लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : रस्त्याचा अभाव असल्याने एका अर्धांगवायूचा झटका आलेल्या वृद्धाला उपचाराअभावी रात्र घरीच कंठावी लागल्याचा धक्कादायक प्रकार चंदगड तालुक्यात घडला. दिवस उजाडल्यावर या वृद्धाला टोपलीपासून बनवलेल्या डोलीतून उपचारासाठी नेण्यात आले. यानिमित्ताने प्रगत कोल्हापूरची दुखरी बाजू समोर आली आहे.

बुजवडे धनगर वाडा या दुर्गम भागात राहणारे नवलू कस्तुरे यांना रात्री अर्धांग वायूचा झटका आला. तेथून रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना रात्रभर घरीच काढावी लागली. पहाट झाल्यावर जंगलातून पाच किलोमीटरची पायपीट करून ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पुरोगामित्वाची शेखी मिरवणाऱ्या कोल्हापुरातील ग्रामीण भागात अजूनही अनेक धनगर वाड्या प्रगतीपासून कशा वंचित आहेत याचा हा दाखला ठरला आहे.

आणखी वाचा- कर्नाटकातील दोघे चोरटे जेरबंद; ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

पावसाळ्यात अशा अनेक दुर्गम वाड्या- वस्त्यांवरील ग्रामस्थांना मरण यातना सहन कराव्या लागतात. दुर्गम भागात मतदारांची संख्या आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल या स्थानिकांनी उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्ताव लाल फितीत

या धनगर वाड्याचा रस्त्यांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे. वडिलोपार्जित शेती, घर असल्यामुळे येथील तीनशेवर ग्रामस्थ स्थलांतर करण्यास तयार नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वनविभागाशी संपर्क साधून येथील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.