पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ६ व ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामावर एकमत झाले असले तरी मागील काही दिवसांत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सैन्यदलांनी पत्रकार परिषद घेऊन या ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सैन्यदलांनी अनेक खुलासे केले. त्यात ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय हवाई दलाने (आयएएफ) कराचीतील मालीर छावणीवर हल्ला केल्याचीही माहिती दिली.
भारतीय हवाई दलाचे ऑपरेशन्स महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी रविवारी संध्याकाळी या ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली. “आम्ही काळजीपूर्वक लक्ष्यांची निवड केली. भारतीय हवाई दलाला निवड केलेल्या नऊपैकी विशेषतः बहावलपूर व मुरीदके येथील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य करण्याचे काम देण्यात आले होते,” असे भारती म्हणाले. मालीर छावणी काय आहे? भारताकडून या छावणीला लक्ष्य का करण्यात आले? त्याविषयी जाणून घेऊ…

मालीर छावणी काय आहे?
‘एनडीटीव्ही’नुसार, मालीर छावणी हा सिंध प्रांतातील एक भक्कम तटबंदी असलेला लष्करी तळ आहे. हा तळ कराचीपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. ‘मिलिटरी-हिस्ट्री.फँडम.कॉम’नुसार, १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने याला छावणी (कॅन्टोन्मेंट) म्हणून घोषित केले. पाकिस्तानी सैन्याने १९४७ मध्ये हा तळ आपल्या ताब्यात घेतला. ‘लॅटलॉन्ग.नेट’नुसार, ११ ऑक्टोबर १९४८ रोजी याला तळ म्हणून स्थापित करण्यात आले. मालीर छावणी शाह फैसल शहराच्या पूर्वेस आठ किलोमीटर आणि जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेस सात किलोमीटर अंतरावर आहे.
पाकिस्तानसाठी हा तळ महत्त्वाचा आहे. कारण- त्यात अनेक प्रमुख लष्करी पायाभूत सुविधा आहेत. हा तळ कराचीमधील सर्वांत प्रशस्त ठिकाणांपैकी एक आहे. मालीर छावणी १२ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरली आहे. या तळात छावणी बाजार क्षेत्र, संरक्षण अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माण योजना l & ll, सैन्य अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माण योजना अस्कारी-५, पीएएफ फाल्कन कॉम्प्लेक्स, त्यासह जवळजवळ ७० खासगी गृहनिर्माण योजना आहेत.
१,३९,००० लोकवस्ती असलेल्या या तळाचे व्यवस्थापन पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘कॅन्टोनमेंट बोर्ड मालीर’द्वारे केले जाते. या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या लोकांमध्ये बहुतांश लोक लष्करात सेवा देणारे, माजी सशस्त्र दलातील कर्मचारी आहेत. मुख्य म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांचा अंत्यसंस्कार मालीर छावणीच्या पोलो ग्राउंडवर करण्यात आला होता. त्यांना कराचीतील लष्करी स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते.
या छावणीला लक्ष्य करण्यामागे भारताचा उद्देश काय?
मालीर छावणीवरील हल्ला हा पाकिस्तानमधील दहशतवादी साखळीला कमकुवत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग होता. ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “पाकिस्तानातून होणाऱ्या ड्रोन, क्षेपणास्त्र व सीमापार आक्रमणाच्या पद्धतीला लष्करी प्रत्युत्तर म्हणून केलेली ही प्रत्येक कारवाई होती.” ते पुढे म्हणाले की, आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे; पाकिस्तानी सैन्य किंवा नागरिकांशी नाही.

ए. के. भारती म्हणाले, “आमची लढाई दहशतवादाविरुद्ध होती आणि ७ मे रोजी आम्ही फक्त दहशतवादी केंद्रांवर हल्ला केला; परंतु पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन, त्याचे स्वतःच्या लढाईत रूपांतर केले.” ‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाच्या लक्ष्यांमध्ये चकलाला, रफिक व रहीम यार खान येथील हवाई तळांचा समावेश होता. त्यानंतर सरगोधा, भुलारी व जैकबाबादवर हल्ले करण्यात आले. ए. के. भारती यांनी माहिती दिली, “या मोहिमेमुळे दहशतवादी धोक्यांना निष्प्रभ करण्यात यश आले.” ‘द न्यूज मिनिट’नुसार, ए. के. भारती म्हणाले की, भारतीय हवाई दलाने लाहोरजवळील एक रडार साइटदेखील नष्ट केली.
भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवालाजवळ दुसरे रडारदेखील नष्ट केले. ए. के. भारती यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले, “या ऑपरेशनद्वारे आमची सर्व उद्दिष्टे साध्य केली आहेत आणि सर्व वैमानिक घरी परतले आहेत.” त्यांनी माहिती दिली. “भारतीय हवाई दलाने काही पाकिस्तानी विमाने पाडली आहेत. आमच्याकडे कोणतेही अवशेष नाहीत; परंतु निश्चितपणे आम्ही काही पाकिस्तानी विमाने पाडली आहेत.” ते म्हणाले, “पहलगाम या ठिकाणी २६ निरपराध पर्यटकांना ठार केल्यानंतर आम्हाला उत्तर देणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले.”
त्यांना किती दहशतवादी मारले? हे विचारले असता, आमचे काम हे दिलेल्या टार्गेटवर लक्ष्यभेद करणे होते बॉडी बॅग्ज मोजणे नाही, असेही ते म्हणाले. लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक राजीव घई म्हणाले, “मी सीमा सुरक्षा दलाचेही कौतुक करू इच्छितो. त्यांनी सशस्त्र प्रतिसादात सामील होत महत्त्वाची भूमिका बजावली.” ते पुढे म्हणाले, “तिन्ही सेवांमध्ये पूर्ण समन्वय आहे आणि आम्हाला केवळ सरकारी संस्थांनीच नव्हे, तर १४० कोटी लोकांचाही पाठिंबा आहे.” ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देताना एअर मार्शल ए. के. भारती यांनी दोन्ही देशांमधील संघर्षादरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यातील ३५ ते ४० जवान मारले गेल्याचीही माहिती दिली.