कोल्हापूर: महाराष्ट्राच्या सीमेवरील जत तालुक्यातील ४२ गावे कर्नाटक राज्यात येण्याच्या तयारीत आहेत, या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधाना विरोधात सीमाभागातून तसेच कोल्हापुरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जत तालुक्यातील ४२ गावांनी पाणी प्रश्नासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून पाणी मिळणार नसेल तर कर्नाटकात जाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करून ठरावही केला आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाला सीमाभागातील मराठी भाषकांनी जोरदार विरोध केला आहे. हेही वाचा >>> बसवराज बोम्मई यांच्या विधानानंतर मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा सरकारला सल्ला, म्हणाले “जतमधील ४० गावांनी…” हेही वाचा >>> खरंच जतमधील ४० गावं कर्नाटकमध्ये जाणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले “एकही गाव…” आधी कर्नाटकातील गावे द्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले, कर्नाटकातील मराठी भाषकांचा लढा मोडून काढण्यासाठी कर्नाटक शासनाने बेळगावात विधानसभेचे अधिवेशन घेतले. तेथे विधानसभेची वास्तू (विधानसौद) उभारली. सर्वोच्च न्यायालयात खटल्यावेळी सीमाभागात कन्नड वातावरण आहे; हे दाखवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न आहे. तरीही मराठी बांधव कर्नाटक सरकारची दडपशाही झुगारून महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील गावे कर्नाटकात येण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. आधी कर्नाटकातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या ६७ वर्षांच्या मूळ मागणीला त्यांनी प्रतिसाद द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. हेही वाचा >>> बसवराज बोम्मईंच्या विधानामुळे नवा वाद, शिंदे-भाजपा सरकारवर टीकेची झोड; विरोधक आक्रमक बोमाईंचे राजकीय वळण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, महाराष्ट्रातील एक इंच ही जागा कर्नाटकला दिली जाणार नाही. त्यासाठी रक्त सांडायलाही तयार आहे. सीमा भागातील गावांचा लढा सुरूच राहणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कन्नड भाषिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी जतचा मुद्दा भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी उपस्थित करून या प्रश्नाला राजकीय वळण दिले आहे, असा आरोप केला.