण्यात आली. अमेरिका, ब्रिटन आणि युरोझोनमधील भांडवली बाजारांनी अद्याप टी + १ प्रणालीचा स्वीकार केलेला नाही. अमेरिका लवकरच टी + २ प्रणालीकडून टी + १ प्रणालीकडे मार्गक्रमण करणार आहे.

टी + ० व्यवहार प्रणालीचे फायदे काय?

टी + ० प्रणालीमध्ये, एखाद्या गुंतवणूकदाराने शेअर विकल्यास, त्याला त्याच दिवशी त्याच्या ट्रेडिंग खात्यात पैसे मिळतील आणि खरेदीदाराच्या डिमॅट खात्यात व्यवहार केल्याच्या दिवशी शेअर जमा होतील. भारतीय भांडवली बाजारासाठी तरलतेच्या दृष्टिकोनातून अंमलात आणण्यात आलेली कमी अवधीची व्यवहार प्रणाली फायदेशीर आहे. काही तासांच्या आत व्यवहार पूर्ण होत असल्याने भारतीय भांडवली बाजाराने डिजिटल क्षेत्रात किती आघाडी घेतली आहे, हे लक्षात येते.

हेही वाचा : फूड ब्लॉगर नताशा डिड्डींना होता डंपिंग सिंड्रोम; काय असतो ‘हा’ आजार

गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा कोणता?

भांडवली बाजार नियामक म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) दिलेल्या माहितीनुसार, टी + ० व्यवहार प्रणाली केवळ कालमर्यादाच कमी करत नाही तर व्यवहार जोखीमदेखील कमी करते. कारण जलद व्यवहार होत असल्याने व्यवहार करण्यासाठी आवश्यक भांडवल कमी करून ते लवकर मोकळे होण्यास मदत होते. म्हणजेच व्यवहार करताना जोखीम कमी करण्यासाठी घेतलेले मार्जिन मनी लवकर मोकळे होत असल्याने पुढील व्यवहारासाठी उपलब्ध होते. अशा प्रकारे, सध्याच्या डिजिटल आणि जलद झालेल्या युगात, लहान व्यवहार प्रणाली चक्र जोखीम कमी करण्यात मदत करते.

gaurav.muthe@expressindia.com