Celebi Aviation भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कियेविरोधातदेखील भारत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात तुर्कियेतील शस्त्र आढळून आल्यानंतर आणि तुर्कियेने पाकिस्तानला खुला पाठिंबा जाहीर केल्यानंतर तुर्कियेच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्यात यावा ही मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावरदेखील बॉयकॉट टुरिझम हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर लगेचच तुर्कियेने पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याचे वृत्त समोर आले.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धबंदी आणि सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबवण्यास सहमती दर्शविली आहे, मात्र असे असले तरीही भारतीयांमध्ये अजूनही संतापाची लाट दिसून येत आहे. याच्याच परिणामस्वरूपी केंद्र सरकारने गुरुवारी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसह प्रमुख भारतीय विमानतळांवर सुरक्षा कार्ये हाताळणाऱ्या सेलेबी एव्हिएशन या तुर्किये कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली. याचा नेमका अर्थ काय? काय आहे सेलेबी एव्हिएशन? करार रद्द केल्याचा तुर्कियेला कसा फटका बसेल? त्याविषयी जाणून घेऊयात.
काय आहे सेलेबी एव्हिएशन?
सेलेबी एव्हिएशन होल्डिंग ही मूळ तुर्कियेची कंपनी आहे. ही कंपनी विमान वाहतूक उद्योगात ग्राउंड हँडलिंग सेवा प्रदान करते. १९५८ मध्ये स्थापन झालेली सेलेबी एव्हिएशन ही तुर्कीची पहिली खाजगी मालकीची ग्राउंड हँडलिंग फर्म आहे. गेल्या काही वर्षांत या कंपनीचा विस्तार झाला आहे. या कंपनीचे कार्य तीन खंडांमधील सहा देशांमध्ये आणि जगभरातील तब्बल ७० विमानतळांवर पसरले आहे. ही कंपनी १५,००० हून अधिक लोकांना रोजगार प्रदान करते. सेलेबीने जागतिक दर्जाच्या ग्राउंड हँडलिंग आणि कार्गो सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने भारताच्या बाजारात प्रवेश केला. या कंपनीने दोन संस्था स्थापन केल्या आहेत. एक म्हणजे सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया, ही ग्राउंड हँडलिंग सेवा प्रदान करते आणि सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया, ही दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो हँडलिंग सेवा पुरवते.

२००७ पासून भारतात कार्यरत असलेल्या सेलेबीजने भारतात आपले कार्य लक्षणीयरीत्या वाढवले आहे. ही कंपनी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, गोवा, कोचीन आणि कन्नूर यांसह नऊ प्रमुख भारतीय विमानतळांवर काम करते. या विमानतळांवर, सेलेबी कंपनीकडून दरवर्षी तब्बल ५८,००० हून अधिक उड्डाणे आणि ५,४०,००० टन कार्गो विमान हाताळण्यात येते. तसेच कंपनीचे सुमारे ७,८०० कर्मचारी या विमानतळांवर कार्यरत आहेत. ‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, सेलेबी एव्हिएशन होल्डिंग्ज त्यांच्या व्यवसायापैकी जवळजवळ ७५ टक्के व्यवसाय आंतरराष्ट्रीय उड्डाणातून करते, तर उर्वरित २५ टक्के व्यवसाय इंडिगो, एअर इंडियासह इतर अनेक भारतीय विमान कंपन्यांकडे आहे.
सेलेबी एव्हिएशनची चौकशी करण्याचे कारण काय?
सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस ही कंपनी तुर्कियेची असल्याने वादात सापडली होती. भारताचे तुर्कियेशी ताणलेल्या संबंधांमुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील ठरला. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा आता प्रमुख चिंतेचा विषय आहे आणि त्याचमुळे भारतीय विमानतळांवर सुरक्षा कार्ये हाताळण्यात कंपनीची भूमिका गंभीरपणे चर्चेत आली होती. आतापर्यंत कंपनीने ग्राउंड हँडलिंग, कार्गो लॉजिस्टिक्स आणि एअरसाइड सेवा हातळल्या, त्यामध्ये प्रतिबंधित विमानतळ झोनमध्ये प्रवेश, विमानांशी थेट संपर्क आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणामधील सामान व् कार्गो हाताळणे समाविष्ट होते.
