‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या’अंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांकरिता मुंबईतील खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी एकूण ६ हजार ५६० अर्ज आले आहेत. या जागांवरील प्रवेशांकरिता मागणी नोंदविण्याची मुदत सोमवारी संपली. उपलब्ध जागांपेक्षा कमी पालकांनी आपल्या पाल्यासाठी प्रवेश अर्ज केल्याने काही ठरावीक शाळा वगळता हे प्रवेश फारसे चुरशीचे होण्याची शक्यता नाही.
या जागांसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुंबईतील अशा शाळांमधील उपलब्ध जागांची संख्या ८२४४ आहे. वर्षांला एक लाख रुपयांहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना २५ टक्के जागांवर प्रवेश घेता येतील. मात्र सुमारे आठ हजार जागांकरिता अवघे साडेसहा हजार अर्ज आल्याने बहुतांश शाळांमधील जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर १५ मेपर्यंत निवड यादी जाहीर केली जाईल, असे पालिकेच्या शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी असलेले अज्ञान, मोठय़ा शाळांची भीती आणि उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब यामुळे अर्जाची संख्या कमी असल्याचे म्हटले जात आहे. अर्ज कमी आले असले तरी काही ठरावीक शाळांमधील प्रवेशासाठी चुरस असण्याची शक्यता आहे. पालकांकडून भरून घेतलेल्या पसंतीक्रमानुसार लॉटरी पद्धतीने हे प्रवेश देण्यात येतील.
पालकांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. ज्यांनी ही कागदपत्रे अर्जासोबत जोडली नसतील त्यांनी पुढील दोन दिवसात ती जमा करावी, असे शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी सांगितले.