आयआयटी मुंबईचा ‘टेकफेस्ट’ म्हणजे तमाम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाची गोष्ट असते. यातील ‘रोबोवॉर’साठी तर चांगलीच गर्दी उसळते. पण रविवारी दुर्दैवाने याच ‘रोबोवॉर’मध्ये एक अपघात घडला आणि एक विद्यार्थी जबर जखमी झाला. या विद्यार्थ्यांला तातडीने उपचार देण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला.
आयआयटी मुंबईतील ‘टेकफेस्ट’च्या शेवटच्या दिवशी ‘रोबोवॉर’ची उपांत्यपूर्व फेरी सुरू होती. त्यावेळी एकाच महाविद्यालयाच्यादोन संघांचे रोबो आपआपसांत भिडले. दोन्ही रोबोला धारदार हत्यारे लावण्यात आली होती. हे रोबो एकमेकांवर आदळले त्यावेळी एका रोबोचे हत्यार उडाले आणि दोन दिशांना भिरकावले गेले. यातील एक हत्यार रोबो चालविणाऱ्या विद्यार्थ्यांलाच लागले आणि तो जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडला. घटनास्थळी डॉक्टर उपलब्ध नव्हता. यावेळी आयोजकांनी प्रेक्षकांमध्ये कुणी डॉक्टर आहे का, अशी घोषणा केली. त्यावेळी मात्र एक डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी प्रथोमोपचार केले. यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले.
या स्पध्रेत सुरक्षा निकष पुरेसे पाळले गेलेले नव्हते त्यामुळेच हा अपघात झाल्याची प्रतिक्रिया येथे पाहण्यास आलेले टेकप्रेमी प्रेक्षक शैलेश संसारे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय निकषानुसार ‘रोबोवॉर’ खेळले जाते तो परिसर सहा बाजूनी बंद असणे गरजेचे असते. याचबरोबर हा परिसर बंद करण्यासाठी अ‍ॅक्रेलिकची आठ ते दहा एमएमची पारदर्शक खिडकी असावी असा नियम आहे. मात्र येथे हे नियम पाळले गेले नव्हते. दरम्यान आयोजकांनी मात्र असा प्रकार घडला असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.