कंपनी आणि पाकिस्तानद्वारे वापरल्या जाणाऱ्या तुर्किये ड्रोनमधील कथित संबंधांमुळे अस्वस्थता वाढली आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. संरक्षण विश्लेषक अभिजित अय्यर यांनी ‘न्यूज १८’ला माहिती दिली. त्यात म्हटले, “हे प्रकरण दिसते त्यापेक्षा खूपच गंभीर आहे. आम्हाला संशय आहे की, या कंपनीचा सुमारे १० टक्के वाटा रेसेप तय्यिप एर्दोगान यांची मुलगी सुमेये एर्दोगान यांच्या मालकीचा आहे. सुमेये एर्दोगान यांचा विवाह सेलचुक बायरक्तारशी झाला आहे. सेलचुक बायरक्तार पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरलेले बायरक्तार ड्रोन तयार करतो. दिल्लीतील सेलेबी टर्मिनल व्हीव्हीआयपी तांत्रिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करते, जिथे इलेक्ट्रॉनिक गुप्तचर विमाने तैनात असतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हीआयपी विमानाचाही समावेश आहे, त्यामुळे मला हे स्पष्ट करण्याची गरज नाही की, हे किती चिंताजनक आहे,” असे ते म्हणाले. या कथित संबंधांमुळे तज्ज्ञ आणि माजी सुरक्षा सचिवांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करत चिंता दर्शवली होती. अनेकांनी या कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणीदेखील केली होती. अखेर, गुरुवारी भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तुर्किये कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली.

सेलेबी एव्हिएशनला मुंबई विमानतळ सोडण्याचे आदेश
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कंपनीच्या कामकाजावर राजकीय दबाव वाढत आहे. सोमवारी शिवसेना नेते, मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) ला सेलेबी एनएएस विमानतळ सेवांशी असलेले संबंध संपुष्टात आणण्याची मागणी केली. तुर्किये येथील ही कंपनी सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास ७० टक्के कामकाज हाताळते. मुरजी पटेल यांनी एमआयएएलला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे आणि जर करार रद्द केला नाही तर निषेध नोंदवला जाईल असा इशाराही दिला आहे. त्यांनी म्हटले, “तुर्किये थेट शस्त्रांचा वापर करत नसेल, परंतु आपल्या सीमांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचा पुरवठा करणे हे कृत्यदेखील शत्रुत्वाच्या कृत्यापेक्षा कमी नाही.” त्यांनी पुढे म्हटले, “आपल्या शत्रूला पाठिंबा देणाऱ्या देशाला भारतीय पायाभूत सुविधांद्वारे पैसे कमविण्याची परवानगी आपण देऊ शकत नाही.”
कंपनीची प्रतिक्रिया
भारतातील फर्मच्या ग्राउंड हँडलिंग ऑपरेशन्सचे सीईओ तौसीफ खान यांनी कंपनीवरील आरोप आणि त्याच्या मालकीविषयी केलेले दावे फेटाळून लावले. “भारतातील आमचा व्यवसाय खरोखरच भारतीय व्यवसाय आहे आणि त्याचे नेतृत्व आणि व्यवस्थापन भारतीय नागरिक करतात. आमची संपूर्ण गुंतवणूक एफडीआय नियमांनुसार परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मंजुरीद्वारे केली गेली होती आणि मंडळाचे कोणतेही संचालक तुर्कियेचे नागरिक नाहीत. आम्हाला भारतातील संबंधित नियामक संस्थांनी सुरक्षा मंजुरी दिली आहे,” असे खान यांनी एमआयएएलला लिहिलेल्या पत्रात म्हटले.
कंपनीने एक अधिकृत निवेदन जारी करत म्हटले, “कंपनीच्या मूळ संस्थेमध्ये सुमेये नावाच्या कोणाचीही शेअरहोल्डिंग नाही. कंपनीची मालकी ही सेलेबिओग्लू कुटुंबातील सदस्य कॅन सेलेबिओग्लू आणि कॅनन सेलेबिओग्लू यांच्यापुरती मर्यादित आहे. आम्ही व्यावसायिकपणे चालवली जाणारी, जागतिक स्तरावरील एव्हिएशन सेवा कंपनी आहोत,” असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.