चेन्नईविरूद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही कर्णधारांनी आपापल्या संघात महत्त्वाचे बदल केले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या फलंदाजीच्या वेळी कॅप्टन कोहलीने तुफान फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यास मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीने दमदार खेळ करत आपल्या IPL कारकिर्दीतील ३८वे अर्धशतक ठोकले. या अर्धशतकाच्या बळावर कोहलीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना या दोघांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

IPL च्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहेत. त्याने १३२ सामन्यांमध्ये ४६ अर्धशतके ठोकली आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर सुरेश रैना, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तिघे आहेत. सुरेश रैनाने १९३ सामन्यांमध्ये ३८ अर्धशतके ठोकली आहेत. रोहित शर्माच्या नावावर १९४ सामन्यात ३८ अर्धशतके आहेत. तर विराटने ३८ अर्धशतकांसाठी १८३ सामने खेळले आहेत.