आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्याने मागणी वाढत असल्याने तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सर्वोत्कृष्ट दर्जाच्या तुरीने १२ हजारांच्या दराचा टप्पा ओलांडला आहे. तुरीच्या दरवाढीसोबतच तूर डाळीच्या दरातदेखील मोठी वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारपेठेत कोरी तूरडाळ १७५ ते १८५ रुपये, तर पॉलिश्ड तूरडाळ १६० ते १७० रुपये किलो दराने विकली जात आहे. आणखी काही महिने तुरीच्या दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तुरीचे एवढे दर वाढण्यामागेची अनेक कारणे आहेत. ती कोणती, याचा आढावा.

विक्रमी भाव कधीपर्यंत मिळणार?

तुरीच्या दरात यंदा सुरुवातीपासूनच चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीला मागणी वाढताच सातत्याने तुरीच्या दरात वाढ होत आहे. गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा तूर पिकाला मोठा फटका बसला. परतीच्या मुसळधार पावसामुळेदेखील तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. संपूर्ण देशात हे सार्वत्रिक चित्र आहे. बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली, तर मागणी वाढली. विदेशातून देखील तुरीची आयात कमी झाली. त्यामुळे तुरीचे भाव नवनवीन विक्रम गाठत आहेत. आणखी काही महिने ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

सध्या आवकची स्थिती काय?

तुरीचे भाव सध्या कडाडले आहेत. अकोला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला विक्रमी दर प्राप्त होत असल्याने येथे मोठी आवक सुरू आहे. आजू-बाजूच्या जिल्ह्यातूनदेखील शेतकरी येथे तूर विक्रीसाठी आणतात. सध्या शेतकऱ्यांकडे तूर उपलब्ध नाही. शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केलेली नाही. तुरीचे संपूर्ण उत्पादन सुरुवातीलाच विकले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक प्रचंड प्रमाणात घटली. तुलनेत मागणी वाढल्याने तुरीची सातत्याने दरवाढ होत आहे.

दरवाढीचा नेमका फायदा कुणाला?

या दरवाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात उत्पादित झालेली तूर विक्री करून शेतकरी मोकळे झाले. बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा नसते. शिवाय, पैशांचीदेखील गरज असतेच. त्यामुळे शेतातून उत्पादन येताच त्याची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. सुरुवातीला आवक मोठ्या प्रमाणात राहत असल्याने उत्पादनाचे भाव कमी असतात. शेतकऱ्यांकडून त्याची खरेदी करून साठवणूक करण्याकडे व्यापारी भर देतात. भाव वाढ झाल्यानंतर त्याची विक्री केली जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुरीच्या भाववाढीला लाभ साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांना होत आहे.

नवीन तूर केव्हा येणार?

तुरीचे नवीन उत्पादन बाजारपेठेत येण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. दुसरीकडे मागणीत मोठी वाढ होताना दिसते. त्यामुळे नवीन तूर बाजारपेठेत येईपर्यंत तरी तुरीचे भाव नवनवीन विक्रमच गाठण्याची चिन्हे आहेत. त्यातच यंदा देखील अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे उत्पादन घटण्याचा धोका आहे. परिणामी, आगामी काळातही तुरीच्या भावात अस्थिरता कायम राहू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीचा फटका बसणार?

खरीप हंगामात मोसमी पाऊस येण्यास उशीर झाला. त्यामुळे पेरण्या रखडल्या. कपाशीची क्षेत्रवाढ झाली. पर्यायाने सोयाबीनमध्ये आंतरपीक असलेले तुरीचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसला. आता पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने त्याचा परिणाम तूर पिकावर होत आहे. तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीप्रमाणे ५० टक्क्यांपर्यंत घटू शकते. परिणामी, तुरीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे.