तब्बल सहा वेळा पुढे ढकलण्यात आलेली भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक अखेर पार पडली. यापूर्वीच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप आणि त्यांचे निकटवर्तीय असलेले संजय सिंह यांची आता अध्यक्षपदी झालेली निवड लक्षात घेता, संघटनेचे कामकाज पूर्वीसारखेच चालणार की काही बदल दिसून येणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह कोण आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हाने असतील आणि निवडणुकीची ग्राह्यता कितपत, या विषयीचा हा आढावा.

संजय सिंह कोण आणि त्यांचा यापूर्वीचा संघटनात्मक अनुभव किती?

वाराणसीचे असलेले संजय सिंह यांचा कुस्तीमधील संघटनात्मक अनुभव मोठा आहे. अनेक वर्षांपासून ते कुस्तीशी जोडले गेलेले आहेत. उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. कुस्ती क्षेत्रात ते ‘बबलू’ या टोपणनावाने परिचित आहेत. वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. कार्यकाळ संपलेल्या कार्यकारिणीत ते कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. त्यांचा अनुभव पाहून २०१९मध्ये त्यांना संयुक्त सचिव करण्यात आले. त्याच बरोबर भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यानंतर या संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी संजय सिंह यांची परिषदेवर हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात महिला कुस्ती लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
President Erdogan of Turkey
तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?

महासंघाच्या निवडणुकीलाही विरोध करणाऱ्या मल्लांना काय वाटते?

ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यावर विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्याचबरोबर त्यांच्यासह त्यांच्याजवळील एकाही व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार देऊ नये अशी विनंती केली होती. मात्र, सरकारने या विनंतीकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे संजय सिंह अध्यक्ष झाले असले, तरी संघटनेची सूत्रे ब्रिजभूषण यांच्याकडेच राहतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षीने निवृत्ती घोषणा केली, तर बजरंगने आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत केला. यातून या मंडळींची तीव्र नाराजी दिसून येते.

ही निवडणूक ग्राह्य धरली जाईल का?

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली असली, तरी या कार्यकारिणीवर न्यायालयाची टांगती तलवार आहेच. कुस्तीगिरांचे आंदोलन नाही, तर संलग्न राज्य संघटनांनी केलेल्या न्यायालयीन याचिकेत कुस्ती महासंघाची निवडणूक अडकली होती. सहा वेळा ही निवडणूक पुढे ढकलली गेली. निवडणूक १२ जुलैला होणार होती. मतदारांची छाननी, उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, माघार प्रक्रिया सगळे सोपस्कार पार पडून केवळ निवडणूक बाकी असताना, राज्य संघटनांनी आदल्या दिवशी ११ जुलैला निवडणुकीवर स्थगिती मिळवली.

हेही वाचा… विश्लेषण: क्रिप्टो चलन… कोसळतेय की उसळतेय?

परिणामी वेळेत निवडणूक न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय देताना आदेशात गोंधळ असल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पडल्यावर स्थगिती कशी येते हेच कळत नाही असे सांगून न्यायालयाने ही स्थगिती उठवली. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, त्याच वेळी न्यायालयाने अन्य याचिकांवरील निकालावर ही निवडणूक अवलंबून असेल अशी पुष्टीही दिली होती. त्यामुळे अजूनही निवडणुकीवर ग्राह्यतेची टांगती तलवार आहेच.

निवडणुकीचा फायदा कोणाला आणि कसा?

कुस्ती महासंघाची निवडणूक होणे हे भारतीय कुस्तीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. कुस्तीगिरांचे आंदोलन आणि न्यायालयीन लढाईत भारतीय कुस्ती हरवून बसली होती. जवळपास वर्षभर भारतात कुस्ती स्पर्धा झाल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाकडून निलंबनाची कारवाई झाली ती वेगळीच. त्यामुळे भारतीय कुस्तीगिरांचे, विशेषतः कनिष्ठ गटातील मल्लांचे अधिक नुकसान झाले. आधी करोना, नंतर आंदोलन आणि मग न्यायालयीन लढाया यामुळे जवळपास तीन वर्षे कुमार कुस्तीगीर अधिकृतपणे खेळले नाहीत. त्यामुळे त्यांना अनुभवाशिवाय पुढील गटात जावे लागले आहे. कार्यकारिणी आल्यामुळे आता बंद पडलेल्या स्पर्धा होतील आणि मल्ल खेळू लागतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडून झालेली निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल आणि भारतीय कुस्ती संघटनेला पुन्हा एकदा मान्यता मिळेल.

या निवडणुकीनंतरही माजी खेळाडूंना वाटणारी धास्ती खरी ठरेल का?

या निवडणुकीत ब्रिजभूषण गटाने १५ पैकी १३ पदे मिळवली. त्यामुळे मल्लांना धास्ती वाटणे साहजिक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ब्रिजभूषण यांच्याविरुद्धची न्यायालयीन लढाई अजून सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्याचा निकाल लागलेला नाही. ते दोषी आणि हुकूमशाह आहेत की नाहीत, हे न्यायालयाच ठरवू शकते. संघटना चालवताना संजय सिंह यापूर्वीच्या अनुभवाचा धडा निश्चित घेतील अशी अपेक्षा आहे, कारण गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेनेही त्यांचे कान अनेकदा टोचले आहेत. दुसरे म्हणजे संघटनेतील महत्त्वाच्या सरचिटणीसपदावर विरोधी गटाचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे त्यांनाही आपली मते मांडता येणार आहेत.